महाराष्ट्र

भगवानबाबा नारळी सप्ताहाने दिली पंकजा-धनंजय आणि डॉ. नामदेव शास्त्री यांच्या मनोमिलनाची नांदी!

११ एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे घडलेल्या घटनेची नोंद महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील काळात एक वेगळी दिशा देणारी नोंद ठरेल असे म्हटले तर ते फारसं वावगं ठरणार नाही.
बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळवून देण्याचे काम परळी वैजनाथ येथील मुंडे घराण्याने अनेकवेळा केले आहे. याची सुरुवात लोकनेते गोपिनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते असतांनाच केली होती. यावेळेस महाराष्ट्राचे नेतृत्व शरद पवार यांच्या कडे होते तर गोपीनाथ मुंडे यांच्यावर विरोधीपक्षनेते पदाची व भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची ही जबाबदारी होती.

यावेळी विधानसभा निवडणुकी पुर्वी विरोधीपक्षनेते गोपिनाथ मुंडे यांनी शरद पवार सरकार विरुद्ध संपुर्ण महाराष्ट्रात रथयात्रा काढून या यात्रेचा समारोप शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या बारामतीत केला होता. गोपिनाथ मुंडे हे आपल्या सभेत शरद पवार सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रभावीपणे तुटुन पडत असल्यामुळे त्यांच्या भाषणांचे कव्हरेज करणे मला फार आवडायचे. अंबाजोगाई येथील जाहीर सभेनंतर जेवन करतांना मी गोपीनाथरावांना शरद पवारांविरुध्द एवढं सडेतोड बोलतांना तुम्हाला भिंती वाटत नाही का? असा बालीश प्रश्न विचारला होता.

त्यावेळी गोपीनाथराव मुंडे यांनी मला बारामतीच्या समारोपाच्या विशेष सभेस उपस्थित रहा असे सांगत माझ्या तीथं उपस्थित राहण्याची जबाबदारी त्यांच्या खाजगी सचीवावर सोपवली होती. सचीवांनी स्वतंत्र व्यवस्था करुन बारामती च्या सभेला मला नेले होते. या सभेनंतर मला विश्वास आला की या निवडणुकीत शरद पवार यांच्या सरकारला गोपीनाथ मुंडे सुरुंग लावणार. आणि झालेही तसेच! पुढे गोपीनाथराव दिल्लीच्या राजकारणात गेले आणि या दिल्लीच्या राजकारणातच ते संपले ही.

या निवडणुकीत शरद पवार सरकार कोसळले आणि भाजप सेने चे सरकार अस्तित्वात आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून तर गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राच्या या सत्तांतरात गोपीनाथ मुंडे यांची भुमिका महत्वाची ठरली.
गोपीनाथ मुंडे यांची खेळी यशस्वी झाल्यानंतर शरद पवार यांनी यांचा बदला घेण्यासाठी धनंजय मुंडे यांना अलगद राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश देवून आमदार केले आणि धनंजय मुंडे यांच्यावर विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी स्विकारताना धनंजय मुंडे यांनी विद्दमान सरकारच्या धोरणावर खडसावून टीका केली आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत या सरकारचा पराभव करून नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारात मंत्रीमंडळात स्थान मिळवले. यासर्व घडामोडीत धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा होता.

यासर्व राजकीय घडामोडीत पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या राजकीय वितुष्टाने अनेकवेळा पराकोटीचा परमोच्च बिंदू गाठला. तर अनेक जाहीर कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर त्यांनी बहिण भावांचे नाते ही जपले. लोकमत पुरस्कार वितरण कार्यक्रम असो की दस्तुरखुद्द शरद पवार याच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात या बहिण भावांनी आपल्या नात्याची वीण अधिक घट्ट केल्याचे अनेकांनी पाहीले. रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तर मला या बहिण भावांच्या मनोमिलनाचे चित्र यांची देही याची डोळा पहायला मिळाले!

“इव्हरीथिंग आज पॉसिबल इंन पॉलिटीक्स” अशी एक इंग्रजीत म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यंतर अनेकवेळा अनेकांनी पाहिला आहे, अनुभवला आहे. गेली ४० वर्षे सजग पत्रकारिता करताना मी ही अनेक वेळा हे अनुभवले आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या सायकल भ्रमंती पासुन ते मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातील त्यांच्या दमदार वाटचालीचा जसा मी साक्षीदार आहे तसाच क्रिकेटचे निमित्त काढून अनेक पराक्रम करीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ते मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागाची अत्यंत सक्षमपणे जबाबदारी सांभाळणारे धनंजय मुंडे हे ही जवळुन पाहिले, अनुभवले आहेत.


या राजकरणाच्या राहटगाडग्यात अनेक वर्षे आली तशी गेली. धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचे एका उच्च पातळीवरील वादाचे वारे आता स्थिरावत असल्याचे दिसून येत आहे. परवा पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ८९ व्या राष्ट्रसंत भगवान बाबा नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात भगवान बाबांना साक्षी ठेवत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांच्या समक्ष धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि आपल्यात कोणतेही वैतुष्ठ नाही याची ग्वाही समाजबांधवांना दिली आहे. मध्यंतरी गेली सात-आठ वर्षांपासून एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोपांच्या फायरींग झाडणारे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री हे एकाच व्यासपीठावर येण्यामागे राष्ट्रसंत भगवानबाबा यांची प्रेरणा असली तरी या गोष्टी सहज वरवर दिसतात एवढ्या सोप्या नसतात. यांचा सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास व्हायला हवा.

मागील वर्षभरापासून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैतुष्ठ संपवण्यासाठी उच्चपदस्थ पातळीवरुन सातत्याने प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे. भाजपाचे कर्तेधर्ते आणि सर्वस्व असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या अलिकडील बीड जिल्ह्यातील भगवानबाबा आणि संत वामनबाबा यांच्या गडावरील कार्यक्रमांना जिल्ह्यातील एकाही नेत्याला सोबत न घेता लावलेल्या हजेरींचा राजकीय अभ्यास करावा लागेल. धनंजय मुंडे यांना भाजपामध्ये आणण्याची व्युहरचना आखणा-या नेत्यांना पंकजा मुंडे यांना दुर ठेवण्याचा प्रयत्न का करावा लागत होता? याचा अभ्यास करावा लागेल. भगवान गडाचा वाद ठोस कारण नसतांना का लांबवला गेला याचा अभ्यास करावा लागेल. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांना नेमके काय हवे आहे याचा ही अभ्यास या निमित्ताने करायला हवा.

या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला तर आगामी लोकसभा निवडणुकापुर्वी धनंजय मुंडे भाजपा मध्ये आले तर आणि न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री पाथर्डी मधुन भाजपाचे विधान सभेचे उमेदवार म्हणून घोषीत झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण ठरु नये अशी परिस्थिती सध्या आहे. लोकसभा आणि विधानसभा अशी स्वतंत्र वाटणी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मध्ये करण्याचा यशस्वी तोडगा काढून बहिण भावांचे हे कायमचे वितुष्ट संपवण्याचा प्रस्ताव सध्यातरी भाजपाच्या रडारावर आहे. हा प्रस्ताव आखत असतांनाच पंकजा मुंडे यांना बाजुला ठेवण्याचा विचार करणा-या नेतृत्वाला उशीरा का होईना सत्तापालटासाठी सुरु असलेले हे राहटगाडगे पंकजा मुंडे यांना सोबत घेतल्याशिवाय जमणे शक्य नाही याची उपरिती उशिराने का होईना झाली असल्यामुळे पंकजा &धनंजय आणि डॉ. नामदेव शास्त्री यांच्या एकत्रित मनोमिलनाचा हा घाट घातला गेला आहे असे म्हटले तर ते ही चुकीचे ठरणार नाही.

न्यानाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात बोलतांना आणखी तीन वर्षांनंतर आपण गडाचे महंत पद सोडणार असल्याचे जाहीर केले. गोपीनाथ गडाला महंत नाही, मात्र भगवानगडाला महंत असल्याने हा गड टिकला. भगवान बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी प्रयत्न करत आहे. गड शिल्लक राहिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

यासर्व वक्तव्य आणि राजकीय पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या गादीची परंपरा आणि प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करणारे न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत किंवा विधान परीषदेत न दिसले तर नवलच होईल.
राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या नारळी सप्ताहाला मोठी धार्मिक परंपरा आहे. ८९ वर्षापुर्वी भगवानबाबा यांनी सुरु केलेल्या या परंपरेचा मान यावेळी पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी ने मिळवला. या नारळी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात जे राजकीय नाट्य रंगले त्या राजकीय नाट्यातील नायक आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तापालट करतील यात तीळमात्र शंका नाही!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker