नगर आष्टी रेल्वेला लागली भिषण आग; सुदैवाने जिवीत हानी नाही!


नगर हुन आष्टी कडे येणाऱ्या डेमो रेल्वेला आज दुपारी भिषण आग लागल्याची घटना घडली.
गेली अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेल्या नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचे काम अर्धवट झालेले असतांनाच नगर येथून आष्टी पर्यंत ही डेमो रेल्वे मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आली होती.
मध्यंतरी या रेल्वेसाठी प्रवासी अधिभार कमी येत असल्यामुळे ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. मात्र प्रवासी अधिभारातुन मिळणारे उत्पन्न कमी असताना लोकप्रतिनिधींच्या राजकीय हव्यासापोटी ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती.


आज १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ही रेल्वे नगर येथून निघाल्यानंतर केवळ पाच किमी अंतरावर गेली असतांनाच या रेल्वेला भिषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार ही आग सुरुवातीला रेल्वे इंजिन मध्ये लागल्याचे सांगितले जाते. काही मिनिटांतच ही आग शेजारील डब्यांना लागली. आग आपल्या डब्याला लागली आहे हे समजताच डब्ब्यामधील प्रवाशांनी आपला जीव मुठीत घेऊन रेल्वे डब्यातून उड्या मारुन आपला जीव वाचवला. रेल्वेमध्ये अल्प प्रवासी असल्यामुळे कसल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. मात्र रेल.वेचे मोठे नुकसान झाले. रेल्वे प्रशासनाने मात्र या आगीत संदर्भात अद्दाप पर्यंत अधिकृत खुलासा केला नाही.
आज दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरत चाललेल्या नगर आष्टी या रेल्वेचा प्रवास पुन्हा केंव्हा सुरु होईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.