महाराष्ट्र
जयवंती नदी व्हाया योगेश्वरी मंदीर टू तहसील कार्यालय; ।। भाग १ ।।
अंबाजोगाई शहरात गेली तीन चार महिन्यांपासून शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या जयवंती नदी, माता योगेश्वरी देवी मंदिर विश्वस्त मंडळ या दोन प्रकरणात सतत उलट सुलट चर्चा आणि बातम्या ऐकावयास मिळत आहेत. तरी सुद्धा शहरात राहणाऱ्या जवळपास १ लाख माणसांपैकी अगदी १० टक्के लोकांनी ही या दोन्ही प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने ऐकल्याचे, वाचल्याचे किंवा पाहील्याचे अथवा काही प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून येत नाही.
अंबाजोगाई शहर हे तसे चळवळीचे केंद्र आहे. एखाद्या सामाजिक प्रश्नासंदर्भात या गावात एखाद्या सामान्य माणसाने प्रामाणिकपणे चळवळ सुरु केली तर गावातील किमान हजार पाचशे लोक तरी त्यांच्या मागे हक्काने आणि हिंमतीने उभा असल्याचे आपण सर्वचजण गेली अनेक वर्षांपासून पहात आहोत. मात्र “चळवळी” च्या ऐवजी “वळवळी” सुरु झाल्या की सामान्य लोक त्यांच्यापासून शेकडो पावलं दुर रहातात. तटस्थपणे त्या प्रकरणाकडे पाहण्याची भुमिका घेतात. मग ही वळवळ करणारी माणसं आपसुकच चर्चेच्या किंवा दखल घेण्याच्या प्रवाहातुन बाहेर पडतात.

अंबाजोगाई शहरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जयवंती नदी बचाव आंदोलन असो की योगेश्वरी देवी मंदिर विश्वस्त मंडळा संबंधीचा वाद असो ही दोन्ही प्रकरणे आता ऊस गाळून रस काढून टाकलेल्या चोयट्या सारखी अर्थहीन झाली आहेत असे आम्हाला वाटते. आम्ही किती खरे आहोत हे इतरांना सांगणे म्हणजेच आम्ही खोटे आहोत हा इतरांचा समज दुर करण्यासाठी सांगण्याचाच तो अट्टाहास असतो.
आणि या प्रकरणातील खरे खोटे हे बहुतांशी लोकांना माहीत असल्यामुळे ते अशा वर्षानुवर्षे चघळत असलेल्या प्रकरणात आपला फारसा इंटरेस्ट दाखवत नसावेत.
या दोन्ही प्रकरणाकडे जरा तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न एक पत्रकार म्हणून आणि त्याहून अधिक या गावचा सजग सामान्य नागरिक म्हणून येथे करतो आहे. मुळात या दोन प्रकरणाबाबत सध्या चर्चा चालू आहे त्या दोन्ही प्रकरणांना ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी आहे. नदीचं आणि मंदिराचं पावित्र्य आपण सर्वच जण जाणतो आहोत. अंबाजोगाई सारख्या प्रचंड मोठा धार्मिक वारसा असलेल्या या गावातच मंदीर आणि नदी या दोन्ही स्थळांचे लचके तोडले जात असल्याचे मागील अनेक वर्षांपासून आपण सर्वांनी पाहीले आहे. कारणामे वेगवेगळे असतील पण लचके तोडले गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. दोन्ही प्रकरणात याबाबत फक्त एक-एक च उदाहरण देतो. जयवंती नदीचा प्रवाह बदलून झालेली प्लॉटींग आणि योगेश्वरी मातेच्या पुजा अर्चनेचा खर्च भागविण्यासाठी निजाम सरकारने देवस्थानला दिलेल्या शेकडो एकर जमिनी ढापण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न. या दोन्ही घटना सुरु होवून अनेक वर्षे झाली. तक्रारी झाल्या, चौकशा झाल्या दावे प्रतिदावे सुरु आहेत पण अजूनही निश्पन्न काहीही झाले नाही.
म्हणून “योगेश्वरी मंदीर व्हाया जयवंती नदी टू तहसील कार्यालय” असा शब्द रुपी प्रवास काही भागात आपण करणार आहोत.
अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे वेगवेगळे संदर्भ आणि ऐतिहासिक महत्व या शहराला प्राप्त झाले आहे. अंबाजोगाई शहराच्या मध्यभागातुन खळखळत वाहत जाणारी जयवंती नदी ही अंबाजोगाई शहराच्या ऐतिहासिक संदर्भातील एक महत्वाचा भाग/संदर्भ आहे. याच नदीच्या तीरावर माता योगेश्वरी आई, जैन व वैष्णव गुहा, हत्ती खाना, माता रेणुका आई, मराठीचे आद्दकवी स्वामी मुकुंदराज आणि पुढे जडीबुटी चे जनक बुट्टेनाथ यांची भव्य मंदीरे आज ही दिमाखात उभी आहेत.

पुर्वी विस्तीर्ण नदी पात्र असलेली ही नदी शहर विकासाच्या रेट्यात जमिनीला जसजसे महत्व येत गेले, तसतशी ही नदी अरुंद होत गेली. एवढी अरुंद झाली की शहरात विस्तीर्ण पात्र असलेल्या या नदीचा नालाच झाला. शहरातील विविध वस्त्यांचे घाण पाणी, ऍटो मधुन भरुन आणलेले हेअर सलुन च्या दुकानातील केस, हॉटेल मधील उपचार ष्ट सोडलेले अन्न, शहरातील खाजगी हॉस्पिटल मधली घाण जयवंती नदीच्या पात्रात टाकण्यात येत असल्यामुळे ही नदी आता नदी न रहाता सांडपाणी वाहून नेणाऱ्या एका गटाराच्या स्वरुपात दिसते आहे.
२०१४ च्या २७ -२८ ऑगस्ट रोजी येथील मानव लोक परिसरात जैन एरिगेशन सिस्टीम, अफार्म, मानव लोक आणि गांधी रिसर्च सेंटर जळगाव या चार संस्थांनी मिळून “ग्राम विकासासाठी सक्षम जलनिती परिषद” ही दोन दिवसीय कार्यशाळा घेतली होती. या परिषदेला मॅगॅसेस पुरस्कार विजेते आणि ज्यांची संपुर्ण भारतात “पाणी वाले बाबा” म्हणून ज्यांची ओळखच आहे ते डॉ. राजेंद्रसिंह यांच्या सोबत महाराष्ट्रातील नामवंत जलअभ्यासक उपस्थित होते. सतत दोन दिवस चालणाऱ्या या शिबीरात डॉ. राजेंद्र सिंह यांचे व इतर वक्त्यांचे ही खुप छान मार्गदर्शन पर भाषणे झाली. डॉ. राजेंद्रसिंह यांनी तर आपल्या या दोन दिवसांच्या कार्यशाळेत मरणासन्न झालेल्या नद्या, विहिरीतील पाण्याचे स्त्रोत कसे पुन: प्रवाहीत करावेत याचे अत्यंत चांगले मार्गदर्शन त्यांनी केलेल्या कामाची अनेक उदाहरणे देत केले होते.
मॅगॅसेस पुरस्कार विजेते असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांनी या दोन दिवसांच्या शिबीर काळात पाणी प्रश्नांबाबत अस्था असणाऱ्या सामान्य माणसाला ही वेळ देवून त्यांना मार्गदर्शन केले. साधा पायजामा, झब्बा, गळ्याभोवती मफलर व खांद्यावर शबनम पिशवी घातलेल्या या पाणी वाले बाबांचा सहवास विसरणे शक्य नाही.
यांच्याच प्रेरणेने पुढे २०१९ मध्ये कोवीड सुरु होण्याआधी अंबाजोगाई शहरातील प्रख्यात सर्जन डॉ. नितीन चाटे, प्रा. अरुंधती पाटील, डॉ. राहुल धाकडे, विजय रापतवार यांच्यासह त्यांच्या इतर मित्रांनी जयवंती आणि वाण नदी पात्र प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी दररोज सकाळी ६ ते ७:३० असे दीड तास श्रमदानाचे मोठे काम सुरू केले आणि पंधरा दिवसांतच बुटेनाथ परिसरातील जयवंती आणि वाण नदीचे पात्र प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी शहरातील शेकडो हात या पवित्र कामात सहभागी झाले. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता हे विशेष. श्रमदानासाठी आलेल्या हजारो हातांनी पावूस सुरु होण्यापूर्वी या नदीपात्रात प्लॅस्टिक चा एक ही तुकडा दिसणार नाही एवढे नजर लागल्यासारखे काम केले. या अभियानात मला ही काही महिने सहभागी होता आले यांचा आनंद आहे.
एकीकडे शहरालगत असलेल्या डोंगरातील बुट्टेनाथ परिसरात नदीचे पात्र स्वच्छ व रुंद करण्याचे काम चालू असतानाच शहरातील जयवंती नदीवर अतिक्रमण करण्याचे काम ही भु माफियांनी मोठ्या युध्द पातळीवर सुरू केले. अनेक ठिकाणी जयवंती नदीचे पात्र आपल्या जागेतून जात आहे असे सांगत पुर्वा पार चालत आलेल्या नदी पात्राचा प्रवाह बदलण्यात आला. तर शहरातील मुख्य रस्त्यावरील नदीचे पात्र जणू आपल्याच पुर्वजांची जागा आहे अशा अर्विभावात पक्की बांधकामे करण्यात आली.
शहराचे सौंदर्य, ऐतिहासिक आणि धार्मिक आणि पारंपारिक वारसा जपण्याची जबाबदारी भारतीय घटनेने ज्या ज्या शासकीय कार्यालयांवर सोपवली ती सर्व कार्यालये आपला खिसा गरम करून घेत जयवंती नदीचे लचके तोडण्याचे हे काम उघड्या डोळ्यांनी बघत बसली.
या नदीचा गुदमरत चाललेला श्वास मोकळा करण्यासाठी, जयवंती नदीचा जीव घोटत, गुदमरत जात असतांना या नदीला वाचवण्यासाठी शहरातील नागरीक, नगर परीषद प्रशासन, तहसील प्रशासन एवढेच काय पर्यावरण आणि प्रदुषण मंडळाचे अधिकारी कर्मचारी पुढे सरसावत नाहीत हे लक्षात येताच औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने वर्तमान पत्रात तुन प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा व त्यांच्या स्त्रोताकडून मिळवलेल्या माहितीच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जानेवारी २०२२ मध्ये नदीच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला.
औरंगाबाद उच्च न्यायालयाचे खंडपीठ या जयवंती नदीच्या संवर्धनासाठी पुढे सरसावले. खंडपीठाने या प्रकरणी सुमो टूओ (याचिका ९९९ सुमो टूओ पीआय एल क्र. २ ऑफ २०२१) दाखल करुन घेतली. जयवंती नदी ही जनता आणि प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा बळी ठरल्याचा ठपका याचिकेत ठेवण्यात आला. याचिकेत राज्य शासन, सचीव, पर्यावरण व हवामान बदल खाते, सचीव नगर विकास आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, बीड जिल्हाधिकारी, अंबाजोगाई तहसीलदार आणि अंबाजोगाई नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले.
“काय आहे सुमो टू?!”
यासंदर्भात “सुओ मोटो” याचिका म्हणजे काय हे आपण समजून घेवून. सुमो मोटो म्हणजे सरकारी एजन्सी न्यायालयाव्दारे किंवा केंद्रीय प्राधिकरणाने इतर केलेल्या आरोपावरुन केलेली कारवाई. माध्यमांद्वारे अथवा तृतीय पक्षांच्या सुचनांव्दारे अधिकारांचा अथवा कर्तव्याची उल्लंघन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कायदेशीर प्रकरणासाठी न्यायालय सुओ मोटो याचिका दाखल करून घेत असतात. जनतेच्या हितासाठी अशी प्रकरणे दाखल करुन घेणे आणि निर्णय देणे यांचा विशेष अधिकार राज्य घटनेने न्यायालयांना दिलेला आहे. यामुळे अशा याचिकांना विशेष महत्त्व आहे.
जयवंती नदी संदर्भात दाखल करून घेण्यात आलेल्या या सुओ मोटो याचिकेत नदीचे संवर्धन करण्यासाठी वरील शासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा दिसुन आला असून सदरील नदीला विळखा घालणारी अतिक्रमणे ही काढण्यात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आला असल्याचे म्हटले आहे. या सुओ मोटो याचिकेत ऍड. सचिन देशमुख यांची न्यायालयाचे मित्र म्हणून काम पहाण्याचे सांगण्यात आले होते.
जयवंती नदीच्या स्वच्छतेसंबंधी व एकुण तिच्या अस्तित्वा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २०२१ साली सुओ-मोटु याचिका (९९९ सुओ-मोटु पीआयएल) क्र. २ ऑफ २०२१ दाखल करुन घेतली होती. या याचिके संदर्भात न्यायालयाने २४ जानेवारी २०२३ आदेश पारीत केले आहेत. या आदेशाच्या संदर्भाने नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना ३१ जानेवारी २०२३ रोजी कार्यालयीन पत्र देवून नगर परिषदेच्या हद्दीतील जयवंती नदीचे पात्र स्वच्छ करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
या संदर्भात नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना एक कार्यालयीन पत्र देऊन”मा न्यायालयाने दिलेल्या वरील निर्देशाच्या अनुषंगाने आपणाला या कार्यालयीन आदेशाद्वारे सूचित करण्यात येते की, नगर परीषद हद्दीतील जयवंती नदीच्या प्रवाहाच्या मार्गात जी अस्वच्छता आहे ती सर्व तात्काळ स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात यावे. यासाठी आपण आपल्या विभागाकडील सर्व यंत्रणा त्यासाठी वापरावी. त्याव्यतिरिक्त आपणाला काही यंत्रणा आवश्यक असल्यास आपण त्याचा देखील वापर करावा आणि या कार्यालयीन आदेशाचे दिनांका पासून जयवंती नदीच्या प्रवाहाच्या स्वच्छतेचे कामकाज सुरु करावे. काम करत असताना काम सुरु करण्यापूर्वीचे GPS फोटो आणि काम केल्यानंतरचे GPS फोटो घेण्यात यावेत. काम समाप्त झाल्यावर केलेल्या कामाच्या अहवालासोबत सर्व फोटो कार्यालयाला सादर करण्यात यावेत जेणे करून सदर सर्व दस्ताऐवज मा. न्यायालयाला सादर करता येईल. असे म्हटले होते.” या कार्यालयीन आदेशावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांची स्वाक्षरी होती.
औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १ फेब्रुवारी पासून स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी आपल्या विभागामार्फत जयवंती नदीचे उगमस्थान असलेल्या भीमकुंडापासुन स्वच्छतेस सुरुवात केली. त्याच दिवशी दुपारपर्यंत हे काम शहरातील मुख्य रस्त्यावरील पुलापर्यंत आले होते. नगर परीषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने जयवंती नदीच्या स्वच्छतेचे काम करतांना जेसीबीच्या सहाय्याने फक्त नदीपात्रातील कचरा, व साचलेली घाण तात्पुरत्या स्वरूपात नदीपात्रात संरक्षण भिंतींच्या बाजूला गोळा करून ठेवण्यात आली होती. हे काम नगर परीषदेची हद्द संपणा-या राजस्थानी स्मशानभूमीपर्यंत करण्यात येणार असल्याचे तेंव्हा स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी सांगितले होते.
यानंतर जयवंती नदी पात्रातील अतिक्रमण हटवण्यासाठी शहरातील विविध राजकीय पक्ष संघटनांनी आंदोलने केली. राज्य शासनाच्या विविध कार्यालयांना वेठीस धरले. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात वैयक्तिक हेवेदावे, राजकीय वैमनस्य यातुन न्यायालयीन केसेस दाखल करण्यात आल्या. शहरातील डिजिटल मेडियाने तर सलग महिनाभर आपापल्या यु ट्युब वरील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून या अतिक्रमणा संदर्भात चलचित्रांसह वार्तांकने दाखवली. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या संबंधित शासकीय अधिकारी यांच्यावर काडीचाही फरक पडला नाही. नदी पात्र बदलणारे भुमाफीये, नदीपात्रावर अतिक्रमण करुन पक्क्या इमारती बांधणा-या लोकांवर काहीही कारवाई झाली नाही.
मागील दोन महिन्यांपासून डिजिटल मेडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी या प्रश्नावर पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. मात्र या आंदोलनाकडे शासकीय अधिकारी फारसे लक्ष देताना दिसत नाहीत. कदाचित या आंदोलना मागील प्रेरणा आणि उद्दिष्ट याची नेमकी माहिती या संबंधीत अधिका-यांना मिळाली असण्याची शक्यता वाटते. त्यामुळेच अभिजित लोमटे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर या संदर्भात एक बोलकी पोस्ट शेअर करुन “जयवंती नदी प्रकरणी कोणीही मॅनेज होवो, अभिजित लोमटे मॅनेज होणारा तिला नाही. विनाकारण इतरांवर पैसे वेस्टेज करु नयेत असे म्हटले आहे.”
🙏