मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाई तालुक्यात तरुणांची आत्महत्या


गिरवली गावात पाण्याच्या टाकीवरुन मारली उडी
तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणानेमराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२७) रात्री ११.३० वाजताच्या घडली. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतर अधिकृत माहिती समोर येऊ शकणार आहे.
शत्रुघ्न याने आरक्षणासंदर्भात दिल्या घोषणा
शत्रुघ्न काशीद हा गिरवली येथील मुळ रहिवासी असून तो अंदाजे ४०-४५ वयोवर्षाचा असावा. १० वी उत्तीर्ण असलेला शत्रुघ्न हा गिरवली परिसरातील एका हॉटेलमध्ये कुक हणून काम करीत होता. काल रात्री १०:३० च्या सुमारास तो गावातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा देत होता. शत्रुघ्न यांच्या घोषणांचा आवाज ऐकुन गावातील लोक जमा झाले व त्याला खाली येण्याची विनंती करु लागले. त्याला टाकीवरुन खाली आणण्यासाठी गावातील माणसं टाकीवर जावू लागली की तो उडी मारेल असे गावकऱ्यांना सांगत होता. त्यामुळे गावकऱ्यांनी टाकीवर चढण्याचे धाडस केले नाही.
पोलीस व गावकऱ्यांसमक्ष मारली उडी
शत्रुघ्न पाण्याची टाकीवर चढून मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा देत असल्याची माहिती बर्दापुर पोलिसांना कळताच बर्दापुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शत्रुघ्न यास खाली येण्याची विनंती केली मात्र शत्रुघ्न न खाली न येता पोलीस आणि गावक-यांसमक्ष टाकीवरुन खाली उडी मारली. यासर्व घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
शत्रुघ्न याने टाकीवरुन खाली उडी मारताच त्यास पोलीस व गावकऱ्यांनी तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले होते.
वृध्द आई-वडील, पत्नी आणि तीन मुले
शत्रुघ्न काशीद यांचे वयोवृद्ध आई वडील आणि त्याची पत्नी व तीन मुले हे गिरवली गावात रहात असत तर त्याचा एक मोठा भाऊ हा अंबाजोगाई येथे व्यवसायाच्या निमित्ताने स्थायीक झाला आहे. आज २८ ऑक्टोबर रोजी शत्रुघ्न यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. यानंतर पोलीस हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. या नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.