आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची मागणी
19 मार्च (शेतकरी सहवेदना दिवस) रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना निश्चित कराव्यात. अशी मागणी किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केली आहे.सभापती, विधानसभा, महाराष्ट्र यांना आज किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे यांच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या दुर्दैवी घटनेला आज 39 वर्षे होत आहेत. या घटनेने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यानंतर सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. अत्यंत खेदजनक बाब अशी की, देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात होत आहेत. असे घडतांना देखील, महाराष्ट्र विधानसभेने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त केली नाही. दोन मिनिटे मौन पाळून साधी श्रद्धांजली देखील अर्पण केली नाही.
आमचे असे निरीक्षण आहे की, आज शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 10 ते 15 टक्के राहिली आहे. जेंव्हा 50 ते 60 टक्के संख्या होती तेंव्हा महाराष्ट्रात रोज 7 शेतकरी आत्महत्या करीत होते. आज शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली तरी तेवढ्याच आत्महत्या रोज होताना दिसतात. याचा अर्थ एवढाच की, शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवरील संकट वाढले आहे. येथे हेही लक्षात घ्यावे की, एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ९५ टक्के आत्महत्या शेती शिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नसणाऱ्या कुटुंबात झाल्या आहेत.
माझी विनंती आहे की, इतर सर्व सरकारी योजना बंद करून या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दरमहा रुपये 18 हजार देण्याची व्यवस्था करावी. (वेतन आयोगाने सगळा विचार करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा पगार 18 हजार रुपये दरमहा ठरवला आहे.) शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या या 10-15 टक्के शेतकऱ्यांकडे शेतीबाह्य उत्पन्न आले तर त्यांच्याही आत्महत्या टळतील. या बरोबरच शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण आदी) कायदे रद्द करणे ही आवश्यक आहे.
तातडीने या सर्व परिस्थितीचा विचार करावा म्हणून आपणास विनंती आहे की,
1) 19 मार्च (शेतकरी सहवेदना दिवस) रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे.
2) या अधिवेशनात आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी.
3) शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत यासाठीच्या उपाय-योजनांवर चर्चा करून निर्णय करावे. ही नम्र विनंती.
किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी ही मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.