१९ मार्च; अन्नत्याग आंदोलनाचे प्रायोजकत्व स्विकारले मॉर्निंग ग्रुपने


देशभरातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलना निमित्ताने यावर्षी घेण्यात येणा-या सर्व खर्चाचे आणि नियोजनाचे प्रायोजकत्व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या एका गटाने स्विकारले असल्याची माहिती संयोजक सुदर्शन रापतवार यांनी दिली.
देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्यांसाठी जाचक ठरणारे तीन कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली गेली सात वर्षांपासून अंबाजोगाई येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येते.


यावर्षापासून १९ मार्च रोजी शेतकरी आत्महत्या या विषयावर एक सामुहिक उपवास,व्याख्यानमाला आणि सामुहिक उपवास सोडण्याचा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. येथील नगर परिषदेच्या मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहासमोरील चिंचेच्या झाडाखाली हे सर्व उपक्रम दिवस भर करण्यात येणार आहेत.
सकाळी १० वाजता सामुहिक उपवास सुरु करण्यात येणार आहे. दिवसभर हा उपक्रम सुरु असतांनाच सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानानंतर लगेचच सामुहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम होणार असून नंतर कार्यक्रमाची सांगता होईल.


१९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या यासर्व कार्यक्रमाची आसान व्यवस्था, सिनियर सिटीझन यांना खुर्चीवर बसुन व्याख्यान स्पष्ट ऐकु येईल अशी ध्वनी व्यवस्था, उपवासाची सांगता करण्यासाठी एक प्लेट खिचडी, २००ग्रॅम पाणी फोकल, एक कप चहा ही व्यवस्था लंगोटीयार या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात येणार आहे. या ग्रुपचे सदस्य डॉ. सुरेश आरसुडे, सुदर्शन रापतवार, सुभाष बाहेती, चंद्रशेखर वडमारे, डॉ. सिध्देश्वर बिराजदार, शेख जमील भाई, प्रा. प़डीत कराड, शिवाजी कुलकर्णी, रमेश कापसे हे हा सर्व खर्च उचलणार आहेत.
१९ मार्च अन्नत्याग आंदोलनाचे स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार यांनी या ग्रुप मधील सर्व सदस्यांच्या सहयोगाबध्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले आहेत. या उपक्रमात शहरातील विविध विभागात फिरणाऱ्या मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांनी, विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.