भारतात २४ तासात २८ विद्यार्थ्यांच्या होतात आत्महत्या; बीड जिल्ह्यात ३ वर्षात १३१ आत्महत्या !




विद्यार्थ्यांवर सातत्याने वाढणारा दबाब आणि त्यातून येणाऱ्या तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मागील १० वर्षात भारतात ८२ हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. देशात २०१८ या वर्षात दर दिवशी २८ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचे नॅशनल क्राइम रेकोर्ड्स ब्युरोच्या अहवालात उघड झाले आहे.
विद्यार्थ्यांवर सातत्याने वाढणारा दबाब आणि त्यातून येणाऱ्या तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मागील १० वर्षात भारतात ८२ हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. देशात २०१८ या वर्षात दर दिवशी २८ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचे नॅशनल क्राइम रेकोर्ड्स ब्युरोच्या अहवालात उघड झाले आहे.
एक जानेवारी २००९ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत आतापर्यंत ८१ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यामध्ये ५७ टक्के विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागील पाच वर्षात झाल्या आहेत. तर, वर्ष २०१८ मध्ये १० हजार १५९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मागील दहा वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. वर्ष २०१८ मध्ये भारतात १.३ लाख जणांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ८ टक्के विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर, बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ही १० टक्क्यांच्या घरात आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक १४४८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तर, तामिळनाडूमध्ये ९५३, मध्य प्रदेशमध्ये ८६२, कर्नाटकमध्ये ७५५ आणि पश्चिम बंगालमध्ये ६०९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या राज्यांमधील विद्यार्थी आत्महत्या या एकूण आकडेवारीच्या ४५ टक्के इतकी आहे.
बीड जिल्ह्यात ३ वर्षात १३१ आत्महत्या
बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांत अल्पवयीन मुलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यात मुलींचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, नैराश्य, व्यसन, प्रेमभंग या कारणांमुळे मुलं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांत १३१ मुलांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे.
आत्महत्या करण्याचे सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे आढळून आले आहे. आजकाल तरुण मुले, मुली ही व्यसनांच्या आहारी जात आहे. त्यांच्यात संयम राहिलेला नाही. पालकांनी जर मुलांना रागविले, अथवा कोणाचा प्रेमभंग झाला तरी मुले लगेच आत्महत्या करतात. पालक व मुले यांच्यातील संवाद हरपला आहे. मुलगा जर ताणतणावात असेल तर पालक हे समाजाच्या भीतीने त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जात नाही. नैराश्य, ताणतणाव, आजारपण, भीती, चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याशी निगडित असलेल्या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत आहेत.


१३१ मुलांच्या आत्महत्या जिल्ह्यात मागील तीन वर्षांत १३१ मुलांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. या सर्व मुलांचे वय हे १८ पेक्षा कमी होते. २०२१ मध्ये ३६ मुलींनी तर २६ मुलांनी आपले जीवन संपवले आहे. चालू वर्षांमध्ये १० मुलींनी तर १५ मुलांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे..
हाती अँड्रॉइड मोबाईल
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वकाही थांबले होते. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हाती अँड्रॉइड मोबाईल आले. काही विद्यार्थ्यांनी याचा चांगला उपयोग केला तर काहींनी वाईट. मोबाईलचा अती वापर, व्यसनाधीनता, रागीटपणा, यामुळे अगदी कमी वयात मुले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. व्यसनाच्या आहारी गेल्याने मुलांमध्ये मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की चिडचिड येत आहे. छोट्या छोट्या कारणांमुळे मनात नकारात्मकता वाढत आहे.
मुलींमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक
मुलांकडून पालकांच्या अपेक्षा या हल्लीच्या काळात वाढत आहेत. पाल्यावर अभ्यासाचे दडपण येत आहे, मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन शिक्षण देणे गरजेचे आहे. अभ्यासाच्या तणावातून किंवा अपयशातून देखील काही विद्यार्थी नैराश्याकडे झुकतात. मुली भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात. मुलांच्या तुलनेत नैराश्याचे प्रमाण मुलींमध्ये अधिक आहे. त्यामुळे नैराश्यातून मुली आत्महत्येचे पाऊल उचलतात…


मुलांमध्ये अग्रेशन वाढले
आजकाल अनेकदा पालक व मुले यांच्यात संवाद होत नाही, त्यामुळे मुलांना काही ताणतणाव व नैराश्य आल्यास ते आपल्या पालकांशी बोलू शकत नाही. त्यातूनच ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. १५ ते २४ वर्षाच्या मुलांना स्वतंत्रता पाहिजे असते. त्यामुळे दखल दिली तर मुलांमध्ये राग वाढतो, चिडचिडपणा व हट्टीपणा वाढतो. कोविडच्या काळामध्ये दोन वर्ष सर्वाधिक स्मार्टफोनचा वापर झाला यामुळे मुलांमध्ये अग्रेशन वाढले आहे. स्वभावात बदल झाले आहेत, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर लगेच टाकाचे पाऊल उचलले जात आहे. यासाठी पालकांचा मुलांशी चांगला संवाद असणे आवश्यक असल्याचे बीड जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ मोहम्मद मुजाहिद यांनी सांगितले.
बहुतांशी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अपयश आल्यामुळे आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय विद्यार्थी आत्महत्येसाठी इतरही कारणे आहेत. अंमली पदार्थांचे सेवन, तणाव, कौटुंबिक कारणे, नातेसंबंध आदी कारणांमुळेही आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.