राष्ट्रीय

भारत आणि नेपाळ सांस्कृतिक अनुबंध; प्रा. डॉ. देविदास खोडेवाड

भारत आणि नेपाळ सांस्कृतिक व भाषिक अनुबंध सातवे ‘शब्द’ विश्व मराठी साहित्य संमेलन मा. श्री. दगडू लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली नेपाळ (काठमांडू) येथे संपन्न झाले. या संमेलनात परिसंवाद सत्रात वरील विषयावर केलेल्या मांडणीचा घोषवारा या लेखाच्या माध्यमातून मांडत आहे. भारतीय संस्कृती प्रमाणेच नेपाळची संस्कृती ही समृद्ध आणि विविधतेने नटलेली असून ती वैश्विक संस्कृती पैकी एक मानली जाते. नेपाळी संस्कृतीला शेकडो वर्षाची परंपरा असून ती परंपरेने क्रमशः विकसित होत आलेली आहे. अठराव्या शतकात गोरखा चे शहा वंशीय राजा पृथ्वी नारायण शहा यांनी नेपाळी भूभागाची रचना केली त्यानंतर त्या ठिकाणी पृथ्वी शहा राज्य करू लागला पुढे ब्रिटिशांच्या आगमनानंतर ज्याप्रमाणे भारताला ब्रिटिश आक्रमणांचा फटका बसला त्याचप्रमाणे शेजारील राष्ट्र म्हणून नेपाळलाही त्याचे परिणाम भोगावे लागले नेपाळचा एक तृतीयांश भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बळकावला जो नंतर भारतातील पश्चिम बंगाल राज्यात विलीन झाला.

या भूभागाला सांस्कृतिक व भाषिक एकतेची किनार आहे कोणत्याही शेजारील राष्ट्राचे संबंध हे राजकीय दृष्ट्या प्रेम, द्वेष, शांती आणि युद्धाचेच असतात. पण नेपाळ आणि भारत यांचे संबंध प्रेम आणि शांती असेच अद्वितीय स्वरूपाचे आहेत. हे दोन्ही देश भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळे असले तरी ते सांस्कृतिक आणि भाषिक दृष्ट्या अभिन्न असेच आहेत यांच्यातील सांस्कृतिक परंपरा, सामाजिक-धार्मिक विधी उत्सव, आहार- विहार, वेशभूषा इत्यादी बाबतीत एक वाक्यता आहे. याला महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भारताप्रमाणेच नेपाळ हा देश टक्केवारीच्या तुलनेत जगात मोठे हिंदू राष्ट्र आहे ज्यात 81.3% हिंदू लोक राहतात या दोन्हीही देशाचे संबंध परंपरेने मैत्रीचे आणि व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने घरेलू अशाच स्वरूपाचे आहेत त्यामुळे दोन्हीही देशातील सांस्कृतिक आणि भाषिक अनुबंध घट्ट आहेत.

नेपाळ हा देश उंच उंच पहाडांच्या रांगेत आणि खोल खोल दरीतल्या नद्यांनी व्यापलेला आहे या देशाला नैसर्गिक दृष्ट्या हिरवागार प्रदेश लाभलेला आहे तसेच जगातील चौदा सर्वात उंच शिखरांपैकी आठ शिखरे नेपाळमध्येच आहेत त्यात सर्वात उंच सागरमाथा एव्हरेस्ट शिखर चीनच्या सीमेवर नेपाळ मध्येच आहे . या ठिकाणच्या थंड आणि उंच डोंगरांच्या कुशीत अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनींचा वास आहे. त्यामुळेच या भूमीला पवित्र भूमी असेही म्हटले जाते ने म्हणजे ऋषी व ‘पाल म्हणजे गुफा’ यापासून नेपाळ हे नाव धारण केलेले आहे. त्याचबरोबर ‘ने’ मुनी द्वारा पालीत असणारे नेपाळ हे शंकराचं वस्तीस्थान, गौतम बुद्धाचं जन्मस्थान (लुंबिनी), ऋषीमुनी महान अनुभवांचं निवासस्थान, हिमालयाची पर्वतरांग व डोंगरांच्या गुफासंस्थानात वसलेले आहे. यामुळे या भूमीला शांतता, नम्रता, अध्यात्मिकता, अज्ञाधारकपणा, आणि सामाजिक सांस्कृतिक समृद्धता लाभलेली आहे.

