महाराष्ट्र

महाशिवरात्री विशेष: अंबाजोगाई शहरात २४ मोठी शिवमंदीरे!

पुरातन काळात अनेक शिवमंदीरात होत होती रसविद्देच्या माध्यमातून सोन्याची निर्मिती!

अंबाजोगाई शहर व परिसरात ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेली २४ शिवमंदीर आहेत. यापैकी भुचरनाथ मंदिर हे तर १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ वेळ ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील वैजनाथांच्या विवाह सोहळ्याचा साक्षीदारच आहे.
याशिवाय सकलेश्वर, खोलेश्वर, अमृतेश्वर, पुत्रेश्वर, खोपरनाथ या प्रमुख मंदिरांच्या निर्मितीला ही एक स्वतंत्र इतिहास आहे, धार्मिक महत्त्व ही आहे. यांच्या वेगवेगळ्या आख्यायिका ही आहेत. शहर व परिसरात एकुण २४ मोठी शिवमंदीरे अस्तित्वात आहेत. याशिवाय शहरातील प्रत्येक मंदिरात महादेवांची मूर्ती ही असतेच!


अंबाजोगाई शहर आणि परिसरात पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली शिवमंदीरे आज ही सतत गजबजलेली असतात. या शिवमंदिरांपैकी अनेक मंदिरात प्रतिदिनी जावून शिवाचे दर्शन घेण्याचा नियम आज ही अनेकजण नित्यनेमाने पाळतात. या संदर्भात पुरातन काळातील लोक आज ही सांगतात, ” महादेवाला प्रिय असलेल्या जवा चे पोते घेऊन आपण महादेवाच्या दर्शनासाठी निघालो आणि दिवसभरात प्रत्येक शिवमंदीरात एक एक मुठ जवा शिवाला अर्पण केली तर सायंकाळ पर्यंत एक ही जवा या पोत्यात शिल्लक राहणार नाही. एवढी शिवमंदीरे या परिसरात आहे. अलिकडे तर प्रदीप मिश्रा यांच्या शिवकथेतील “एक लोटा जल; हर समस्या का फल” या वाक्यानंतर तर प्रत्येक शिवमंदीरात मोठी गर्दी होवू लागली आहे.


महाशिवरात्री च्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर व परिसरातील शिवमंदिरांचा धांडोळा घेत फिरुन या संदर्भात माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. अनेक मंदिरात जाऊन नित्यनेमाने दर्शन घेणा-या भाविकांनी, पुजा अर्चा करणा-या गुरुजींशी आणि शहर व मंदिरांचा अभ्यास असलेल्या जाणकारांशी संवाद साधण्याचा योग जुळून आला.
अंबाजोगाई शहर आणि परिसरातील पुरातन काळातील ही शिवमंदिर केवळ मंदीराच नसून ती रसविद्देची केंद्र असल्याची महत्वाची माहिती ही चर्चा करताना उजेडात आली. महाशिवरात्री च्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर व परिसराचे ज्येष्ठ अभ्यासक भगवानराव शिंदे यांच्याशी शहर व परिसरातील शिवमंदीरां विषयी अनौपचारिक गप्पा मारतांना त्यांनी ही अतिशय महत्वाची माहिती उजेडात आली आहे.


या संदर्भात बोलताना भगवानराव शिंदे यांना अंबाजोगाई व शहर परिसरात २४ शिवमंदीर असल्याची माहिती मला प्राप्त झाली असून यामध्ये किती सतत्या आहे? हा प्रश्न विचारला असता त्यांनी ही माहिती दिली आहे.
या संदर्भात विस्ताराने सांगताना भगवानराव शिंदे पुढे म्हणाले की, अंबाजोगाई शहर व परिसरातील मंदिराविषयी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. चि. ढेरे यांनी लिहिलेल्या “रथचक्र” या पुस्तकात शहर व परिसरातील शिव मंदिराचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात अंबाजोगाई शहर व परिसरात पुरातन शिवमंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे असे म्हटले आहे. शहर व परिसरात असलेली बुट्टेनाथ, नागनाथ, खोपरनाथ, खोलेश्वर, सकलेश्वर, अमृतेश्वर, भुचरनाथ, पुत्रेश्वर, नागझरी ही प्रमुख शिवमंदीरे असली तरी शहराच्या विविध भागात अनेक शिवमंदीरे आज ही अस्तित्वात आहेत.
पुरातन काळात ही शिवमंदीरे ही केवळ मंदिराच नसून ती रसविद्देची केंद्र होती असा उल्लेख ज्येष्ठ इतिहास संशोधक -आभ्यासक प्रा. चि. ढेरे यांनी लिहिलेल्या “रथचक्र” या पुस्तकात असल्याचे त्यांनी सांगितले.


“रसविद्देची केंद्र म्हणजे काय?” या प्रश्नाचे स्पष्टीकरण देतांना ते पुढे म्हणाले की, पुरातन काळातील ही शिवमंदीरे केवळ शिवमंदीरे नव्हती तर या मंदिरात “पारा” या द्रव्यांपासून बांबू घ्या सहाय्याने “सोनं” बनवण्याची प्रक्रिया करण्यात येत होती. या प्रक्रियेला “रसविद्दा” असे म्हणतात. हा काळ या विभागात शाक्त पंथाचे वर्चस्व होते तेंव्हाचा काळ असावा.
या काळात शिवमंदिरात वावरणारे “साधु-संत” हे केवळ साधुसंतच नव्हते तर त्याकाळातील शास्त्रज्ञ होते. हे या रसविद्देच्या माध्यमातून पा-यापासुन सोनं बनवण्याचे काम करीत असत.
याचाच संदर्भ देताना ते पुढे सांगतात की, त्याकाळी अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या पुस आणि देवळा या दोन गावांचा संदर्भ ते देतात. पुस त्याकाळचे पुण्यग्राम येथे व्यास ऋषींचा पुत्र शुक यांचा निवास होता. या ठिकाणी ते तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. या तपस्सेचा भंग करण्यासाठी रंभा या पुण्यग्रामी आली आणि तिने तपस्सेचा भंग केला. याच ठिकाणी “शुकरंभा” मंदिर अस्तित्वात आले. शुक आणि रंभा यांचे हे मंदीर आहे. या मंदिरासमोर गरम पाण्याचा झरा असलेले एक कुंड होते. या कुंडातील पाण्याचा वापर हे साधुसंत रसविद्देच्या प्रक्रियेसाठी करीत असत.


याच सोबत देवळा या गावी महादेव आणि पार्वती यांची दोन वेगवेगळी मंदिरे आहेत. या मंदिरासमोर गरम आणि थंड पाण्याची दोन कुंड आहेत. या कुंडात नवरा नवरी चे कुंड असे ही नावं आहे. या कुंडापैकी गरम पाण्यातील कुंडातील पाण्याचा वापर रसविद्देच्या प्रक्रियेसाठी करण्यात येत असे. या दोन्ही गरम पाण्यातील कुंडात वाळलेल्या बांबुचा तुकडा टाकला तर दुस-यादिवशी त्या बांबुंच्या तुकड्याला नव्या पालखीचे कोंब फुटण्यास सुरुवात होत असल्याचे सांगितले जाते. या सर्व गोष्टींचा उल्लेख ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक प्रा.चि. ढेरे यांनी लिहिलेल्या “रथचक्र” या पुस्तकात असल्याचे त्यांनी सांगितले.


अंबाजोगाई शहर व परिसरातील संकलेश्वर, अमृतेश्वर, खोलेश्वर, काशीविश्वनाथ, भुचरनाथ, खोपरनाथ, नागझरी ही शिवमंदीरे महाशिवरात्री च्या दिवशी गजबजलेली असतात. या शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ही प्रतिवर्षी करण्यात करण्यात येते, वर उल्लेख केलेली सर्व शिवमंदिरांना एक स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व शिवमंदारांच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. या सर्व बाबींचा उहापोह पुन्हा सविस्तर प्रसंगानुसार करु.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker