बीड जिल्ह्यातील तीन प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी कोण घेणार पुढाकार ?


“घाटनांदुर-श्रीगोंदा”, “लातुर-खामगाव” आणि “सोलापुर-औरंगाबाद” हे तीन रेल्वेमार्ग आहेत प्रस्तावित
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पुर्वी पासुन अंबाजोगाई रेल्वेच्या नकाशावर आणण्याची चर्चा होत असल्याचे अनेक दाखले आहेत. या सर्व दाखल्यातील “परळी बीड नगर” या रेल्वे मार्गाच्या ४० टक्के कामाचे उद्घाटन झाल्यामुळे आता हा अध्याय संपला आहे. अंबाजोगाई शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी आता दुसरा अध्याय सुरु करण्याची आता नितांत गरज आहे.
अंबाजोगाई शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्याच्या पुर्वी पासुन म्हणजे १९४४ पासून चर्चा सुरू आहे. मराठवाड्यावर अधिराज्य गाजवणा-या निजाम सरकारने हा प्रयत्न केला होता. अंबाजोगाई शहर हे हैद्राबाद संस्थानातील सत्ता केंद्रातील एक महत्त्वाचे शहर होते, म्हणून निजिम अंबाजोगाईला रेल्वे आणण्यासाठी उत्सुक होता. पण त्याचा प्रयत्न फसला. यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेकांनी अंबाजोगाई शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न केले तर अनेकांनी रेल्वेच्या नकाशावर आलेल्या अंबाजोगाई चे नांव पुसण्याचे प्रयत्न केले.
राजकारणाचा हा भाग सोडला तरी १९९६-९७ च्या काळात रेल्वेच्या नकाशावर आलेल्या अंबाजोगाई शहरासह केज, नेकनुर, मांजरसुंबा या गावांचे नांव पुसण्याचे आले हा इतिहास न विसरता येणार आहे. यासर्व गोष्टींवर पुर्ण विराम देवून अंबाजोगाई शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठीचा पहिला अध्याय बंद करून आता दुसरा नवा अध्याय सुरु करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आता विचार आणि प्रयत्न करावयास हवेत.


अंबाजोगाई शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी “परळी बीड नगर” हा एकमेव रेल्वे मार्ग होता का? तर नाही असेच उत्तर द्यावे लागेल. केंद्रात भाजपाचे सरकार सर्वप्रथम अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी “परळी बीड नगर” या नियोजित रेल्वे मार्गावरील अंबाजोगाई शहराचे नांव पुसले आणि कांहीं वर्षे अंबाजोगाई शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्याची चर्चाच बंद झाली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज पर्यंत महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त दोन वेळेसच रेल्वेमंत्रालयाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. आज अस्तित्वात असलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे हे कार्यभार पहात आहेत. मात्र या अडीच तीन वर्षांच्या काळात तरी त्यांचा मराठवाड्यातील रेल्वेमार्ग विस्तारीत करण्यासाठी अथवा नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळवून देण्यासाठी काही उपयोग झाला असल्याचे दिसून येत नाही. १९७७ साली कोकणातील मधु दंडवते रेल्वेमंत्री झाले तेंव्हा त्यांनी ५० वर्षांपासून कोकणात सुरु असलेल्या कोकण रेल्वे लढ्याला न्याय देत स्वतंत्र कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना केली. कोकण रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी या कोकण रेल्वे महामंडळाची भुमिका खुप मोठी होती. १९७७ साली मंजूर करण्यात आलेल्या कोकण रेल्वे मार्गावरुन तब्बल २० वर्षांनंतर म्हणजे १९९७ साली प्रथम रेल्वे धावली. आणि कोकण वासीयांचे स्वप्न पूर्ण झाले!


