पत्रकार आणि साहित्यीकांना वेगळ्या वाटा निर्माण करता आल्या पाहिजेत


ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांचे मत
काळाची स्थित्यंतरे लक्षात घेऊन पत्रकार आणि साहित्यीकांना आपल्या वेगळ्या वाटा निर्माण करता आल्या पाहिजेत.पत्रकारिता व साहित्यातून हे साध्य करता येईल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांनी केले.
कै. त्रिंबक आसरडोहकर स्मृती समारोह समितीतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार शुभम खाडे यांना प्रदान झाला. त्या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आसाराम लोमटे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हे होते.
यावेळी आपल्या विस्तारीत भाषणात आसाराम लोमटे यांनी पत्रकारितेतील बदल सांगून, नव्याने आलेल्या समाज माध्यमाचे स्वागत त्यांनी केले. नवीन तंत्रज्ञानाचा जन्म हा काळाने चांगली पावले टाकावीत यासाठीच असतात. आणि या बदलांचा व त्यानुसार झालेल्या आपल्या कामाचा दस्तावेज प्रत्येकाने केला पाहिजे. त्रिंबक आसरडोहकर यांचे व्यक्तिमत्त्वही असेच होते. ग्रामीण साहित्यातून त्यांनी वेगळ्या वाटा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


पत्रकारितेत जगण्याच्या संघर्षात पिचून गेलेल्या माणसांच्या बाजूने लिहिता आले पाहिजे, युवा पत्रकारांकडून त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. अशी भावना असल्याशिवाय बदल घडणार नाहीत, पत्रकारीता व साहित्यातून हे आले पाहिजे. आपल्या आयुष्यातील वाटा आपणाला निर्माण कराव्या लागतात. असे विचारही श्री. लोमटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी पत्रकारीतेत ्त्र्त्त्र्त्र्त्त्त्र्त्त्र्त्र्त् रोज नव्या गोष्टींना सामोरे जावे लागते, जगातील विविधतेला सामोरे गेले पाहिजे ही संधी पत्रकारितेत आहे. शेतकरी या महत्वाच्या घटकावर बोलताना, शेतकरी हा समाजाच्या रेल्वेचे इंजिन आहे. अन्नाची व्यवस्था करणाऱ्या शेतकऱ्यांना कामगारांबरोबर समजू नका, तोच शेतकरी आज संकटात असल्याची चिंताही हबीब यांनी व्यक्त केली.


याप्रसंगी आसाराम लोमटे यांच्या हस्ते शुभम खाडे यांना कै. त्रिंबक आसरडोहकर स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, फेटा, स्मृती चिन्ह, रोख रक्कम असे होते. सत्काराला उत्तर देताना शुभम खाडेंनी आपल्या भावना व्यक्त करून आव्हानांना सामोरे जाण्याच्या वाटांवर मार्गक्रमण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सूत्रसंचालन गोरख शेंद्रे यांनी केले. रोहिणी देशमुख व रेखा शितोळे यांनी परिचय दिला. किरण आसरडोहकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.