… तरीही लोक मला निवडुन देतील! ना. नितीन गडकरी


Nitin Gadkari भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आल्यानंतर गडकरी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र, त्यानंतर आता नितीन गडकरी यांनी आगामी निवडणुकींबाबत मोठं विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील अंधेरी येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी बोलताना हे विधान केले आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, मतदार ज्यांना निवडून द्यायच त्यांना निवडून देतात. सामान्यांना चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती हव्या असून, मी कधीच कोणाच्या गळ्यात हार घातला नाही असे सांगत ते म्हणाले की, पुढच्या निवडणुकीत कटआउट, कार्यकर्त्यांना चहापाणी आणि पोस्टरही लावणार नाही असा निश्चय मी केला आहे. त्यामुळे निवडणुकीत मत द्यायचे आहे, तर द्या नाहीतर नका देऊ. मात्र, त्यानंतरही लोकं मला मत देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्यांना कामं करणाऱ्या व्यक्ती हव्या आहेत असे देखील नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
यावेळी नितीन गडकरी यांनी लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्यावर भर दिला. आतापर्यंत 45 लाख कोटींची कामे केली असून, तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे हे आम्ही पाहत आहोत. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवरील तोडग्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, नियोजन जर नगरपालिका आणि महानगरपालिकेला दिले तर हा प्रश्न राहणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या नव्या संसदीय समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आलं. तेव्हापासून नितीन गडकरी यांची मोठी चर्चा आहे. नितीन गडकरी रोखठोक आणि निर्भीड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते हातचं राखून बोलत नाहीत. कार्यकर्त्यांचे कान उपटताना ते आपल्या वरिष्ठ नेत्यांनाही योग्य शब्दात ‘समज’ देतात. अलिकडेच असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या ‘NATCON 2022’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित करताना कार्यकर्त्यांचे कान उपटत नेत्यांनाही मार्मिक शब्दांत समज दिली.


भाजपच्या पहिल्या फळीतील नेते, दमदार डॅशिंग मंत्री, ज्यांच्या कामाने त्यांचं जगभरात आदराने नाव घेतलं जातं अशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने संसदीय समितीत स्थान दिलं नाही. नितीन गडकरी यांचा टॉप परफॉर्मन्स असूनही केवळ मोदी-शहांची री ओढत नाही, त्यामुळेच त्यांचे पंख छाटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सगळ्यावर नितीन गडकरी काय बोलणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना नितीन गडकरी यांनी विकास कामांच्या दिरंगाईवर बोलताना सरकारला घरचा आहेर दिला आहे. प्रोजेक्ट आखले जातात, पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं सांगतानाच सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले. बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही. भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करता येईल”, असं गडकरी म्हणाले.