सद्भावनेचा सायकल यात्री; दगडू लोमटे


1985 ते 86 या कालावधीत बाबा आमटे यांनी कन्याकुमारी ते जम्मू-कश्मीर तब्बल 6700 किमी सायकल यात्रा काढून”‘भारत जोडो “अभियान राबविले, तेव्हापासून ते आज तागायत दगडू लोमटे हे संपूर्ण देशात सद्भावना नांदावी यासाठी विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रयत्नशील राहतात. आज डॉ. गिरीश कुबेर यांच्या संकल्पनेतून कलकत्ता ते बांगलादेश आयोजित “सद्भावना सायकल यात्रेत” ते सहभागी होऊन अंबाजोगाईचं प्रतिनिधित्व करत आहेत. देशातील विविध चळवळीत सहभागी असलेले दगडू दादा देशाबाहेर जाऊन बाबा आमटे यांच्या विचारांचा व गांधीवादाचा विचार पेरण्याचे काम करत आहेत. या देश- विदेशातील यात्रांच्या माध्यमातून दादाने समाजात सामाजिक बांधिलकी, समता ,बंधुता आणि सद्भावना रुजवण्याचे काम आयुष्यभर केलेला आहे.


अशा या देश-विदेशातील यात्रांबरोबरच आंबेजोगाई शहर व परिसरात दादांनी मराठवाडा साहित्य परिषद, अक्षरमानव साहित्य चळवळ, यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह यासारख्या साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक चळवळी रुजवल्या आणि सामान्य वाचकांना माणसांना बौद्धिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक खाद्य पुरवण्याचं मोलाचं काम केलेलं आहे. या चळवळी बरोबरच सामाजिक भान ठेवून आंतरजातीय विवाह, वृद्धांच्या समस्या ,लहान मुलांसाठी विविध स्पर्धा भरवणे, त्यांच्यावर बौद्धिक संस्कार घडवणे ,व्यायामाचे महत्त्व यासाठी गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सतत संवाद साधने यासारख्या अनेक विविध चळवळी राबून दादांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटववलेला आहे. दादा संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे, तर आज देशातील विविध व्यक्तिमत्त्वांना परिचयाचा व कुतूहलाचा विषय झालेले आहेत.


समाजात कोणत्याही प्रकारचा विध्वंस घडू नये, त्याचं बौद्धिक स्वास्थ्य अबाधित ठेवलं पाहिजे यासाठी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण , बौद्धिक वर्ग, कवी संमेलने साहित्य संमेलने आदि सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम राबवून दादांनी सामान्य माणसाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे. बाबा आमटे यांची समतेची, अहिंसेची, व सनदशीर मार्गाने मागण्या मान्य करून घेण्याची शिकवण ते आजही मनापासून जोपासत आहेत. ही बाब अंबाजोगाई करांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे.
भारत हा स्वातंत्र्य होऊन विकासाच्या एकेक पायऱ्या चढत असतानाच 80 च्या दशकात पंजाब पाकिस्तानच्या विळख्यात अडकला होता,ऑपरेशन ब्लू स्टार, पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या, दिल्लीत शिखांची कत्तल यासारखे देशात वेगवेगळे प्रसंग घडले होते, त्यामुळे एकता भंग होऊन दंगली पसरून मृत्यूचे तांडव देशभर पसरले होते .याचाच फायदा घेऊन ईशान्य राज्यातील फुटीरतावादी चळवळी खोपावत होत्या.


यामुळे देशाची एकता भंग झाली होती. जाती धर्मात तेड निर्माण होऊन ते एकमेकांकडे संशयाने पाहत होते. ही फुटीरतावादी परिस्थिती मिटून समाजात एकता प्रस्थापित व्हावी यासाठी बाबा आमटे यांनी 1985 ते 86 या कालावधीत कन्याकुमारी ते जम्मू-कश्मीर अशी 6700 किमीची “भारत जोडो यात्रा” राबवली या शांतता यात्रेत देशभरातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. यात दगडू लोमडे यांचा सहभाग हा उल्लेखनीय होता .जेव्हा-जेव्हा अशा समाजात, देश- विदेशात एकतेच्या, समतेच्या सद्भावना यात्रा काढल्या जातात, असे उपक्रम घेतले जातात ,तेव्हा-तेव्हा दगडू दादा लोमटे हे तळमळीने सक्रिय सहभागी होतात. बाबा आमटे यांच्या मुशीत वाढलेलं आणि गांधीवादाने झपाटलेलं हे व्यक्तिमत्व आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरात कौतुकाचा विषय होत आहे. ही बाब आंबेजोगाईकरांसाठी अभिमानाची व स्वाभिमानाची आहे.