येथील नागरिक ‘डोक्यापेक्षा हृदय वर ठेवतात’ असे म्हटले जाते त्याचे कारण त्यांच्यातील असलेली नम्रता, मेहनत करण्याची तयारी, स्नेहभाव आणि संरक्षण करण्याची वीरता आहे. या गुणवैशिष्ट्यामुळेच ते भारतभर पसरून गुण्यागोविंदाने जगत आहेत भारताप्रमाणेच ‘अतिथी देवो भव या भावनेने सर्वांशी वागतात पाहुणचार हा नेपाळचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. ते येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, प्रेम भावनेने वागवतात, यामुळेच नेपाळचे जे सर्वात महत्त्वाची उत्पन्नाचे साधन ‘पर्यटन’ आहे. याला मोठी चालनाही मिळालेले आहे.

नेपाळी संस्कृतीवर भारत तिब्बत व मंगोली या संस्कृतीचा फार मोठा प्रभाव आहे. उत्तरेला चीनचा केंद्रशासित प्रदेश आहे दक्षिण पूर्व व पश्चिमेला भारत व्यापलेला आहे त्यामुळे त्या त्या प्रदेशातील भाषा, संस्कृतीचा प्रभाव नेपाळी जन-जीवनावर पडून हा देश विविधतेतून एकतेकडे वाटचाल करताना दिसून येतो, म्हणून नेपाळी संस्कृतीला समाज जीवनाचा समृद्ध असा राजमार्ग म्हटले जाते. त्याचबरोबर भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश वैश्विक पातळीवरसामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक आणि सण- उत्सव याबाबतीत समान पातळीवर आचरण करताना दिसून येतात त्याचं कारण या दोन्हीही राष्ट्राच्या भूभागाला ‘जंबुद्वीप’ म्हणून ओळखले जाते. तसेच या दोन्हीही राष्ट्रातील हिंदू धर्मीय संख्येने मोठे असल्यामुळे यातील सांस्कृतिक परंपरा, धार्मिक विधी, सण-उत्सव, आहार-विहार पोशाख, पवित्र अपवित्रतेच्या संकल्पना, विविध वस्तू कला, नाट्यकला, चित्रकला संगीत कला व्यवहार व्यवसायाचे मानदंड याबाबतीत दोन्हीही देश कमी- अधिक प्रमाणात समान पातळीवर दिसून येतात. नेपाळी पोशाखात ‘दौरा सुरुवाल’ ज्याला ‘लाबडा सुरुवात ‘असेही म्हणतात. हा पोशाख धार्मिक श्रद्धा भावाने परंपरेने परिधान केला जातो.’ दौरा’ यात आठ दोर असतात. जे शरीराच्या चोही बाजूने बांधले जातात. याचे बंद गळ्याला गुंडाळले जातात ज्याला शंकराच्या गळ्यातील सापाचे प्रतीक मानले जाते. भारतात अशा प्रकारची ‘बाराबंदी’ स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात पुरुष मंडळी परिधान करत होती आजही काही प्रमाणात राजस्थानमध्ये पुरुष मंडळी हा पोशाख परिधान करतात. गळ्यात सांस्कृतिक विधी उत्सव व मंगलप्रसंगी रंगीबेरंगी उपरणे गुंडाळण्याची पद्धत आजही संपूर्ण देशात आहे ती शंकराच्या गळ्यातील सापाचं प्रतीकच आहे. तसेच सलवार कुर्ती, धोती, जिरे टोपी हा पोशाख दोन्ही देशांमध्ये पुरुष मंडळी परिधान करताना दिसून येतात. नेपाळी महिला साडी (गुनू) परिधान करतात जी आज फॅशनच्या दुनियेत प्रसिद्धीस पावली आहे त्याचबरोबर भारतीय आदिवासी स्त्रिया ज्या पद्धतीने पोलके, गळ्यात उपरणे परिधान करतात तशा पद्धतीचा महिलांचा नक्षीदार कपड्यांचा पोशाख दिसून येतो. आज दोन्ही देशात स्त्री व पुरुष यांच्या पोशाखात प्रचंड बदल झालेला आहे. परंपरा व नवता दोन्हीचाही संगम दिसून येत आहे.

