प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित


डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या कृषि, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण संवर्धन यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी राबवलेल्या अभिनव संकल्पना व विविध उपक्रमांची तसेच भरीव व उल्लेखनीय अशा सृजनशील कार्याची दखल घेऊन “भारतीय कृषि व उद्यान संशोधन विकास संस्था चंदीगड पंजाब” या संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांचा “जीवनगौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे.
वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती ! अशा कविवर्य बा.भ.बोरकरांच्या या काव्यपंक्ती सार्थ ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब माणिकराव ठोंबरे हे होय. डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांची एक शिस्तप्रिय, कार्यकुशल अधिकारी म्हणून ओळख आहे. सर्व वयोगटातील सहकार्यांना सोबत घेऊन जाण्याचे त्यांचे दृष्टे नेतृत्व व कौशल्य वाखाण्याजोगे आहे. शिस्तप्रिय, कठोर, एक उत्तम प्रशासक, समन्वयक, व्यवस्थापक म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे. उंदरी सारख्या (ता.केज,जि.बीड) आडवळणाच्या एका गावखेड्यात, आणि एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्मलेले एक उमदे व्यक्तीमत्व, आपल्या मनात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उरात एक ध्येय बाळगून, सोबत आई – वडिलांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन शिक्षणासाठी घराबाहेर पडले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून कृषि पदवी घेऊन मुहूर्तमेढ रोवली व पुढे “पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय” या विषयात आचार्य पदवी घेऊन त्यावर गुढी उभारली..! हे विशेष होय.
चंदीगड येथील संस्थेने घेतली दखल
कृषि विद्यापीठ सेवेत असताना पदांचे एकेक शिखर पादाक्रांत करीत आज ते लातूर येथील कृषि महाविद्यालयाचे ‘सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य’ या पदाची धुरा ते समर्थपणे पेलत आहेत. तत्पूर्वी ते कृषि महाविद्यालय अंबाजोगाई येथे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य या पदावर कार्यरत असताना त्यांनी अत्यंत उल्लेखनीय असे कार्य केले आहे. कृषि विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच त्यांनी महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, अटल घनवन वृक्ष लागवड, योगा पार्क इत्यादी विविध संकल्पना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन महाविद्यालय व महाविद्यालयाच्या परिसरात राबविल्या. अत्यंत अल्पावधीत एकूण २६ हजारांहून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. त्याचबरोबर कृषि महाविद्यालयासमोर अत्यंत देखणे, नयनरम्य आणि रमणीय (गार्डन) बगीचा निर्माण करून महाविद्यालयाची शोभा वृद्धिंगत केली आहे. संस्थेशी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, विचारवंत, व्याख्याते, कवी, समाजसेवक यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडवून आणले व संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जोडले व अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालय खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केले. कृषि व कृषिपूरक क्षेत्रात ही प्राचार्य डॉ.ठोंबरे यांचे उल्लेखनीय कार्य आहे.
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची घेतली दखल
त्यांनी देशी गोवंश, म्हैसवर्ग व शेळी – मेंढी पालनात जे विशेष संशोधन केले ते शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरलेले आहे. राष्ट्रीयस्तरावर शेतकरी, पशुपालक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळावे व चर्चासत्रे यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. तसेच दूरदर्शन, आकाशवाणी, नियतकालिके, दैनिके याद्वारे जनजागृती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सातत्याने भरीव योगदान दिले आहे. आणि सातत्याने ते देत आहेत. त्यांच्या याच समाजोपयोगी, भरीव कार्याची दखल घेऊन आत्तापर्यंत डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना अनेक विभागीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन..!
डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना “जीवनगौरव पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी, माजी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ.धीरजकुमार कदम, माजी कुलसचिव डॉ.दिगंबर चव्हाण, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर, प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, डॉ.अनिलकुमार भिकाणे, डॉ.हेमंत पाटील, पं.उद्धवबापू आपेगावकर, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, वसंतराव मोरे, एॅड.माधव जाधव, एॅड.संतोष पवार, सुप्रसिद्ध लेखक सर नागेश जोंधळे, पत्रकार रणजित डांगे, विनोद पोखरकर, पत्रकार दिलीप अरसूळ, प्रख्यात कवी राजेश रेवले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र, परिवार आणि नातेवाईक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.