“भारत जोडो” यात्रेपासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून घेतलेल्या दगडू दादा लोमटे घरावर तुळशीपत्र ठेवून आयुष्यभर गांधीवादाच्या प्रभावाखाली कार्य करत आहेत . घरात स्व. भगवानराव लोमटे यांचा राजकारणाचा व समाजकारणाचा संस्कार त्यांच्यावर आहे. त्याचबरोबर राज्य -देशभरातील दिग्गज सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व्यक्तिमत्त्वांचा सहवास त्यांना बालपणापासूनच लाभलेला आहे , त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व कायमच चळवळ्या माणूस असेच राहिलेले आहे. दादांचे व्यक्तिमत्व हे परिसरसारखे आहे ते ज्या उपक्रमात भाग घेत तो उपक्रम डोक्यावर घेऊन यशस्वी करण्याचे कसं व धमक त्यांच्यात असते. तर त्यांच्या सहवासात कोणीही व्यक्ती गेल्यास त्याचेही सोनं होऊन जातं हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.


मधल्या काळात अक्षरमानव या राजन खान यांच्या अंबाजोगाईतील शिबिर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ते यशस्वी केलं ,त्याचबरोबर गणेश देवी यांच्या भाषा संकुल गुजरात येथील शिबिरात अंबाजोगाई इथून अनेक लोकांना सहभागी करून त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम त्यांनी केलं. ते बालकापासून ते वृद्धांपर्यंत वेगवेगळ्या सहलीच्या माध्यमातून सर्वांना राज्य-देश भ्रमंतीवर सतत घेऊन जातात, याचबरोबर मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारणीवर काम करत असताना अंबाजोगाईची शाखा कशी उपक्रमशील होईल याकडे त्यांचा कायमच कल असतो. मासिक मैफिल ,विविध स्पर्धा, पुरस्कार ,साहित्य संमेलन राबवणे यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. दादा अंबाजोगाई च्या दृष्टीने सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व बौद्धिक उपक्रम यशस्वी करून समाजाला संस्कारशील करण्याचे काम करणारा माणूस म्हणून परिचित आहेत आहे .यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह, भगवानराव लोमटे स्मृती समारोह व पुरस्कार वितरणाचा जो प्रतिवर्षी उपक्रम घेतला जातो तो तब्बल 36 वर्ष आजही चालू आहे ,तो अंबाजोगाईकरांसाठी बौद्धिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक विषयावर ज्ञान देणारी परवणीच ठरलेला आहे .


या उपक्रमातून चित्रकला, शिल्पकला ,विविध निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,कवी संमेलन, शेतकरी परिषद विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार आणि त्याचबरोबर अंबाजोगाईकरांना दिग्गज साहित्यिक ,विचारवंत, कलावंत व्यक्तिमत्त्वांचे विचार ऐकण्यासाठी ते संधी उपलब्ध करून देतात अनुभवायला देतात, त्यामुळे दादा हा समाजकारणापासून राजकारणापर्यंत, तरुणांपासून वृद्धांपर्यंत ,सांस्कृतिक क्षेत्रापासून ते सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचा भला माणूस म्हणून परिचित आहेत.
आज दादा भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेत पुन्हा सहभागी झाले आहेत साठी ओलांडली असली तरीही 80 च्या दशकातील बाबा आमटेंच्या यात्रेतील सायकल चालवण्याचा जो जोश होता, तोच आजही तसाच पाहायला मिळत आहे. 80 च्या दशकातला तरुण ते आज भासत आहेत. सायकल चालवताना तरुणालाही लाजवेल असा जोश त्यांच्यात पाहायला मिळत आहे. 80 च्या दशकात जी एकता भंग झाली होती ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी बाबा आमटे यांच्या सोबतीने दादांनी देशभर फिरून ती घडी बसवण्याचं काम केलं, त्याच तळमळीतून आणि उर्मीतून दादा आज “भारत आणि बांगलादेश” यांच्यात सद्भावना वृद्धिंगत व्हावी, देशात -जगात शांतता लाभावी. युद्धाने कधीही मानवता संपन्न होत नाही तर गांधीविचार हाच शांततेचा आणि समृद्धीचा विचार आहे. शांतता, अहिंसा हीच देशाला तारणारी आहे या भावनेतून दादा आज देश विदेशात समता, बंधुभाव सद्भावना ,प्रेम ,आपुलकी ,माया, अहिंसा ही मूल्य जपली जावेत विश्व हेच एक घर आहे आणि त्या घरात शांतता लाभली पाहिजे यासाठी ते कायमच प्रयत्नशी आहेत. त्यामुळेच त्यांना विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व आपुलकीने भला माणूस, चळवळ्या माणूस, साहित्य-सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील दादा माणूस म्हणून ओळखतात. दादाच्या या यात्रेला अंबाजोगाईकरांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा

