धर्मावरील श्रध्दा ही सर्वात मोठी अंधश्रध्दा; सुधाकर सोनवणे यांचे मत


निर्भय बनल्याशिवाय फुले- आंबेडकरी विचारांची मानवतावादी चळवळ पुढे चालू शकत नाही, निर्भयता ही तत्वज्ञानातून येत असते. ज्ञान- तत्वज्ञान वाचन, चिंतन आणि लेखनातून विकसित होत असते. कार्यकर्त्यांनी या परिप्रेक्षातुन चळवळ गतिमान करण्याची गरज आहे. बाबासाहेबांचा विचार हा जातीनिर्मुलनाचा विचार आहे. जाती- धर्माची उतरंडीची ही व्यवस्था संपुष्ठात आणण्यासाठी लोकांना विज्ञानवादी बनवावे लागेल. प्रत्येक श्रद्धा ही जशी अंधश्रद्धा असते तशीच धर्मश्रद्धा ही सर्वात मोठी अंधश्रद्धा असते असे मत फुले- आंबेडकरी विचाराचे अभ्यासक तथा जेष्ठ पत्रकार सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले.


बीड शहरातील स. मा. गर्गे वाचनालय येथे बुधवारी दि. १० मे रोजी एकदिवशीय ‘वर्तमान काळात फुले- आंबेडकर विचाराची प्रस्तुतता’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला, यावेळी सोनवणे अध्यक्षपदावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विक्रम धनवे, प्रा. डॉ. बाळासाहेब जावळे कार्यक्रमाचे आयोजक अनिल डोंगरे, राजेश शिंदे, कबीर जाधव, संगमेश्वर आंधळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना सुधाकर सोनवणे म्हणाले की, आंबेडकरांचा विचार हा भारतातील अस्पृश्य, आदिवासी आणि सर्व भारतीयांना न्याय मिळवून देण्याचा होता. कुठलाही धर्म माणसाला हवे ते स्वातंत्र्य देत नाही मात्र ते स्वातंत्र्य घटनाकारांनी स्रियांसह सर्वाना बहाल केले आहे. या स्वातंत्र्याचा उपभोग घेत प्रत्येकाने नीतीचे पालन करत जीवन जगले पाहिजे. आज जगामध्ये ज्याला कुणाला समता, स्वातंत्र्य, न्याय हवा आहे मार्गदाते केवळ फुले- आंबेडकर आहेत. भारतात लोकांना धार्मिक बनवण्यासाठी काही विचारसरणी काम करत आहे. एकदा लोक धार्मिक बनले की, पुढच्या टप्प्यात ते धार्मिक कट्टर बनतात. धार्मिक कट्टरतेतून दहशतवादी, आतंकवादी तयार होत असतात. अशा परिस्थितीत माणूसच माणसांपासून भयभीत होतो. जगातला पहिला सेक्युलर फिलॉसॉफर बुद्ध आहे. आपले संविधान देखील सेक्युलर आहे. घटनेतील कलाम २५ ही सेक्युलरची व्याख्या आहे. भारतात सेक्युलर विरुद्ध धार्मिक असा संघर्ष आहे. आपल्याकडली जी जातधर्माची व्यवस्था आहे तिला पिंजऱ्यापेक्षा वेगळे म्हणता येणार नाही असेही सुधाकर सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रा. डॉ. बाळासाहेब जावळे म्हणाले की, भारतातील जी शोषण, दमन, अन्याय- अत्याचार करणारी व्यवस्था आहे ती इथली शेटजी- भटजी- लाटजी यांची व्यवस्था आहे. ही व्यवस्था प्रथम महात्मा जोतीराव फुल्यांच्या उध्वस्थ केली. आजची राजसत्ता लव्ह जिहादच्या नावाखाली माणसाच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचे त्यांनी सांगितले तर प्रा. विक्रम धनवे यांनी जातीनिर्मुलनासाठी जाणिवेत, नेणिवेत बदल करावा लागेल असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाला ऍड. अशोक वाघमारे, ऍड. राजेंद्र कोरडे वैभव धवन, आकाश कोकाटे, चंदू काळे, सौरभ बनसोडे, अनिकेत वडमारे, सुरज वाघमारे, कबीर जाधव, शुभम मस्के, अजिंक्य हुंबर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.