१९ मार्च अन्नत्याग आंदोलन; प्रा. शैलजा बरुरे यांचे व्याख्यान तर ऍड. संतोष पवार यांचा होणार सन्मान


शेतकरी आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनात अंबाजोगाई येथील संयोजन समितीचे वतीने सायं. ४ वाजता आयोजित कार्यक्रमात प्रा. शैलजा बरूरे यांचे व्याख्यान तर ऍड. संतोष पवार यांच्या सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार यांनी दिली.
शेतकरी आत्महत्यांची शासन दरबारी पहिली नोंद झालेल्या १९ मार्च या दिवशी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने गेली ७ वर्षांपासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. अलिकडे या आंदोलनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढली असून महाराष्ट्रातील सर्वच विभागांत हे आंदोलन होत आहे. आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे जाणवत होते, मात्र यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.


या आंदोलनात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यात व विदेशात महाराष्ट्रातील किसान पुत्र स्थायिक झाले आहेत आणि ज्यांना या आंदोलनाची केवळ समाज माध्यमातूनच माहिती कळते अशा अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचा या आंदोलनात मोठा सहभाग असतो. या आंदोलना संदर्भात अनेक पोस्ट जेंव्हा समाज माध्यमांवर आम्ही टाकतो तेंव्हा देश विदेशातील किसान पुत्र आम्ही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगत आहेत. ही बाब या चळवळीला बळ देणारी आहे.
अंबाजोगाई शहरातील किसान पुत्रांचा एक मोठा गट हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी गेली सात वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहे. याही वर्षी स्थानिक संयोजक समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अंबाजोगाई येथे या निमित्ताने गेली दोन वर्षांपासून व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी पासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबायांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करणा-या एका व्यक्ती अथवा संस्थेचा सन्मान करण्यात येणार आहे.
अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक उपवास


या वर्षी १९ मार्चच्या अन्नत्याग आंदोलन निमित्ताने सकाळी १० ते सायं. ४ पर्यंत किसान पुत्र आंदोलनाचे जनक अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली आद्द कवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहाच्या समोरील चिंचेच्या झाडाखाली सामुहिक उपोषण करण्यात येणार आहे. या सामुहिक उपोषणात कोणत्याही राजकीय, सामाजिक, व्यापारी प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी/कार्यकर्त्यांना सहभागी होता येईल.
प्रा. शैलजा बरूरे यांचे व्याख्यान


याच दिवशी सायंकाळी ४ वाजता नगर परिषद कार्यालय परिसरातील दैनिक विवेक सिंधु कार्यालय समोरील मोकळ्या जागेत प्रा. शैला लोहिया यांचे " शेतकरी आत्महत्या कारणं आणि मिमांसा" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
ऍड. स़तोष पवार यांचा होणार सन्मान


याच कार्यक्रमात शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करणा-या कार्यकर्त्यांचा व्याख्याते व संयोजकांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यावर्षी या सन्मानाचे मानकरी ऍड. संतोष पवार हे असणार आहेत. ऍड. संतोष पवार हे गेली अनेक वर्षांपासून “आधार माणुसकीचा” या संस्थेच्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबायांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा सहभाग


किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या सर्व उपक्रमात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांचा विशेष सहभाग असतो. प्रति वर्षी आधार माणुसकीचा या संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमात शेकडो महिला सहभाग घेत असतात. याहीवर्षी शेतकरी आत्महत्यांग्रस्त कुटुंबातील महिलांचा विशेष सहभाग राहणार आहे.
रोटरी चा सहभाग महत्वाचा


अन्नत्याग आंदोलनाच्या दिवशी राबवण्यात येणार सर्व उपक्रम हे किसान पुत्रांनी जमा केलेल्या निधीतून घेण्यात येतात. शिवाय या उपक्रमात किसान पुत्र आंदोलन, शेतकरी संघटना, रोटरी क्लब, आंतर भारती, ज्येष्ठ नागरिक मंच व इतर संघटनांचा सहभाग असतो. यावर्षी या सर्व संघटनांमध्ये रोटरी क्लब ने मोठा पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब चे अध्यक्ष , सचीव आणि ज्येष्ठ पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.


सहभागी होण्याचे आवाहन
किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमात अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना आपला सहभाग नोंदवून हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार आणि त्यांचे सहकारी कालिदास आपेट, वसंतराव मोरे, अनिकेत डिघोळकर, प्रा. शांतीनाथ बनसोडे, प्रा. रमेश सोनवळकर, प्रा. पंडीत कराड, महावीर भगरे, वैजनाथ शेंगुळे, बाबासाहेब केंद्रे, अनिरुद्ध चौसाळकर, मुजीब काजी, शिवकुमार निर्मळे, दत्ता वालेकर, आशा अमर हबीब, किरण देशमुख, रेखा देशमुख, अनिता कांबळे , बाबुराव मस्के व इतरांनी केले आहे.