महाराष्ट्र

मांजरा धरणातील पाण्याला शुन्य पातळीची ओढ..!

धरणातील सहा मीटर उंचीच्या गाळाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

बीड लातूर उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या केज तालुक्यातील मांजरा धरणातील पाण्याने आता शुन्य पातळी गाठली असून पाणी टंचाई चे तीव्र संकट या विभागात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सोबतच मांजरा धरणात गेली अनेक वर्षासोबत पावसाच्या पाण्यासोबत वाहुन येणाऱ्या मातीने धरणाच्या एकुण ऊंचीपैकी सहा मीटर पर्यंत उंचीचे क्षेत्र गाळाने व्यापले असून गाळाने व्यापलेल्या या क्षेत्राकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील दुष्काळभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७१ साली मांजरा मध्यम प्रकल्पास मंजुरी दिली. ६१६०.४० लक्ष रुपये खर्चून उभारण्यात आला होता. २६०.१० एकुण लांबी असलेल्या आणि २५.५५ मीटर ऊंची असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून या विभागातील २,३७१ चौ.कि.मी. एवढी जमीन सिंचनाखाली येईल असा हा महत्वकांक्षी प्रकल्प होता.


१९७१ साली मंजूर करण्यात आलेला हा महत्वकांक्षी प्रकल्प ९ जून १९८५ रोजी पुर्ण झाला आणि या प्रकल्पात पाणी साठवण करण्याची प्रक्रिया सुरु झाली. १९८५ ते २०२४ या कालावधीत या धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाची आणि या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्तोत्राव्दारे वाहुन येणाऱ्या पाण्याची आणि पाण्यासोबत वाहुन येणाऱ्या (शेत जमिनीतील मातीची) गाळाची साठवण या मांजरा धरणाच्या प्रचंड महाकाय असणाऱ्या २५.५५ मीटर उंचीच्या भितीने आजवर केली आहे.
अधिकृत माहिती नुसार मांजरा धरणात २०१७ साली जेंव्हा पाण्याचा एक ही थेंब नव्हता तेंव्हा मांजरा धरणात ५.५ मीटर उंचीचे क्षेत्र गाळाने व्यापलेले होते. आज सहा-सात वर्षांनंतर गाळाने व्यापलेले हे उंचीचे क्षेत्र सहज सहा मीटर उंचीपर्यंत जावून पोहोचले असेल!

२०१७ साली गाळ काढण्यासाठी मानव लोक ने घेतला होता पुढाकार

२०१७ साली मांजरा धरणाचा तळ उघडा पडल्यानंतर या विभागातील नद्यांचे खोलीकरण करुन त्यांना पुर्नजीवीत करण्यासाठी मानवलोकने पुढाकार घेतला होता. त्यावेळी मानवलोकचे कार्यवाह र्डॉ. व्दारकादास लोहिया या कामांवर विशेष लक्ष ठेवून होते. यावेळी कळंब परिसरात मांजरा नदीच्या खोलीकरणास सुरुवात ही करण्यात आली होती. मात्र २०१७ साली सप्टेंबर मधील परतीच्या पावसाने धरण भरले आणि खोलीकरणाचा विषय बाजुला पडला.

४२ वर्षात फक्त १५ वेळेसच                         पुर्ण क्षमतेने भरले धरण!

मांजरा धरणाची निर्मिती झाल्यापासून आज पर्यंत फक्त १५ वेळेसच धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याच्या नोंदी आहेत. २०१७ च्या मार्च मध्ये २२४.०९ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेले हे महाकाय धरण कोरडे ठक्क झाल्याचे आपण पाहीले. पुढे २०१७ मध्येच सप्टेंबर महिन्यात झालेल्या सात दिवसाच्या परतीच्या पालसात हे धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे २२ सप्टेंबर ला या धरणाचे सहा दरवाजे उघडुन धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. २०१७ नंतर २०२०, २०२१ आणि २०२२ साली मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. आता पुन्हा यावर्षी मांजरा धरण भरण्याची प्रतिक्षा या विभागातील नागरिकांना करावी लागणार आहे.

ही आहेत चार कारणे

प्रदुषण, वाळु ऊपसा, साचत जाणारा गाळ आणि वाढती धुप
या प्रमुख चार कारणांमुळे मांजरा धरणात नदी व नाले यांच्या माध्यमातून येणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला असल्याचे अभ्यासक सांगतात. बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विभागातुन वाहत जाणाऱ्या या मांजरा नदीचा प्रवाह गेली अनेक दशकापासून कमी होत चालला असुन काही वर्षानंतर या नदीचा प्रवाह पुर्णपणे बंद होवून या विभागात वाळवंट सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असा दावा मँगॅसेस पारितोषिक विजेते पाणीवाले बाबा राजेंद्र सिंह यांच्या सह अनेक जलतज्ञांनी २०१४ च्या २७ आणि २८ ऑगस्ट रोजी मानवलोक येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय “ग्राम विकासासाठी सक्षम जलनिती” परीषदेत केला होता. जैन एरीगेशन सिस्टीम लि;, गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव, मानवलोक आणि अफार्म या चार संस्थांच्या वतीने ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. मांजरा नदीच्या पात्रातील सतत वाढत जाणारे प्रदुषण, मोठ्या प्रमाणात होणारा वाळु उपसा, मोठ्या प्रमाणात साचत जाणारा गाळ आणि नदी काठची वाढलेली धुप ही या नदीतील पाणी प्रवाह कमी होत असल्याची चार प्रमुख कारणे असल्याचे मत जलतज्ञांनी यावेळी व्यक्त केले होते.

गाळ काढण्याची प्रक्रिया पुन्हा                       सुरु करण्याची गरज


आजच्या स्थितीत मांजरा धरणात खुप मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. प्रशासनाच्या अधिकृत माहिती पृरमाणे धरणातील गाळ जवळपास सहा मीटर ऊंची पर्यंत जावून पोहोचला आहे. याचा अर्थ मांजरा धरणातील पाणी साठवण क्षमता ही सहा मीटर उंचीच्या क्षेत्रापर्य़त निश्चितपणे काही प्रमाणात कमी झाली आहे. मांजरा धरणात अधिक पाणी साठा जमा होण्यासाठी मांजरा धरणातील शेवटच्या काठापासून पाण्याखाली नसणारे क्षेत्र पकडून या धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम तातडीने मोठ्या प्रमाणावर सुरु केले तर यावर्षी होणा-या पावसाळ्यात मांजरा धरणातील पाणी साठवण क्षमतेत निश्चितपणे थोडी का होईना वाढ होईल.

प्रशासनास गांभीर्य नाही


जलतज्ञांनी सांगितल्या प्रमाणे मांजरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात होणारा वाळु ऊपसा, वाढत जाणारे प्रदुषण, नदीतील गाळ काढुन नदी पुर्नजीवीत करणे आणि वाढत जाणारी धुप थांबवणे या चार कारणांवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून मांजरा नदीचा सतत कमी होणारा पाणी प्रवाह रोखून तो वाढवण्यासाठी जाणीवपुर्वक उपाय योजना करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाने या बाबत आज पर्यंत ठाम भुमिका घेतली असल्याचे दिसून येत नाही.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker