महाराष्ट्र

समाजमाध्यमांच्या आक्रस्ताळेपणामुळे पत्रकारीता धोक्यात; पद्मश्री वामन केंद्रे

आज समाजमाध्यमांचे रूप पाहिले तर आमच्यासारख्या सामान्य माणसाला चिंता वाटते की, आज समाजमाध्यमांचा जो भडीमार होत आहे. त्यातून काय घ्यावे आणि काय समाजाला द्यावे. परंतु, वृत्तपत्रांनी गेल्या शंभर वर्षांत जे योगदान पत्रकारितेसाठी दिले आहे. त्याचा विचार केला तर समाज माध्यमातील अपप्रवृत्तीमुळे तसेच आक्रस्ताळेपणा आणि अक्रमकपणा वाढल्यामुळे पत्रकारिता धोक्यात येत असल्याचे मत एनएसडीचे माजी संचालक तथा पद्मश्री प्रा.वामनराव केंद्रे यांनी व्यक्त केले.

टिव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीच्या निवेदिका निकिता पाटील म्हणाल्या की, वृत्तपत्र चळवळीला बळकटी देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तरच वृत्तपत्राचे वैभव आणि अस्तित्व टिकून राहिल. अंबाजोगाई शहरात दैनिक वार्ता समूहाच्या वतीने आयोजित वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नगरभूषण, सद्भावना, युवा गौरव पुरस्कार तसेच शहरातील गुणीजणांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते बुधवार, दि.15 फेबु्रवारी 2023 रोजी आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला होता.

अंबाजोगाई शहरात गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिते मध्ये वेगळी छाप पाडणा-या दैनिक वार्ता समूहाचा 15 वा वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सद्भावना पुरस्कार प्राप्त पवन गिरवलकर यांचे वडील सोमनाथअप्पा गिरवलकर यांचे दुखःद निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर वार्ता समूहाचा पुरस्कार वितरण व वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पिपल्स को.ऑप बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून एनएसडीचे माजी संचालक तथा पद्मश्री प्रा.वामनराव केंद्रे हे होते तर प्रमुख आकर्षण म्हणून टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या निवेदिका निकिता पाटील, चला हवा येवू द्या फेम सोनाली भगरे, केजच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड, परभणी येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, डॉ.राहुल धाकडे, नाथ रेड्डी, डॉ.अतुल शिंदे, प्रताप पवार, पत्रकार वैभव स्वामी, जयजीत शिंदे यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे प्रतिनिधी विकास मुंडे, पानगावकर , प्रदिप पतकराव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण आणि गुणीजणांचा सन्मान करण्यात आला. नगरभूषण पुरस्कार लातूरचे पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, सद्भावना पुरस्कार जीवनआधार भक्तीप्रेम आश्रम (धायगुडा पिंपळा) यांच्या वतीने पानगावकर काका, सर्जेराव सावरे तर युवा गौरव पुरस्कार प्रदिप पतकराव यांना वितरीत करण्यात आला.

गौरव गुणीजणांचा या उपक्रमांत रविंद्र ठाकूर, डॉ.स्नेहल होळंबे, डॉ.सचिन पोतदार, अनंत लोमटे, सुरेश कराड, संजय गंभीरे, भरत पतंगे, पत्रकार शुभम खाडे, कॅप्टन सुमित हरंगुळे यांच्या वतीने वडील शिवानंद हरंगुळे, युवा संगीतकार ओंकार रापतवार, बालशाहिर अविष्कार एडके, स्वप्नील नरूटे, आर्किटेक्ट आकाश कराड, कु.प्रतिक्षा दत्तात्रय अंबेकर, कु.रिद्धीमा सांगळे, मुडेश्वर महिला बचतगट (मुडेगाव), बाळूमामा पुुरूष बचतगट (पूस), आदींसह इतरांना यावेळी त्यांच्या क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल सन्मानित करण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक मेडिया भांडवलदारांच्या ताब्यात गेला असल्यामुळे वास्तव्य समोर येत नाही; केंद्रे