ं
केंद्रात पुन्हा अस्तित्वात आलेल्या भाजपाच्या केंद्रीय मंत्रीमंडळात १९७५ च्या दरम्यान सुरेश प्रभु यांना रेल्वे मंत्रालयाचा कारभार सांभाळण्याची संधी मिळाली. सुरेश प्रभु यांचा रेल्वे मंत्रालयाचा एकुण अभ्यास लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा व राज्यसभेचा सदस्य नसतांनाही त्यांना थेट केंद्रीय रेल्वे मंत्रीपदाची शपथ देवून रेल्वे मंत्रालयाचा कारभार त्यांचेकडे सोपवला. सुरेश प्रभु यांनी रेल्वे मंत्रालयाचा कारभार सांभाळण्यास सुरुवात करताच अंबाजोगाई शहराचे नांव पुन्हा रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. यासाठी यापुर्वीच्या भाजपा सरकारने रेल्वे मार्गाच्या नकाशावरुन वगळण्यात आलेल्या गावांचे नांव रेल्वे नकाशावर उमटवण्यासाठी”घाटनांदुर-अंबाजोगाई-केज-नेकनुर-मांजरसुंबा-श्रीगोंदा” या नवीन रेल्वे मार्ग म़जूर करुन त्यांच्या बांधणीच्या सर्वेक्षणासाठी ३४ लाखांच जे बजेट ही मंजूर केले. सुरेश प्रभु एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या नवीन रेल्वे मार्गाचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाला दीले. १९७६ च्या दिपावलीच्या सुमारास या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम घाटनांदुर, अंबाजोगाई, केज, नेकनुर परीसरात झाले. या नियोजित रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी सर्वेक्षण करणा-या अधिका-यांनी रेल्वेचे स्टोन ही या नियोजित मार्गावर रोवले. मात्र या सर्वेचे पुढे काय झाले ते समजू शकले नाही. यासंदर्भात तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांना “सांगा प्रभु; केंव्हा येणार अंबाजोगाई रेल्वे घ्या नकाशावर” या आशयाचा लेख लिहून मी रेल्वे मंत्रालयाला टॅग केला होता, आणि आश्चर्य म्हणजे या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने माझ्या या लेखाची दखल ही घेतली होती.


“परळी बीड नगर” आणि “घाटनांदुर-श्रीगोंदा” हे दोन रेल्वे मार्गच अंबाजोगाई शहराचे नांव रेल्वेच्या नकाशावर आणू शकत होते का? तर याचे ही उत्तर नाही असेच द्दावे लागेल. या दोन मार्गाशिवाय अंबाजोगाई शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी” लातुर-तुळजापुर- अंबाजोगाई-खामगाव” आणि “सोलापुर-उस्मानाबाद-अंबाजोगाई-
बीड-औरंगाबाद”हे दोन रेल्वे मार्ग यापुर्वीच मंत्रालयाकडे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या दोन रेल्वे मार्गापैकी “लातुर तुळजापुर अंबाजोगाई खामगाव” हा रेल्वेमार्ग तीर्थ क्षेत्रांना जोडणारा महामार्ग म्हणून ओळखला जातो. हा नियोजित रेल्वे मार्ग लातुर उदगीर बोधन सोलापूर उस्मानाबाद तुळजापूर घाटनांदुर अंबाजोगाई बीड जालना खामगाव” असा आहे. या नियोजित रेल्वे मार्गावर बोधन, अंबाजोगाई, तुळजापूर ही तीन तीर्थक्षेत्र येत असल्यामुळे हा रेल्वेमार्ग तीर्थ क्षेत्रांना जोडणारा रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जावू शकतो!
मुळात रेल्वेच्या नकाशावर आपले गाव आणण्यासाठी प्रत्येक गावातील लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. रेल्वेच्या नकाशावर आपल्या गावाचे नाव आणण्यासाठी हा प्रश्न
आपल्या जिव्हाळ्याचा, सामुदायिक प्रयत्नांचा व लढ्याचा प्रश्न मामला पाहीजे. या प्रश्नांवर कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाचे, गटातटाचे, संघटनांनी राजकीय रंग भरण्याचे प्रयत्न बंद केले पाहिजेत. आपले गाव रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची खरीच गरज आहे का? यांचा प्रामाणिक अभ्यास करुन सर्व अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र येऊन आपले गाव रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. आपले गाव रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी दुसरा अध्याय सुरु करण्याची गरज आहे.