मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन तर भरकटत नाही ना?; अशोक गुंजाळ


सदरील लेखाचे लेखक अशोक गुंजाळ हे अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक आहेत. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी सर्वप्रथम १९८० च्या दशकात आंदोलन सुरू केले होते. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी मराठा समाज म्हणून संबोधण्यात यावे आणि ओबीसी मध्ये या जातीचा समावेश करण्यात यावा अशी त्यांची मागणी होती.याचसाठी त्यांनी महाराष्ट्र कुणबी मराठा समाज संघटना स्थापन करुन ही चळवळ संपुर्ण महाराष्ट्रात रुजवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्याकाळी मराठा समाजातील काही घटकांनी या मागणीला फारसा प्रतिसाद दिला नसल्यामुळे ही चळवळ मागे पडली. आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणाची ही चळवळ जोरात सुरु आहे. या आंदोलना संबंधी अशोक गुंजाळ यांनी लिहिलेला हा लेख “माध्यम” च्या वाचकांसाठी, जशाच्या तसा…!
एका जंगलात एक वाघीण व्याली. तिला दोन छावे झाले. वाघीण जंगलात फिरताना तिचा एक बछडा तिच्यापासून दूर झाला आणि एका मेंढ्यांच्या कळपात घुसला. संगतीचा परिणाम म्हणून तो छावा मेंढराप्रमाणेच गवत खाउ लागला. त्याप्रमाणेच आवाजही काढू लागला. तो छावा “मेंढरंमय” झाला. कालांतराने तो मोठा झाला. पण मेंढराप्रमाणे वागण्याची त्याची सवय जाईना.
एकदा एका वाघाने जंगलात डरकाळी फोडली.तेंव्हा मेंढराच्या कळपातील छाव्याने ती ऐकून तशीच डरकाळी फोडली आणि त्याच्यातला वाघ जागा झाला.


निजाम काळात नवाबी, पोलीस पाटीलकी , पाटीलकी,देशमुखी मिळविण्यासाठी अनेकांनी निजामाचे मांडलीकत्व स्विकारले. कुणब्याला आपण यापैकीच एक आहोत असे वाटू लागले.
मरावाड्यातील कुणब्यांना “मी कुणबी आहे” याची जाणीव करून देण्यासाठी गेली चाळीस वर्षे आम्ही हाडाची काडं करून फिरतो आहोत. त्याचे फलित आज आम्हाला मिळत आहे. मराठवाड्यातील कुणबी स्वत:ला कुणबी म्हणवून घेत स्वत:च्या हक्कासाठी झगडतो आहे.
मराठवाडाभर मेळावे, बैठका, सामूहिक लग्नं याद्वारे ही जनजाग्रुती सुरु आहे.


सामूहिक लग्नाचा उद्देश, समाजाची एकत्र लग्न लावल्यामुळे लग्नाचा येणारा खर्च विभागून जातो. लग्नासाठी कुणब्याला “रीन” घ्यावे लागत नाही किंवा शेती विकावी लागत नाही.
मराठवाड्यातील कुणब्यांना “कुणबी मराठा” प्रमाणपत्र द्या अशी मागणी महाराष्ट्र कुणबी मराठा समाज संघटनेची होती व आहे. या कामासाठी मा.गोपीनाथरावजी मुंडे उपमुख्यमंत्री असताना शासन दरबारी त्यांनी सक्रिय सहकार्य केले. खत्री आयोगासमोर समाजाचे म्हणणे मांडण्याची संधी दिली.
मा.जयदत्त अण्णा क्षिरसागर, बीड यांनी केंद्रीय मागासवर्ग आयोग यांच्यासमोर समाजाची मागणी मांडण्यासाठी मोठ्या कष्टाने संधी उपलब्ध करून दिली.
मा.विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना कुणबी मराठा समाजाचा ईतर मागास वर्गीयांमधे समावेश झाला. मराठवाड्यात “कुणबी मराठा” राहतो हे शासनाने मान्य करावे व कुणबी मराठ्यांना जीआर प्रमाणे ईतर मागासवर्गीयांच्या सवलती द्याव्यात ही आमची मागणी १९७५ सालापासून होती. ती आता पदरात पडण्याच्या मार्गावर आहे.


मनोज जरांगे, आपल्या उपोषणाची सुरवात कुणबी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या या मागणीने झाली. पण आपले आंदोलन भरकटत गेले आणि आपण सरसकट मराठ्यांना “कुणबी मराठा” प्रमाणपत्र द्या मागणीचा असा विस्तार केला.
आपले आंदोलन भरकटले आहे. याची “पाल” मनात चुकचूकण्याचे कारण खालील प्रमाणे,
तुमच्या सभांचे आयोजन, होणारा
खर्च, लागणारी उपस्थिती.शेतात राबणाऱ्या कुणब्याच्या मनास पटत नाही.
राळेगणसिद्धी चे अण्णा हजारे दिल्लीच्या काँग्रेस सरकार विरोधात असेच पेटून ऊठले होते. त्यांची मूळ मागणी आणि आंदोलनाचा शेवटचा प्रवास असाच भरकटत गेला होता याची जाणीव आपणास असावी.
अण्णा हजारेंचे आंदोलन त्यांना रसद पुरवून भाजप वाल्यांनी हायजँक केले आणि अण्णांना राळेगणसिद्धीच्या देवळात नेउन बसवले.
कुणबी समाजातल्या एकाही माणसाला सोबत न घेता,विश्वासात न घेता हुकूमशहासारखे आपण एकहाती आंदोलन रेटत नाहीतना ?
तुकाराम महाराज म्हणतात,
“बरे झाले कुणबी केलो,
नाहीतर दंभेची असतो मलो.”
कुणब्यांच्या नावावर आपण “अहंकार” पोसत तर नाहीत ना ? याचा विचार करावा. बेडकाने कितीही शरिर फुगवले तरी त्याचा बैल होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आपणास ठावेच आहे.
१४ आँक्टोबरपूर्वी वेळ काढून चिंतन,मनन करा. एवढेच.


लेखक: अशोक गुंजाळ
सचीव, महाराष्ट्र कुणबी मराठा समाज संघटना, कार्यालय अंबाजोगाई, मोबा. ९४२२२ ४२४५०