यावेळी बोलताना प्रा.वामन केेंद्रे म्हणाले की, भारतात व जगात वृत्तपत्राला खूप मोठी परंपरा आहे. वर्तमानपत्रामुळे क्रांतीची व परिवर्तनाची बिजे रोवली गेली. वृत्तपत्रांमुळे त्या काळात जनजागृती आणि प्रबोधन करण्याचे काम केले. आज हिच वृत्तपत्र चळवळ व इलेक्ट्रॉनिक मिडिया हा भांडवलदाराच्या ताब्यात गेल्याने देशाचे व जगाचे वास्तव चित्र समोर येत नाही. केवळ समाज माध्यमातून आक्रस्ताळेपणा व आक्रमकपणा हा प्रेक्षकांच्या माथी मारला जात आहे. यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे. याचे चिंतन होण्याची गरज आहे. माध्यमांवर खूप मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी कुठेतरी झटकल्याचे चित्र दिसत आहे. कारण वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया हा कोणाचा तरी कळसुत्री बाहुला बनला आहे. त्यामुळे समाजाने सुद्धा प्रत्येक बातमीची दखल घेत असताना त्याची सत्यता व वास्तविकता पडताळण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात आजही वृत्तपत्राचे अस्तित्व आणि विश्वास टिकून आहे. कारण, दैनिक वार्ता सारखी वृत्तपत्रे ही समाजाचा अभ्यास करुन समाजाला अभिप्रेत असलेली पत्रकारिता निभावत आहेत. आणि ज्या परिस्थिती मधून संपादक परमेश्वर गित्ते आलेले आहेत. त्यांना सामाजिक भान आणि जाण असल्याने त्यांच्यावर सध्या तरी भांडवलदारांनी काबीज केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून निःस्पृह पत्रकारिता केली जात असल्याचे दिसत आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकातील कर्तृृत्वसंपन्न आणि कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करून या वृत्तपत्राने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा वृत्तपत्रांमुळे सामान्य जणांमध्ये विश्वासाचे बिजारोपण होत असल्याचे दिसत असल्याचे मनोगत प्रा.वामनराव केंद्रे यांनी व्यक्त केले.

व‌त्तपत्र चळवळीला समाजाने बळकटी देण्याची गरज; निकिता पाटील

टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या निवेदिका निकिता पाटील म्हणाल्या की, वार्ता समूहाने समाजातील कर्तृत्व संपन्न व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कामांचे व गुणवत्तेचे कौतुक केले आहे. मागील 15 वर्षांत अनेक चढउताराचा सामना करीत या वृत्तपत्राने उंची गाठली आहे. सामाजिक जाणीवा जोपर्यंत जिवंत आहेत. तोपर्यतच माणुसकी दिसणार आहे. समाजानेसुद्धा सामाजिक दायित्व निभावण्याची गरज आहे. केवळ ते माझे काम नव्हे अशी वृत्ती सोडून वृत्तपत्रांच्या पाठिशी सर्व ताकदीनिशी समाज उभा राहिला. तर त्या ठिकाणी सुराज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. समाजाचे भले करण्याची ताकद माध्यमांमध्ये नक्कीच आहे. परंतु, समाजातील अस्वस्थता दूर करण्यासाठी राजकीय व सामाजिक शक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. वार्ता समूहाने माध्यम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी सामाजिक कृतज्ञता अदा करत आपल्या आईच्या स्मृती जतन करण्याचे काम केले आहे. जो माणूस मातृभुमीचा, कर्मभुमीचा विचार करतो तो कधी ही अपयशी ठरत नाही. समाजाने माध्यमांचे अस्तित्व टिकवण्यासाठी खंबीरपणे उभे राहण्याचे मत निकिता पाटील यांनी व्यक्त केले.

सिनेअभिनेत्री सोनाली भगरे बोलताना म्हणाल्या ज्या मातृभुमीत माझे शिक्षण झाले. माझ्यावर संस्कार झाले आणि जिथून सांस्कृतिक पायाभरणी झाली त्याच मातृभुमीत माझा वार्ता समूहाच्या वतीने सन्मान होतो आहे. ही माझ्यासाठी व माझ्या कुटूंबियांसाठी खूप मोठी बाब आहे. म्हणून हा सन्मान माझ्या जीवनातील सर्वोच्च असणार असल्याचे मत भगरे यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप राजकिशोर मोदी यांनी केला, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, अ.भा.मराठी पत्रकार संघ, अंबाजोगाई पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मिडिया, अंबाजोगाई व गुडमॉर्निंग ग्रुप अंबाजोगाई यांनी पुढाकार घेतला.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker