निवडणुका येतील जातील; शैक्षणिक गुणवत्तेचे काय?


“निवडणुका येतील जातील; शैक्षणिक गुणवत्तेचे काय?” याच मथळ्याखाली मी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीपुर्वी मागील पाच वर्षांपुर्वी एक विस्तृत लेख लिहिला होता. त्यावेळी हा लेखावर बरीच अधिक उणे चर्चा झाली होती. आज ही विषय तोच आहे, फक्त संदर्भ नवे आहेत.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षा चा कालावधी व त्यांनतर मुदत वाढवून घेतलेला सहा महिन्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर एकदाची या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आणि बघता बघता संपत ही आली.
१२ एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी पॅनलची उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. १० एप्रिल रोजी संस्थेचे पॅनल प्रमुख व विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक औपचारिकता म्हणून नवीन संचालक मंडळाच्या उमेदवारी चा अर्ज ही निवडणुक अधिकारी यांच्या कडे दाखल केल्याची माहिती हाती लागली आहे.
सभासद का करतात बंद दाराआड चर्चा?
या निवडणुकीची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून संस्थेच्या सभासदांमध्ये आहे. शिक्षण संस्थेचे सभासद असल्यामुळे ही सर्व चर्चा बंद दाराआड, कोणालाही ऐकू जाईल वा आपला प्रखर विरोध संस्थाचालका पर्यंत पोहंचाणार नाही अशा अवस्थेत झाली. पण म्हणतात ना “जेथे ना पोहोचे रवि तेथे पोहोंचे कवी” त्या प्रमाणे ही माहिती हळुहळू बाहेर येवू लागली.


निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला की संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे शैलेश कुलकर्णी यांनी या वेळी संस्थेच्या घटनेविरोधातच न्यायालयात अपील करण्याची हालचाल सुरु केली. त्यांनी हे अपील दाखल करण्यासाठी स्थानिक वकिलांशी चर्चा केली, मात्र निवडणुक प्रक्रिया सुरु झाली म्हणून न्यायालयात जाता येणार नाही असे वकिलांचे म्हणणे आले आणि हा प्रस्ताव मागे पडला.
योगेश्वरी शिक्षण संस्थेची निवडणूक पॅनलवॉइज न घेता एका एका उमेदवारालाही व्यक्तीगतरित्या उमेदवारी साठी अर्ज करता आला पाहिजे, संचालक मंडळात शासनाच्या नियमानुसार सर्व जाती, प्रवर्गातील सभासदांना संचालक म्हणून स्थान मिळाले पाहिजे
अशी शैलेश कुलकर्णी यांची मागणी आहे. गेली दहा वर्षांपासून वेगवेगळ्या पातळीवर ते सतत प्रयत्न करीत आहेत. पण मागण्या रास्त असून ही वेळ निघून गेल्यामुळे ही याचिका न्यायालयात दाखल करण्याचे राहून गेले. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीपुर्वी संस्थेने आपल्या घटनेत बदल करून घेवून ही दुरुस्ती केली तर ठीक, अन्यथा हे प्रकरण न्याय प्रविष्ट होईल यात शंका घेण्याचे कारण नाही.
अंबाजोगाई शहरात स्वातंत्र्य पुर्व काळात स्थापण करण्यात आलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेला मराठवाड्यात एक वेगळी, स्वतंत्र ओळख आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आंदोलनात ज्यांनी महात्मा गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले व मराठवाडा स्वातंत्र्याची मुहुर्त मेढ रचली त्या स्वामी रामानंद तीर्थ यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. ही संस्था केवळ अंबाजोगाईचाच शैक्षणिक चेहरा बनली नाही तर संपुर्ण मराठवाड्यात या चेह-याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यात ही विशेष म्हणजे ही ओळख आजपर्यंत तरी संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने जपली आहे.
शैक्षणिक गुणवत्ता का वाढत नाही?


मराठवाड्यात स्वातंत्र्य पुर्व काळात स्थापण झालेल्या अनेक शिक्षण संस्था आहेत. या सर्व संस्था एक विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट घेवून चालवण्यात येतात. यापैकी बहुतांश संस्थांमध्ये नौकरीसाठी पैसे घेतले जात नाहीत, ही जमेची बाजू आहे. मात्र या शिक्षणसंस्था आपली शैक्षणिक गुणवत्ता टिकवू शकल्या नाहीत हे ही सत्य आहे. ही शैक्षणिक गुणवत्ता टिकवून न ठेवण्यात शिक्षक-प्राध्यापकांचे अपयश आहे का संस्था चालकांचे अपयश आहे, हा कळीचा मुद्दा आहे.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या बाबतीत हा मुद्दा गेली दहा वर्षांपासून गाजतो आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे इतर शिक्षण संस्थांपेक्षा फिजिकल इंन्फ्रास्ट्रक्चर खुप चांगले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी भव्य क्लासरुम, सुसज्ज प्रयोगशाळा, निवासासाठी अतिशय चांगल्या दर्जाची वसतिगृह आणि ११ वी १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी एक्स्ट्रा वर्ग, त्यांना शिकवण्यासाठी तज्ञ प्राध्यापक वर्ग. हे सर्व असतांना महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याऐवजी ती सतत कमी का होते आहे, हा प्रश्न आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीपासून संस्थेच्या या शैक्षणिक अधोगतीचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो, मात्र या मुद्द्याकडे संस्था चालकांनी आज पर्यंत फारसे गांभीर्याने का पाहिले नाही, अकरावी, बारावी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक महाविद्यालयीन वेळे व्यतिरीक्त महाविद्यालयीन फीस व्यतिरिक्त इतर फीस घेऊन शिकवणी वर्ग चालवण्यात येत असतांनाही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता का वाढत नाही, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर टॉपच्या अभ्यासक्रमासाठी योगेश्वरी महाविद्यालयाच्या मुलांचा नंबर का लागत नाही, हा कळीचा मुद्दा आहे.


यावर्षी मार्च महिन्याच्या प्रारंभी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. शिक्षक प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी आणि शिक्षकेतर प्रतिनिधी यांच्या निवडणुकांचे निकाल ही हाती लागले आहेत.
सेवानिवृत्त प्राध्यापकाचे स्विकृत संचालक होण्यासाठी दबाब तंत्र!
असे असतांनाच योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या निवडणुकाची प्रक्रिया सुरु होताच ११ वी १२ वर्गातील प्रगती वर्गाचा आर्थिक लेखाजोखा ठेवणा-या एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने विद्यमान संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आपली वर्णी स्विकृत सदस्य म्हणून लागावी यासाठी आपल्या समाजाची एक व्यापक बैठक बोलावून विद्यमान संस्थाचालकांवर दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला असल्याची माहिती समोर आली आहे. गेली अनेक वर्षांपासून संस्था अंतर्गत चालवण्या येणाऱ्या प्रगती वर्गाचे खजिनदार म्हणून ही हे प्राध्यापक काम पहात असल्याचे व सेवानिवृत्ती नंतर ही ही महत्त्वाची जबाबदारी संस्थाचालकांच्या कृपाशीर्वादाने याच महाशयाकडे असल्याचे संस्थेत कार्यरत असलेले कर्मचारी सांगतात. संस्थाचालकांच्या गळ्यात ताईत असणारा हा सेवानिवृत्त प्राध्यापक अशी हिंमत कशी करु शकतो? यांची ही चर्चा या निमित्ताने होत आहे.
३१ संचालक मंडळाची कार्यकारिणी!
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या ३१ संचालकांच्या निवडीसाठी ही संपुर्ण निवडणूक होणार आहे. या ३१ संचालकांमध्ये संस्थाअंतर्गत येणाऱ्या योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य, स्वाराती महाविद्यालयाचे प्राचार्य, श्रीमति गोदावरीबाई कुंकुलोळ नुतन कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, योगेश्वरी नुतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व दे.बा. गणगे योगेश्वरी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हे पाच पदसिद्ध सदस्य (एकुण ५), या पाच ही युनीट मधुन प्रत्येकी दोन प्रतिनिधी (एकुण १०) आणि सभासदांमधुन निवडुन येणारे १६ सदस्य अशा एकुण ३१ सदस्यांचे संचालक मंडळ या संस्थेचा कारभार पहाते. या शिवाय संचालक मंडळास दोन स्विकृत सदस्य करण्याचा अधिकार आहे.
ऍड. शिवाजीराव कराड पॅनलच्या बाहेर?
या सर्व पार्श्वभूमीवर यावर्षी होवू घातलेली पंचवार्षिक निवडणुक विद्यमान संचालकांना डोके दुखी देणारी ठरणार होती. मात्र विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात पॅनल उभा न राहिल्यामुळे ही निवडणुक सोपी झाली. समोर पॅनल नसला तरी विद्यमान संचालक मंडळात नेमके कोणाकोणाचा समावेश करायचा, कोणाला बाहेर काढायचे, कोणाला आता घ्यायचे ही डोकेदुखी विद्यमान संचालक मंडळाच्या समोर होती. नव्या. संचालक मंडळाने याबाबतचे सर्व अधिकार विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्यावर सोपवले आणि डॉ. सुरेश खुरसाळे यांनी आपल्या कौशल्याचा वापर करीत गेली अनेक वर्षांपासून संस्थेच्या उपाध्यक्ष पदांची जबाबदारी सांभाळत असणा-या ऍड. शिवाजीराव कराड यांना बाहेर चा दरवाजा दाखवत आपल्या मर्जीतील सदस्यांच्या गळ्यात अध्यक्ष व सचीव पदांची माळ टाकण्याचा मार्ग सुकर करुन टाकला.
संस्थेच्या या ३१ सदस्यांपैकी १६ सदस्यांची बिनविरोध निवड करताना डॉ. सुरेश खुरसाळे यांनी प्रा. अभिजित लोहिया, रमण सोनवळकर, ऍड. जगदीश चौसाळकर, डॉ. शैलेश वैद्य, लोकेश वैद्य, बर्दापूरकर, पाशुमिया गुरुजी, इंजि. प्रताप पवार, ऍड. वैशाली विर्धे आणि प्रा. जयश्री देशपांडे (मोटेगावकर) या अकरा नव्या आणि जुन्या पाच संचालकांवर संस्थेची जबाबदारी सोपवली.
विद्यमान संचालक मंडळाची ही निवडणूक आज सोपी झाली असली तरी आगामी निवडणुकीत या निवडीचे दृश्य परिणाम दिसतील अशी चर्चा या निमित्ताने होत आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या नवीन संचालक मंडळाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, योगेश्वरी महाविद्यालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या प्रगती वर्गातुन केवळ अर्थाजनच न करता गुणवंत विद्यार्थी निर्माण व्हावेत व संस्थेच्या नाव लौकिकासह संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत ही मोठी वाढ व्हावी अशा “माध्यम डिजिटल नेटवर्क” च्या वतीने खुप खुप शुभेच्छा!
🙏