भारताप्रमाणे नेपाळमध्ये धार्मिक विधींना महत्त्वाचे स्थान आहे हे धार्मिक विधी सांस्कृतिक अधिष्ठानावर आधारित आहेत. नामकरण विधी, मंडल विवाह अंतिम संस्कार प्रसंगी विविध विधी केले जातात. भारतात आदिवासी समाजामध्ये भात पीक काढणे, मळणी लावणी प्रसंगी विधी साजरे केले जातात, तसेच नेपाळमध्येही साजरे केले जातात. नेपाळमधील सण उत्सव हे हिंदू आणि बौद्ध देवदेवतावर आधारित आहेत. ते धार्मिक आणि पवित्र दिनाच्या निमित्ताने साजरे केले जातात. ‘दश्र’ आणि ‘तिहार’ धर्मावर आधारित सर्वात मोठे उत्सवही नेपाळमध्ये साजरे केले जातात, तसेच बुद्ध जयंती, गाडी यात्रा, जनाई पौर्णिमा, तीज हे उत्सव भारताप्रमाणेच नेपाळमध्येही साजरे होतात. भारताप्रमाणे नृत्य, नाट्य, चित्र, वस्तू कला, संगीत वाद्य या कलांचा आगार नेपाळ आहे म्हटलं जातं शिवाचं निवासस्थान हिमालय याच ठिकाणी नृत्य कलेचा उगम झाला. आणि जगभर ही कला पसरली. पशुपतिनाथाचं प्राचीन मंदिर याला साक्ष आहे. त्याच पद्धतीने भारतभर एकही गाव नसेल जेथे शिवाचे मंदिर नाही. तसेच नेपाळची ‘पैगोडा ही वस्तू शिल्पाची परंपरा भारतीय मंदिरासारखी आहे. त्यात शिखर, घुमट, कळस दिसून येतात. तसेच ‘स्तूप ‘बौद्ध प्रार्थना स्थळ, चैत्य हॉल, हा कढईच्या आकाराचा आहे. महाल, काठमांडूतील सिंग दरबार शेर पॅलेस, नारायणी पॅलेस, ही भारतीय राजे महाराजे यांचे राजवाडे व प्राचीन शिल्पकलेच्या बांधणी सारखेच आहेत. जैन, बौद्ध, हिंदू यांचे मंदिरे मठ खूप मोठ्या प्रमाणात भारताप्रमाणे नेपाळमध्ये आहेत. संकल्पनात्मक वस्तू कला, क्यूबेक वस्तू कला, चेन्नई वास्तुकला हिंदू मंदिर शैली या सर्व कला भारताच्या परंपरेशी, सांस्कृतिक श्रद्धेशी पूरक अशाच आहेत.

