जिल्हा निर्मिती साठी आ. नमिता मुंदडा यांच्या मार्फत आवश्यक पाठपुरावा करु
नंदकिशोर मुंदडा यांची शिष्टमंडळाला ग्वाही
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी ही इतर सामान्य माणसाप्रमाणेच मुंदडा कुटुंबियांची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी आहे. या मागणीसाठी गेली २० वर्षांपासून मुंदडा कुटुंबिय जनतेने टाकलेल्या विश्वासामुळे राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत असून यापुढे ही आवश्यक तो पाठपुरावा आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या मार्फत करण्यात येईल अशी ग्वाही नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठी उपजिल्हाधिकारी यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यापूर्वी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने आ. नमिता अक्षय मुंदडा यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन एक निवेदन देण्यात आले. आ. नमिता अक्षय मुंदडा या अधिवेशनातील सहभागासाठी मुंबई मुक्कामी असल्यामुळे नंदकिशोर मुंदडा यांनी हे निवेदन स्वीकारले व अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात मुंदडा कुटुंबियांची भुमिका त्यांनी सांगितली.


यावेळी नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठी गेली २० वर्षांपासून तत्कालीन आ. डॉ. सौ. विमल मुंदडा यांच्या माध्यमातून मुंदडा कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. आ. डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी आमदार, राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून महाराष्ट्र शासनात काम करीत असताना जिल्हा निर्मिती साठी सातत्याने पुढाकार घेतला होता. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठी सलग सात दिवस त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत उपोषणात सहभाग घेतला होता तर जिल्हा निर्मिती साठी आवश्यक असलेली अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय, सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, विशेष भुसंपादन कार्यालय व इतर सर्व आवश्यक ती शासकीय कार्यालयांना मंजूरी मिळवून अद्दायावत इमारती उभ्या केल्या आहेत.
एवढेच नव्हे तर आ. डॉ. सौ. विमल मुंदडा या तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत असतांन तत्कालीन विभागीय आयुक्त एम. रमेशकुमार यांच्या कडुन राज्य शासनाकडे बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात महत्त्वपुर्ण अहवाल सादर करुन अंबाजोगाई जिल्हृयानिर्मितीवर शिक्का मोर्तब करुन ठेवले आहे. प्रशासकीय पातळीवर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची सर्व प्रक्रिया पुर्ण करुन ठेवण्यात आली आहे.


अंबाजोगाई जिल्हा निर्मिती सोबतच राज्य शासनास समोर आज २२ जिल्हा निर्मितीचे प्रस्ताव आहेत. हे सर्व प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. महाराष्ट्रात यापुढे जेंव्हा केंव्हा नवीन जिल्हा निर्मिती होईल त्यात अंबाजोगाई जिल्ह्याचा निश्चित समावेश असेल यात शंका घेण्याचे कारण नाही असे नंदकिशोर मुंदडा यांनी यावेळी सांगितले.
आ. नमिता मुंदडा यांनी मागील अधिवेशनात राज्य शासनाला अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात प्रश्न विचारला होता तेंव्हा ही शासनाने अंबाजोगाई जिल्हा निर्मिती चार प्रस्ताव शासनाकडे निर्णयाअभावी प्रलंबित असून राज्यात जेंव्हा केंव्हा नवीन जिल्हे निर्माण होतील तेंव्हा अंबाजोगाई जिल्हा निश्चित पुणे होईल असे उत्तर राज्यशासनाने दिले आहे. या अधिवेशनात अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात तारांकीत प्रश्न आ. नमिता मुंदडा यांनी टाकला आहे. लक्षवेधी प्रश्न हा अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ४५ दिवस आधी टाकावा लागतो, त्यामुळे तो आता टाकता येत नाही, मात्र प्रशासकीय पातळीवर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी ही मुंदडा कुटुंबियांची ही जिव्हाळ्याची मागणी असुन या मागणीचा प्राधान्यक्रमाने आवश्यक तो पाठपुरावा आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून राज्यशासनाकडे करण्यात येईल अशी ग्वाही नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितीच्या शिष्टमंडळाशी बोलतांना दिली.