भारत जोडो पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद; २३० पदाधिका-यांसह ६० कंटेनर चा सहभाग


कॉंग्रेस चे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत (Bharat Jodo Yatra) आहेत. या यात्रेच्या दरम्यान राहुल कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3,500 किमीची पदयात्रा करणार आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सुमारे 230 काँग्रेस पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले असून ते 60 कंटेनरमध्ये रात्र घालवतील आणि विविध ठिकाणी जातील, असं पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितलं.
राहुल गांधी यांनी 3500 किमी अंतराची काढलेली पदयात्रा सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहे. त्यातच आता राहुल गांधी एसी कंटेनर वापरत असून, बाकीच्या सोईसुविधांनीयुक्त असलेले कंटेनर इतर नेते वापरणार आहेत.
हे ६० कंटेनर दररोज रात्री दोन एकरातील तात्पुरत्या शिबिरांच्या ठिकाणी ठेवलेले असतात आणि तिथे जेवण किंवा बैठका घेण्याची कोणतीही सोय नसते. कंटेनरमध्ये टीव्ही किंवा पंखे नसतात, अशी माहिती पीटीआयने जयराम रमेश यांच्या हवाल्याने दिली होती. मात्र अशातच या कंटेनरचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही कंटेनरमध्ये एक-बेड आहे, तर काहीत दोन, चार तर काही कंटेनर मध्ये 12 बेड आहेत. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची दोन बेडच्या कंटेनरमध्ये तर इतरांची सहा किंवा 12 बेडच्या कंटेनरमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.


या व्हायरल झालेल्या व्हिडिओत कंटेनरमध्ये अॅटॅच बाथरुम असल्याचं आणि काहींमध्ये एसी असल्याचं दिसतंय. शिवाय शिबिराच्या ठिकाणी यात्रेकरूंसाठी फिरती टॉयलेट्सदेखील आहेत. राहुल गांधींसह 230 यात्री 3,570 किमीचे संपूर्ण अंतर पार करणार आहेत, त्यापैकी काही ‘अतिथी यात्रीं’ ना थांबण्याची सोय कंटेनरमध्ये केली जाईल. तसंच या यात्रेकरूंना खादी पिशव्याही देण्यात आल्या असून त्यात पाण्याची बाटली, छत्री आणि टी-शर्ट देण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी एक वेगळा आणि सारखाच ड्रेसकोड पदयात्रीतील सहभागींसाठी ठरवण्यात आले असल्याची ही जयराम रमेश यांनी सांगितलं.
कंटेनर कलरकोडेड झोनमध्ये पार्क केले जातात. यलो झोनमध्ये असलेल्या कंटेनरमध्ये फक्त एकच बेड, एसी, फ्रीजही आहे. अशाच एका कंटेनरमध्ये राहुल गांधी राहत आहेत. या कंटेनरला 1 नंबर देण्यात आलाय. तसंच त्यावर महात्मा गांधींच्या एका मोर्च्याचं चित्र लावलं असून, त्यावर “तुम्हाला जगात हवा असणारा बदल व्हा,” असं लिहिलंय.


▪️महिलांसाठी स्पेशल कंटेनर
शिबिराच्या ठिकाणी पिंक झोनमध्ये (Pink Zone) पार्क केलेले कंटेनर महिला यात्रेकरूंसाठी आहेत. यामध्ये चार बेड-लोअर आणि अप्पर डेक आणि अॅटॅच बाथरूम आहेत. रेड आणि ऑरेंज झोनमध्ये, कंटेनर बंक बेडसह सुसज्ज आहेत. यामध्ये चार लोक राहू शकतात, पण यात अॅटॅच बाथरुम नाही.
▪️भाजपाचे आरोप फेटाळले
कंटेनर चीनमध्ये बनवल्याचा आरोप रमेश यांनी फेटाळून लावला. हे कंटेनर टाटा कंपनीने बनवले असून, खासगी कंपनीचे असून उद्योगपती अदानी यांनी बनवलेले नाहीत, असा टोलाही या वेळी रमेश यांनी लगावला. तसंच या कंटेनरमध्ये अतिशय मूलभूत सुविधा आहेत, ज्या एसी रेल्वेच्या डब्यात प्रवास करताना असतात, असं त्यांनी सांगितलं.
150 दिवस, 12 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे महिला कार्यकर्ते, दलित संघटना, पर्यावरणवादी, पत्रकार आणि इतर लोकांशी संवाद साधणार आहेत.
▪️पाच तासाचा ब्रेक
काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्यासाठी ड्रेस कोडचाही विचार केला गेला आहे. त्याबरोबरच त्यांचे राहणे, जेवणाची व्यवस्थाही केली गेली आहे. पदयात्रा करणाऱ्यांसाठी पाच तासाचा ब्रेक, सणसमारंभासाठी सुट्टी, कपड्यांपासून ते अगदी बेडसीट धुण्यापर्यंतची व्यवस्था केली गेली आहे.
▪️पदयात्रेसाठी 60 कंटेनर
या पदयात्रेसाठी 60 कंटेनरचा एक ताफाच या भारत जोडो यात्रेबरोबर आहे. या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांना हॉटेलची व्यवस्था मिळाली नाही मात्र त्यांना कोणत्याही सुविधांपासून त्यांना लांबही ठेवण्यात आले नाही.
▪️जयराम रमेश यांची टीका
भाजपवर (BJP) निशाणा साधत रमेश म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेला बदनाम करण्यासाठी भाजपच्या आयटी सेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनाने केलेले आरोप हे दाखवतात की भाजपला आमच्या यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे धक्का बसला आहे.