भाषा मानवी जीवनाला समृद्ध करणारे प्रभावी माध्यम आहे. आपले दैनंदिन व्यवहार याद्वारेच पूर्णत्वास येतात भाषेतूनच संस्कृती आकाराला येते आणि इतिहासाला निश्चित अर्थ प्राप्त होतो म्हणून कोणत्याही देशाच्या संस्कृतीची जडणघडण ही भाषेद्वारेच होत असते भारत आणि नेपाळ या दोन्हीही देशात बोलल्या जाणाऱ्या भाषांची लिपी देवनागरी असून भाषिक शब्दावलीचा उत्पत्तीचा भाग समसमान आहे. भारताच्या उत्तरेकडे नेपाळच्या सीमेवर उत्तर प्रदेश व बिहार येथे हिंदी व नेपाळी भाषा सरसकट बोलली जाते. या बरोबरच मैथली, भोजपुरी व अवधी भाषा बोलल्या जातात. या दोन्हीही देशातील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार भाषेद्वारेच सुखकरसांस्कृतिक दृष्ट्या ‘मैथली’ ही ‘सीता’ मातेची जन्मभूमी तेथे ‘मिथिला’ ही बोलीभाषा बोलली जाते. अवध ही रामाची जन्मभूमी तेथे ‘अवधी बोलीभाषा बोलली जाते. तर बिहार सीमेवर ‘भोजपुरी’ बोलली जाते या सर्व भाषा भारत आणि नेपाळ यांच्या सीमा भागातील आहेत त्यांचे सांस्कृतिक अनुबंध घट्ट आहेत. तसेच नेपाळी भारतभर पसरून भारतातील जवळपास सर्वच भाषा व संस्कृतीचे अनुसरण करतात. भारतीय लोकही नेपाळमध्ये व्यापार व्यवसाय व पर्यटनाच्या निमित्ताने दीर्घकाळ राहतात काही नेपाळमध्येच वास्तव्यास आहेत. त्यांना ही भूमी येथील भाषा व संस्कृती आपलीच वाटते. काठमांडू शहरातील वीरगंज येथील 80 टक्के लोक ‘भोजपुरी’ बोलतात तसेच तेथील दुकानावरील पाट्या (औषधी पसल) यांची नावे पाहता यातील ‘औषधी’ हे मराठीत रूढ आहे तर पसल ‘भाषा वेगळी असली, तरी लिपी देवनागरीच आहे. यावरून भारत आणि नेपाळ यांच्यातील भाषिक अनुबंध किती घट्ट आहेत हे स्पष्ट होते.

आज जागतिकीकरणाच्या रेट्यात बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, त्यांचा साम्राज्यवाद, भांडवलशाही वृत्ती आली त्यातून शोषणाचे तंत्र संपूर्ण जगावर लादलं जात आहे. त्यातूनच देशा- देशात स्पर्धा सुरू झाल्या आहेत. अशा स्पर्धेतून सर्वांगीण एकतेचा -हास आज होताना दिसून येत आहे. देशा-देशात आपापसात सीमावाद, वंशवाद, धर्मवाद यावरून वितुष्ठ निर्माण होत आहे. त्यामुळे संस्कृतीचा, मानवी मूल्यांचा -हास होत आहे आपले जवळचे देश दुरावत आहेत. आज नेपाळ हा आपल्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक एकतेशी एकसंघ असलेला देश आहे, मात्र चीनचे आक्रमण आणि आर्थिक बोजाखाली दबलेला आहे. त्यामुळे तो आपल्यापासून दुरावत आहे. नेपाळी समृद्ध प्रादेशिक संपदा आणि जनशक्ती याचा वापर करून चीन आज भारत भूमीवर आक्रमण करत आहे त्याला नेपाळी युवक कडाडून विरोधही करत आहेत भारताशी एकसंघ राहण्याचा प्रयत्न करत आहेत या पाठीमागे मुख्य कारण आहे ते म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेले भारत आणि नेपाळ यांचे सलोख्याचे संबंध व दृढ असलेले सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक अनुबंध..

प्रा. डॉ. देविदास खोडेवाड

मराठी विभाग प्रमुख तथा संशोधन मार्गदर्शक खोलेश्वर

महाविद्यालय अंबाजोगाई.

मो.नं. ९७६४२१०३१३

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker