महाराष्ट्र

बच्चू कडू यांचे ८ दिवसांचे आंदोलन; आणि राजकीय बेरीज वजाबाकी !!

गेली २५ वर्षांपासून महाराष्ट्रात विविध आंदोलनच्या माध्यमातून कायम चर्चेत व जनसामान्य लोकांच्या मनात घर करून राहीलेले माजी आमदार बच्च्चू कडू यांनी अलिकडेच शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांच्या मानधनात वाढ व इतर प्रश्नांसाठी केलेले आंदोलन राज्यात चांगले गाजले. हे आंदोलन सुटण्यापुर्वी महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि अभ्यासक शरद पवार यांनी स्वतः बच्चू कडू यांना दुरध्वनी करुन हे आंदोलन मागे घेवून आपल्या प्रकृतीची काळजी घ्या असा सल्ला दिला होता. मात्र हा सल्ला डावलून ना. उदय सावंत यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे या मागण्या सोडवण्याची लेखी हमी पत्र दिल्यानंतर बच्चू कडू यांनी लगेचच हे आंदोलन स्थगित केले. बच्चू कडू यांच्या आजपर्यंतच्या एक आंदोलक/ लढवय्या नेता म्हणून असलेली प्रतिमा असतांनाच त्यांनी हे आंदोलन अशा पध्दतीने स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय हा चळवळीच्या बेरजेचा भाग ठरणार की वजाबाकी चा अशी चर्चा या निमित्ताने आता होत आहे.

महाराष्ट्रातील अपंगांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षापासून अत्यंत तळमळीने काम करणारे विधानसभा सभेतील अभ्यासू माजी आमदार बच्चू कडू अलिकडेच शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत उपोषणास बसले होते. या उपोषणाबाबत अनेक उलट-सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहेत. चळवळीत असलेला कार्यकर्ता “चळवळी” सोडून “वळवळी” कडे वळला की, अशा चर्चा होत असतात हा माझा अनुभव आहे. नेमकी हीच चर्चा आपण बच्चू कडू यांच्या पुर्वीच्या चळवळी/ आंदोलनाचा संदर्भ आणि आजच्या चळवळी /आंदोलनाचा संदर्भ घेऊन करणार आहोत.

यापुर्वी जून २०१७ मध्ये आमदार असतांनाच शेतकरी संपा बाबतच्या चर्चेसंबंधात समाज माध्यमांवर बोलतांना वादग्रस्त विधान करुन बच्चू कडू चर्चेत आले होते. या चर्चेत सोशल मेडियावर बोलताना आ. बच्चू कडू यांनी “मुख्यमंत्र्यांच्या घरावर अँटमबाँब टाकण्यास आपण मागे-पुढे पहाणार नाही” अशा आशयाचे विधान केले होते. या व यासंदर्भात केलेल्या इतर विधानावरुन ते चर्चेत आले होते. यासंदर्भात मी ११ जून २०१७ ला “आ. बच्चू खरेच “कडू” बोलले का?” अशा आशयाची एक पोस्ट मी समाज माध्यमांवर टाकली होती.

गेली ४५ वर्षापासून पत्रकारिता करीत असतांना मी अनेक प्रश्नावर लिखाण केले. या लिखाणा संदर्भात राज्यातील विविध राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी ही मिळाली. १९८० च्या दशकात “लोकमत” या दैनिकात काम करीत असताना मी या विभागातील अपंगांच्या प्रश्नांवर बरेच लिखाण केले होते. या काळात अपंगांवर केलेल्या लिखाणाची दखल घेऊन मला महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा “कै. अनंतराव भालेराव स्मृती विशेष पुरस्कार” ही मिळाला होता. त्यावेळी क्रांती अपंग संघटनेचे पदाधिकारी संभाजी लांडे व राजाभाऊ गोकुळाष्टमे यांच्या माध्यमातून मला अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहावर आ. बच्चू कडू यांचेशी भेटण्याचा व चर्चा करण्याचा योग आला होता. या भेटीतील चर्चेच्या माध्यमातून आ. बच्चू कडू यांनी अपंगांविषयी केलेल्या ऐकीव माहितीच्या कितीतरी जास्त माहिती मला समजली होती. यामुळे मी या तरुण आमदाराच्या कामावर प्रभावीत ही झालो होतो, त्यांचा चाहता ही झालो होतो. त्यानंतर आ.बच्चू कडू अंबाजोगाई येथे ज्या ज्या वेळी आले किंवा मी मंत्रालयात ज्या ज्या वेळी गेलो त्या त्या वेळी मी त्यांना भेटतच होतो. मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांच्या मंत्रालयात व राज्याचे सर्वात मोठं शासकीय विश्रामगृह व मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बैठकीच्या महत्वाच केंद्र असलेल्या असलेल्या

“सह्याद्री अतिथी गृह” येथेही माझे मित्र तत्कालीन आ. संजय दौंड यांच्या सोबत त्यांना भेटण्याचा योग आला होता. मात्र मला पुर्वी भेटलेले बच्चू कडू आणि राज्यमंत्री झाल्यानंतर भेटलेले बच्चू कडू मला वेगळे वाटले. याही वेळेस ते मला दादा दादा करुन बोलत होते, मात्र मला ते “वेगळे” का वाटले? हे सांगणे मात्र अवघड आहे.

बच्चू कडू यांच नाव सर्व प्रथम २००४ च्या लोकसभा निवडणुकीत मी ऐकलं. या निवडणुकीत त्यांच्या प्रचाराचा धुमाकूळ एवढा होता की संपुर्ण महाराष्ट्रात त्यांच्या प्रचाराचाचे पडसाद ऐकायला मिळत होते. एखाद्दा अपक्ष उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत एवढा चर्चेत येवू शकतो, हे मला नवीन आणि कौतुकास्पद ही वाटत होतं. मला वाटत यावेळी अमरावती लोकसभा निवडणुकीत रा.सु. गवईं यांच्या पेक्षाही जास्त मतं घेणारा अपक्ष उमेदवार म्हणून बच्चू कडू यांनी संपुर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेतलं होतं.

या नंतर आ. बच्चू कडू यांची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अनेक चांगल्या बाबी समजून आल्या. त्यांच मुळ गाव चांदूरबाजार तालुक्यातलं बेलोरा. मोठ्या खटल्याच्या घरात त्यांचा जन्म झाला. शाळेतील कागदपत्रावरच नाव ओमप्रकाश. पण सगळा गाव त्यांना बच्चू म्हणायचा.

बच्चूचा स्वभावच मुळात चळवळ्या होत्या. आठवी वर्गात शिक्षण घेत असतांनाच त्यांनी पहीलं आंदोलन केले होते. बच्चू कबड्डीपटू असल्यामुळे त्यांचे सोबत मित्रांचा गराडा कायम असायचाच. कबड्डी खेळत असतांनाच त्याचा मित्र विनायक गवते यास रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यास उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले असता त्याचेवर उपचार करणा-या डॉक्टरांनी त्यास मुंबई येथे हलवण्यास सांगितले. आणि याच ठिकाणी बच्चू कडू यांच्या आयुष्यास वेगळी कलाटणी मिळाली.

मित्राच्या उपचारा मुळेच त्याला रुग्ण सेवेची ओढ लागली. मुंबईतील प्रत्येक नामांकित रुग्णालयात तो अनेक रुग्णांसोबत जावून त्यांना मिळेल ती मदत करु लागला. प्रसंगी आंदोलनेही त्याने केली. प्रस्थापिताचा विरोध करणारी शिवसेना तेव्हा त्याला आपलीशी वाटली. बच्चू शिवसेनेचे ही काम करु लागला. विद्यार्थी सेनेचा नेता बनून पोरींना छेडणा-या गुंडांना मारण्याचे काम ही बच्चूनी सेनेत असतांना केले.

बच्चू आमदार बनण्याआधी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती बनले. सत्ता आली तरी त्यांची आंदोलनं बंद पडली नाहीत. अगदी आमदार बनल्यावरही आंदोलनं वेगानं सुरू राहिली. पत्र पाठवून, निदर्शनं करून किंवा उपोषण करून प्रश्नाकडे लक्ष वेधलं जात नाही हे लक्षात आल्यावर बच्चू कडू यांनी अभिनव पध्दतीने आंदोलनं सुरू केली. सभापती असताना संडास बनवण्यात भ्रष्टाचार झाला होता. त्यासाठी सरकारच्या पंचायत राज समितीला सडलेले संडासाचा पॉट देण्यास त्याने मागं-पुढं पाहिलं नाही. सरकारी अधिकारी आपल्या खुर्चीवर कधीच नसतात, हा आपल्या सगळ्यांचा अनुभव. मग रविवारची सुटी आणि सोमवार, मंगळवारी तर जणू हक्काची च रजा. मग बच्चूंनी रिकाम्या खुर्च्यांचा लिलाव करायला सुरुवात केली. वर लिलाव करून मिळालेला पैसा सरकारी खजिन्यातही जमा केला. या आंदोलनामुळे सरकारी अधिका-याचे धाबे दणाणले. जेवायला जातानाही अधिकारी कधी येणार याचे निरोप शेजारच्या खुर्ची वाल्या कडे द्यायला लागले होते.

कधी डोक्यावरचे सगळे केस भादरुन घेतले. कधी जमिनीत स्वतःला गाडून घेतलं. कधी कांद्याचा वर्षाव केला. कधी तहसील कार्यालयाला टाळं मारून कर्मचा-याना कोंडल. आश्वासनं न पाळणा-या मंत्र्यांच्या गाड्यांवर काळ्या रंगाचे पट्टे मारले. कधी ऑफिसमधे साप सोडले. शाळेत न शिकवता खासगी क्लासेस मधेच शिकवणा-या शिक्षकांच्या कानाला धरून ओढणार “च्याऊ-माऊ” आंदोलन केलं. ही आंदोलने तर बच्चू कडू यांच्या कल्पकतेची कमाल होती.

एकदा पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा इशारा देणार बच्चू कडू यांनी केलेलं “शोले” आंदोलन तर खूपच गाजलं होतं . राहुल गांधी यांनी विदर्भात येऊन “कलावती” ला घर बांधून देतात. म्हणून या पठ्ठ्याने थेट अमेठीत जाऊन तिथल्या एका गरजू बाईला घर बांधून दिलं. अंगात शर्ट न घालता विधानसभेच्या सभागृहात जाऊन लक्ष वेधून घेतलं. एक ना अनेक अशी शेकडो आंदोलने बच्च कडू यांनी केली.

बच्चूंनी आपले लग्न केलं तेही गांधी जयंतीच्या मुहूर्तावर! २ ऑक्टोबर ला. लग्नात होणारा खर्च टाळून दोन हजार अपंगांना मदत केली. गळ्यात हार घातले नाहीत, मंगलाष्टक म्हटली गेली नाहीत तर वंदे मातरम आणि राष्ट्रगीताच्या सुरावटीत लग्न लागलं.

विधानसभेत अनेकदा अनेक विषयांवर चांगली भाषणं बच्चू कडू यांनी केली. विदर्भातले अनेक दुर्लक्षित विषय चव्हाट्यावर आणले. नक्षलवाद्यांनी सर्वसामान्यांना मारण्यापेक्षा आपल्यासारख्या पुढा-यांनाच गोळ्या घालायला हव्यात, असं विधान थेट विधानसभेत वक्तव्य करुन सगळ्यांना अचंबित केलं.

विविध आंदोलने आक्रमक करणारे बच्चू कडू अचानक गेल्या आठवड्यात पुन्हा चर्चेत आले. ते शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनामुळे!

तसे तर बच्चू कडू हे सर्व प्रथम चर्चेत आले होते ते “सोफिया” प्रकरणात. शेतकरी विरोधी प्रश्नांच्या संदर्भात आंदोलनास बसलेले बच्चू कडू एकदम आक्रमक झाले होते. डोक्यावरील केस काढून मुंडन करुन हातात वस्तरा घेऊन, गळ्यात फटाक्यांची माळ बांधून शासना विरुद्ध त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. मात्र हे आंदोलन करताना शेजारी उभ्या असलेल्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये बसून प्रत्येक दोन दोन तासाला ते कोणासोबत चर्चा करीत होते? असा प्रश्न त्यावेळी त्यांना समाज माध्यमांवर प्रत्यक्षपणे विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अद्यापही दिले नाही.

मध्यंतरी आ. बच्चू कडू गाजले ते गुवाहाटी च्या दौ-यामुळे! तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेशी पंगा घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटी ला गेले. या दौऱ्यात सुरुवातीला सोबत न गेलेले आ. बच्चू कडू हे मात्र त्यांचे मित्र राजकुमार आणि एकनाथ शिंदे यांच्या बोलावण्यात वरुन व मंत्री पदाचे आमीष दाखवल्यानंतर ते गुवाहाटी गेले. गुवाहाटी वरुन सर्व परत आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर आ. बच्चू कडू यांना राज्यमंत्री करण्यात आले. दिव्यांग विषाचे स्वतंत्र खाते त्यांना देण्यात आले. एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीत आ. बच्चू कडू यांचा पराभव झाला. त्यांच्याच मतदार संघात या पराभवाचा संदर्भ गुवाहाटी दौ-याशी जोडण्यात येवू लागला. या नंतर आपण गुवाहाटी ला गेलो ही फार मोठी चुक आपल्या हातुन घडली असे बच्चू कडू यांनी समाज माध्यमांसमोर बोलताना जाहीर ही केले.

अलिकडे राज्यात पक्ष फोडण्याची, चळवळीतील नेते संपवण्याची एक मोठी मोहीम सुरु आहे. आ. बच्चू कडू यांनी गुवाहाटी दौरा सुरु केल्यानंतर या चळवळीतील प्रमुख लोकांच्या रडारावर बच्चू कडू आहेत. अलिकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या पराभवाची जबाबदारी ही याच लोकांनी आपल्या खांद्यावर घेतली होती अशी ही चर्चा आहे. गुवाहाटी दौ-यानंतर बच्चू कडू यांना राज्यमंत्री पद मिळाले हे खरे आहे, पण निवडणुकीनंतर आमदारकी गेली. शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनातील वाढीसाठी ८ जून पासून १६ जून असे सलग नवू दिवस सुरु केलेल्या आंदोलनाचा समारोप शासनाचे प्रतिनिधी ना. उदय सावंत यांनी महसुल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या केवळ लेखी हमी वर दिल्यानंंतर ना. उदय सावंत यांच्या उपस्थितीत विधवा शेतकरी पत्नी सुमन आणि दिव्यांग कार्यकर्ता बापू यांच्या हस्ते लिंबू पाणी पिवून बच्चू कडू यांनी हे आंदोलन संपवले.

संपुर्ण महाराष्ट्रभर गाजलेले हे आंदोलन संपवून बच्चू कडू रुग्णालयात जातात न जातात तोच दुसऱ्या दिवशी १७ जून रोजी त्यांची जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरुन ही त्यांची हकालपट्टी केली गेली. एका प्रकरणात त्यांचेवर दोषारोप ठेवले असल्यामुळे त्यांचे जिल्हा बॅंकेचे संचालक पद ही काढून घेण्यात आले. अलिकडील ही राजकीय समिकरणे लक्षात घेण्यासारखी आहेत.

या समिकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण केला तर आपण गुवाहाटी पर्यंत जाऊन पोहोचतो. बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा मधील आपल्या मित्रांना धोका देवून गुवाहाटी ला जाणे पसंद केले. आणि वर उल्लेख केलेली महाराष्ट्रात सक्रिय झालेली पक्ष फोडण्याची, नेते संपवण्याची मोहीम बच्चू कडू यांच्या पर्यंत येवून पोहोचली. बच्चू कडू यांचे आमदार पद गेले, आता बॅंकेचे अध्यक्षपद एवढेच काय संचालक पद ही गेले. आता हळुहळु चळवळीतील कार्यकर्ता, शेतकरी, अपंगांचा पाठीराखा ही मिळालेली बिरुदे ही संपवण्याचा प्रयत्न ही मंडळी करतील!

बच्चू कडू शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढीसाठी केलेल्या आंदोलनानंतर आता एकाकी पडू लागले आहेत. अशा पध्दतीने चळवळ, आंदोलन सपविणे हे चांगले नाही आणि महाराष्ट्राच्या हिताचे ही नाही. बच्चू कडू सारखा सामान्य माणसाच्या हिता साठी लढणारा कार्यकर्ता जगला पाहिजे, तो पुन्हा ताठ मानेने उभा राहिला पाहिजे.

महाराष्ट्राच्या बेलोरा गावात जन्मलेला, वयाच्या १३ व्या वर्षा पासून सामाजिक काम करणारा, विविध समाजोपयोगी आंदोलने करुन महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा, विधान सभेतील अभ्यासू आमदार म्हणून आपली प्रतिमा बनवलेल्या बच्चू कडू यांनी हे केलेले आंदोलन त्यांच्या राजकीय बेरजेचे की वजाबाकी चे आहे हे समजून घेण्याची व बच्चू कडू यांच्या पाठी मागे सर्वशक्तिशिनी उभा राहण्याची हीच योग्य वेळ आहे.

बच्चू भाई लढते रहो…

हे ही दिवस जातील!!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker