संकलेश्वर मंदिराचा मलबा हटवणे व उत्खननासाठी ३४.७५ लक्ष रु. मंजूर


पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय
अंबाजोगाई शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक भावनांशी जोडल्या गेलेल्या जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने २ कोटी ४९ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आल्या नंतर लगोलग शहरालगत असलेल्या संकलेश्वर मंदिराच्या (बाराखांबी) मलबा हटविणे व उत्खनन करणे यासाठी ३४ लक्ष ७३ हजार १०८ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने या संदर्भात शासन निर्णय क्र. पुवसं-२०१८/प्र.क्र.२६/सां.का.३ दि. ५ फेब्रुवारी २०२४ अन्वये हे आदेश काढण्यात आले आहेत. या शासन निर्णयात पुढे असे म्हटले आहे की, सकलेश्वर मंदिर (बाराखांबी) परिसरातील मलबा हटवणे व आंबेजोगाई शहर परिसरात उत्खनन करणे कामास संदर्भाधीन शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. पुवसं-२०१८/प्रक्र२६/सांका.३ ८ मार्च २०१८ च्या शासन निर्णयान्वये रु.२०,२०,२००/- इतक्या । रकमेस प्रशासकीय मान्यता व रु.४,००,०००/- इतक्या रकमेस वित्तीय मान्यता देण्यात आली होती. त्यातून सकलेश्वर मंदिर व आंबेजोगाई शहर परिसरातील गवेषणाचे काम अंशतः पूर्ण झाले आहे.


मध्यंतरी कोविड-१९ च्या महामारीच्या काळात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने कोणत्याही प्रकारच्या गवेषण व उत्खननास परवानगी दिली नाही. त्यामुळे गवेषण व उत्खनन करणे शक्य झाले नाही. आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, गवेषण व उत्खनन विभाग, नवी दिल्ली यांनी या परिसरात गवेषण करण्याकरीता एक वर्षाची परवानगी दिली आहे. त्यानुसार या कामाकरीता आवश्यक असलेल्या रकमेपैकी रु.३४,७३,१०८/- इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची विनंती संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांनी संदर्भाधिन क्र.०२ च्या पत्रान्वये केली आहे.


त्यानुसार सकलेश्वर मंदिर (बाराखांबी) परिसरातील मलबा हटवणे व आंबेजोगाई शहर परिसरात उत्खनन करणे कामास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.वरील प्रस्तावाप्रमाणे या शासन निर्णयाद्वारे सकलेश्वर मंदिर (बाराखांबी) परिसरातील मलबा हटवणे व आंबेजोगाई शहर परिसरात उत्खनन करणे कामास रु.३४,७३,१०८/- (अक्षरी रुपये चौतीस लक्ष त्र्याहत्तर हजार एकशे आठ मात्र (सर्व करासह) प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.
वरील प्रस्तावाप्रमाणे या शासन निर्णयाद्वारे सकलेश्वर मंदिर (बाराखांबी) परिसरातील मलबा हटवणे व आंबेजोगाई शहर परिसरात उत्खनन करणे कामास रु.३४,७३,१०८/- (अक्षरी रुपये चौतीस लक्ष त्र्याहत्तर हजार एकशे आठ मात्र (सर्व करासह) प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.


सदर निधी मागणी क्र. झेडडी-०२, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, २२०५ कला व संस्कृती (००) १०३, पुरातत्वशास्त्र, (०१) (०६) राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे किल्ले व धार्मिक स्थळे यांची जपणूक संरक्षण (कार्यक्रम) २२०५ १३०२ २७ लहान बांधकामे या लेखाशिर्षातील सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मंजूर अनुदानातून उपलब्ध निधीतून भागविण्यात यावा.
संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास या संबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे. असे या आदेशात म्हटले आहे.
सदरील शासन निर्णय हा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निगर्मित करण्यात आला असून या आदेशावर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचीव नंदा मारोती राऊत यांची स्वाक्षरी आहे.
आ. नमिता मुंदडा यांचे विशेष प्रयत्न


सदरील निधी उपलब्ध करून घेण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
आ. नमिता मुंदडा या स्वतः एक आर्किटेक्ट असून केज विधानसभा मतदारसंघातील पुरातत्व काळातील वास्तु आणि मंदिरे जतन करून त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. याच माध्यमातून त्यांनी जोगाई सभामंडप दुरुस्ती साठी विशेष निधी मिळवून देण्यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे सतत पाठपुरावा केला होता.
संकलेश्वर मंदिराचे महत्त्व


११ व्या शतकातील चालुक्य कालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील (संकलेश्वर) बाराखांबी मंदीर हा प्राचीन काळातील वास्तुकलेचा अत्यंत मौलिक असा ठेवा आहे.
बारा दगडी खांबाच्या आधारावर अत्यंत सुबक आणि रेखीव कोरीव काम केलेल्या या मंदिरातील तळघरात शिव मंदिर आहे. ज्या बारा दगडी खांबावर हे मंदिर उभे आहे त्या बाराही खांबावर अत्यंत देखणे शिल्प कोरल्या गेले आहे. शिवाय या परिसरात अत्यंत देखण्या व अर्धवट फोडलेल्या अनेक मुर्तींचे भग्न अवशेष पहावयास मिळतात. या मंदिराचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी शिवप्रेमी मंडळींनी मागील काही वर्षांपासून येथे वार्षिक उत्सव ही चालू केला आहे.