महाराष्ट्र

नवरात्र महोत्सवाला प्रारंभ; कशी करावी घटस्थापना!

हिंदु धर्म संस्कृतीत शारदीय नवरात्र महोत्सवाला विशेष स्थान आहे. याबाबत वेगवेगळ्या धर्मग्रंथामध्ये या नवरात्र महोत्सवासंबंधी लिहिले गेले आहे. हिंदु धर्मात देवींची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत तर वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यापैकी शारदेय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. या महोत्सवाला शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की, हा नवरात्रोत्सव शरद ऋतुच्या प्रारंभी येतो. भारत देशामध्ये सर्वत्र हा नवरात्रोत्सव प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरुपात पुजा-पाठ करुन साजरा केला जातो. आश्विन नवरात्रोत्सवात घटामध्ये देवीची स्थापना करुन नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नवू दिवस मनोभावे पुजा केली जाते. या सर्व प्रक्रियेत घटस्थापना हा विधी शास्त्रोक्त पद्धतीने होणे आवश्यक आहे. तेंव्हा आपण शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी केली जाते याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
घटस्थापना करण्यापुर्वी आपल्याला घटस्थापना करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहीत्य आपल्या जवळ काढुने ठेवणे आवश्यक आहे. या मध्ये देवीचे ओटीचे साहीत्य, पाने, हळद, कुंकू व घटासाठी दोरा लागणार आहे. या सोबतच देवीचे सौंदर्य साहित्य देखील काढून ठेवा. पुजेसाठी फळे, घटासमोर व देवासमोर काढण्यासाठी रांगोळी, आणि मुग, मसूर, ज्वारी, तांदुळ, हरभरा, बाजारी, गहू असे कोणतेही सात प्रकारचे धान्य, वेदिका तयार करण्यासाठी आवश्यक आहे. वेदिकेला लावण्यासाठी दिवा लागणार आहे. हा दिवा आपल्याला अंखड नऊ दिवस लावायचा आहे आणि आपण जी मातीची वेदिका तयार करणार आहोत, त्यासाठी आपल्याला पाटी लागेल. तसेच पाट, लाल रंगाचे कापड, मातीचे मडके, कलश, तांदुळ, पानाचा विडा व देवीचा फोटो या सर्व गोष्टींची आपल्याला घटस्थापनेसाठी गरज भासणार आहे.
हे सर्व साहित्य काढुनी ठेवल्यानंतर
सर्व प्रथम ज्या जागेवर आपण घटस्थापना करणार आहोत ती जागा फरशीची असेल तर स्वच्छ धुवून, पुसून घ्यायची आहे आणि मातीची असेल तर गायीच्या शेणाने सारवून घ्यायची आहे. त्यानंतर त्याठिकाणी पाट ठेवायचा आहे, पाटाच्या वरती लाल कापड टाकुन त्याच्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढुन मस्त सजवायचे आहे. देवीला लाल वस्त्र हे अतिशय प्रिय असतं त्यामुळे देवीच्या आसनावर लाल रंगाचे कापड टाकायचे आहे.


आता घटासाठी आपण मातीच मडकं घ्यायचे कारण ते शुभ मानले जाते. त्यानंतर देवीचा फोटो किंवा मातीची मुर्ती सुध्दा चालेल. प्रथम गणपती स्थापना करून घ्यायची आहे. आपण ही स्थापना करत असतांना नागेलीच्या (विड्याच्या) पानावर अक्षदा टाकुन त्यावर लाल सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करायची आहे. त्यानंतर पुजन करून घ्यायचे आहे. हळद, कुंकू लवायचे आहे. ही पुजा करतांना ॐ गणेशाय नमः जय माता दि : या मंत्राचा जप करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्यासाठी आपण कलश घेतला आहे तो कलश कोठेही खाली ठेवायचा नाही तो ठेवण्यासाठी छोटे ताम्हण घेउन ताम्हणामध्ये खाली तांदुळ ठेवायचे आहेत व त्यावरती कलश ठेवायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे, व त्या कलशाच्या बाहेरील बाजूने हळदी कुकूंने स्वस्तिक काढुन त्या कलशाचे पुजन करून घ्यायचे आहे.
आता कलशामध्ये पाच नागेलीची (विड्याची) पाने ठेवायची आहेत. त्यासाठी पाच पानांना हळदी कुंकू लावून ती कलशामध्ये ठेवायची आहेत. हे सर्व झाल्यानंतर देवाच्या ठिकाणी हा कलश आपण स्थापना करायचा आहे व त्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळावर देखील आपण स्वस्तिक काढुन घ्यायचे आहे. स्वस्तिक काढणे हे शुभ प्रतिक मानले जाते. कलश स्थापना आता त्याच्यावर फुल ठेवून नमस्कार करायचा आहे.
आता घटस्थापना करून घ्यायची आहे. घटस्थापनेसाठी जी आपण पाटी घेतली होती ती पाटी ठेवायची आहे. त्या पाटीमध्ये शेतातुन आणलेली काळी माती (ओवरी) स्वच्छ करून छोटासा मातीचा थर होईल अशी माती टाकायची आहे. वेदीका तयार करायची आहे. वेदीका तयार करत असतांना ॐ वेदीकाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
आता त्या पाटीमध्ये आपल्याला ७ प्रकारचे धान्य जे धान्य आपण घेतले आहे ते टाकायचे आहे. त्याच्यावर पुन्हा थोडी माती टाकायची आहे, त्यामाती मध्ये हे सात ही धान्य पुन्हा सगळे एकत्र करून घ्यायचे आहे. त्याच्यावर घटाचं मडक अथवा कलश ठेवायचा आहे. या कलशामध्ये पाणी भरुन त्यात सुपारी हळकुंड, पैशाचे नाणे, हळद, कुंकु, फुल वाहुन नमन करायचा आहे. नंतर सदरील कलशा मध्ये पाच किंवा सात पान ठेवायची आहेत. त्या कलशाच्या बाजुला धागा बांधुन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला नऊ पानांची नऊ फुलांची माळ तयार करुन कलशांवर बांधलेल्या मंडपीला ती फुलापानांची माळ बांधुन कलशात सोडायची आहे. अशी ती सलग नऊ दिवस फुलांची माळ तयार करून बांधायची आहे आणि जी माळ आपण बांधणार आहोत ती माळ आपल्याला कलशा मध्ये सोडायची आहे. अशा पध्दतीने नऊ दिवस माळी तयार करायच्या आहेत कलशामध्ये सोडायच्या आहेत. या नंतर देवीचं ओटीचं साहीत्य समोर ठेवायचे आहे. देवीच्या फोटोला, प्रतिमेला हार तयार करून घालायचा आहे. त्यानंतर देवीला फुले, पाच प्रकारची फळे ठेवायची आहेत आणि देवीला नमस्कार करायचा आहे. मंडळीला आंब्याच्या पानाच्या, फुलांच्या माळी लावायच्या आहेत. अखंड नऊ दिवस आपल्याला देवीसमोर व घटासमोर लावलेला नंदादीप प्रज्वलित ठेवायचा आहे. नऊ दिवस आपल्याला देवीचे नामस्मरण करायचे आहे. देवीचे विविध व्रत करायचे आहे. आपल्या घरावर कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर देवीचा आर्शिवाद असावा म्हणून दैनंदिन आपण नऊ दिवस या घटाची सकाळी आणि संध्याकाळी मनोभावे पुजा करुन प्रसाद चढवून किमान पाच आरत्या म्हणावयाच्या आहेत. धुप, अगरबत्ती लावायची आहे. आपली इच्छा देवीसमोर वक्त करायची आहे. अशा पध्दतीने आपली घटस्थापनेची शास्त्रोक्त पुजा करता येईल.


घटस्थापनेची ही पुजा आपल्याघरी पारंपरिक पध्दतीने केली जाते तशी ही करता येते. घटस्थापनेच्या दिवशी आपण केलेली ही पुजा दसर्‍याच्या दिवशी काढली जाते. तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात. आणि हे फुटलेले अंकुर जुन्या काळापासून आजही अनेकजण आपल्या गांधी टोपी मध्ये लाऊन दसर्‍याला सिमोल्लंघनाचे सोने लुटतात. अशा रीतीने नवरात्र उत्सवाची सांगता होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker