डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या “कागदावरील माणसं” या पुस्तकाचे ८ जानेवारी रोजी होणार प्रकाशन
भारत सासणे यांच्या हस्ते होणार प्रकाशन
नांदेड येथील प्रख्यात लेखिका डॉ वृषाली किन्हाळकर यांच्या ‘ कागदावरची माणसं ‘ या पुस्तकाचे बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ कथा लेखक भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. अनुबंध प्रकाशन पुणे व मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नियोजन भवनात होणार कार्यक्रम
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता प्रकाशनाचा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ कवयित्री नीरजा व नांदेड येथील महात्मा गांधी मिशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुजाता जोशी- पाटोदेकर करणार आहेत.
वेगवेगळ्या पात्रांचा वेध घेणारे पुस्तक
मागील अनेक वर्षापासून कविता व ललित लेखन करणाऱ्या डॉ वृषाली किन्हाळकर यांचे हे नवे पुस्तक वेगळ्या धाटणीचे आहे. मराठीतील महत्त्वाच्या कादंबऱ्यासह इतर साहित्यकृती मधील पात्राबद्दल विस्तृत लेखन करून आस्वादक समीक्षेचे नवीन पुस्तक त्यांनी सिद्ध केले आहे. १९२५ नंतरच्या ७५ वर्षातील अनेक कादंबऱ्यातील वेगवेगळ्या पात्रांचा वेध घेणारे हे पुस्तक अनुबंध प्रकाशनाने सिद्ध केले आहे.
कथा, कादंबरी, नाटकेतर कलाकृतींमधील पात्रांबद्दल लक्षवेधी व मार्मिक लिखाण अभावानेच आढळून येते. निर्माण झालेली व कलाकृतीच्या पर्यावरणात विखरून अस्तित्वात असलेली पात्रं झपाटून टाकतात. हाॅंटिंग करतात, पाठलाग करतात. अशा संस्मरणीय पात्राबद्दल लेखिकेने या पुस्तकात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
साहित्यकृतीतील अनोख्या, जिवंत, रसरशीत अश्या हाॅंटिंग कॅरेक्टर्सचा वेध या पुस्तकात घेतला आहे. या प्रयासाच्या माध्यमातून ही पात्रे नियोजित पर्यावरणातून सुटतात, मोकळी होतात, व्यथा मांडतात, काहीतरी सांगू पाहतात.
यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रकाशनाच्या या कार्यक्रमास वाचन प्रेमी व साहित्यिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक संस्थासह डॉ. माधवराव किन्हाळकर, अनिल कुलकर्णी, देविदास फुलारी, प्रभाकर कानडखेडकर, प्रा.महेश मोरे यांनी केले आहे.