महाराष्ट्र
स्वराज्याच्या धाकल्या धान्याचं जीवन सांगणार नव्या पिढीचे गाणं;शंभुगाथा!

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती… शंभूराजांना स्वराज्यरक्षक म्हटलं काय किंवा धर्मवीर म्हटलं काय. त्यामुळे त्यांचं शौर्य, साहस, धाडस, पराक्रम, बलिदान यात तसूभरही फरक पडणार नाही. त्यामुळे स्वराज्यरक्षक की धर्मवीर या वादातच न पडता संभाजी महाराज नेमके काय होते? कोण होते? कसे होते? हे मांडायचं म्हणून लिहिलेलं गीत म्हणजे ही शंभूगाथा.
शंभुगाथा कसं लिहीलं?
शंभूगाथा सुरुवातीला लिहिली ती हिंदी भाषेत. अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्या राजाची गौरवगाथा पोहोचावी या उद्दिष्टाने हिंदी मध्ये लिखाण पूर्ण केलं… पण त्यानंतर लक्षात आलं की, आपल्या भाषेत आपण जे मांडू शकतो ते इतर कोणत्याही भाषेपेक्षा उत्तमच मांडू शकतो. शिवाय मराठीचा आग्रह हा मुद्दाही होताच! मग पुन्हा नव्यानं शंभूगाथा लिहायला घेतली, यावेळी मराठी भाषेत!

लेखक विक्रांत शिंदे तर गायक जितेश शंकर
गाण्याचा लेखक विक्रांत शिंदे, संगीत विशारद मल्हार फडके, रॅपर आदित्य कदम उर्फ Naav Addy, गायक जितेश शंकर, गाण्याचं मिक्सिंग आणि मास्टरिंग करणारे विराट भुशेट्टी यांच्यासोबत हे गाणं पूर्ण झालं. या गाण्याचं चित्रीकरण अमृत दुधाने आणि प्रथमेश शिंदे यांनी केलं असून व्हिडिओ बनवण्याची जबदारी अभिषेक गायकवाड यांनी पार पाडली आहे.
गाण्यामध्ये नक्की काय?
१६५७ साली शंभूराजांचा जन्म झाला तिथपासून ते १६८९ साली शंभूराजेंवर अनन्वित अत्याचार करून त्यांचा देह संपवला तिथपर्यंतचा संपूर्ण प्रवास या साधारण 6 मिनिटांच्या गाण्यात मांडला आहे… शंभूराजांचा अभ्यास, शस्त्र – शस्त्र दोन्हीवर त्यांचं असलेलं प्रभुत्व या गाण्यात आहे… पुरंदरचा तह झाला त्यावेळी ओलीस राहिल्यानंतर राजांनी जवळून पाहिलेली मुघलाई, शंभूराजांनी केलेली पहिली लढाई… शिवरायांचा राज्याभिषेक या गाण्यात आहे. शिवाय शिवरायांनंतर छत्रपती झालेल्या शंभूराजांनी स्वराज्य कसं सांभाळलं, विस्तारित केलं हेही या गाण्यात मांडण्यात आलं आहे… शंभूराजेंचा शेवट मांडणं कठीण असलं तरी तोही मांडून या गाण्याचा शेवट करण्यात आला आहे.
