महाराष्ट्र
बर्दापुर – लोखंडी सावरगाव चौपदरी करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी


वार्षिक आराखड्यात समावेश; २५० कोटी रुपये लागणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली वचनपूर्ती
शहराजवळून जाणारा ५४८ बी हा महामार्गावरील बर्दापूर ते लोखंडी सावरगाव या टप्प्याचे चौपदरीकरण करण्याचे आश्वासन आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारसभेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक आराखड्यात या मार्गाच्या चौपदरी करणाचा समावेश करण्यात आला आहे. या विभागाच्या आ. नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि ना. सौ. पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाचा सातत्याने केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या कडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे.
अंबाजोगाई आणि लातूरला जोडणाऱ्या ५४८ बी या महामार्गावर बर्दापूरच्या पुढे येताच चार पदरी रस्त्याचे अचानक दोन पदरीत रूपांतर होते. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांच्या गतीचा अचानक अडथळा होत असल्यामुळे याठिकाणी वारंवार गंभीर अपघात घडत आले आहेत. अनेक निष्पाप नागरिकांचे जीव या अपुऱ्या आणि असुरक्षित रस्त्यामुळे गेले आहेत. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात होती
माजी खासदार प्रीतम मुंडे आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी या विभागातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सदरील रस्ता चौपदरी करण्याची वारंवार मागणी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान अंबाजोगाई येथे झालेल्या आ. नमिता मुंदडा प्रचारसभेत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे जाहीर आश्वासन दिले होते.
त्यानंतरही आ. नमिता मुंदडा यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुन्हा एकदा हा मुद्दा सविस्तर पुणे मांडला होता. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांनी २०२५-२६ च्या वार्षिक आराखड्यात लोखंडी सावरगाव ते बर्दापूर या महामार्गाच्या १८ किमी लांबीच्या टप्प्याच्या चौपदरी करणाचा समावेश अधिकृतरीत्या केला आहे. या कामासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे बर्दापूरच्या पुढे अचानक दोन पदरी होणाऱ्या रस्त्यामुळे निर्माण होणाऱ्या अपघातांची साखळी खंडीत होईल. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास अनुभवता येणार आहे. या निर्णयाबद्दल आमदार नमिता मुंदडा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले असून हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या निर्णयाबद्दल नागरिकांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याचे काम नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

