जयवंती नदीच्या संवर्धनासोबतच शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हा ही ज्वलंत प्रश्न ; माजी आमदार संजय दौंड


अंबाजोगाई शहरातुन वाहत जाणाऱ्या जयवंती नदीच्या संवर्धनासाठी शहरातील सोशल मीडिया गेली दहा दिवस आवाज उठवत आहे याचे स्वागत करुन शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमणे हा ही जयवंती नदी संवर्धना इतकाच ज्वलंत प्रश्न असून या प्रश्नासंदर्भात सोशल मीडिया का आवाज उठवत नाही असा सवाल विधान परीषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी उपस्थित केला.
जयवंती नदीच्या संवर्धनासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या एका विस्तृत बैठकीत विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड बोलत होते. आपल्या विस्तारीत निवेदनात संजय दौंड पुढे म्हणाले की, अंबाजोगाई शहरातील जयवंती नदीच्या संवर्धनाचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या नदीचे पात्र निश्चित करण्यात यावे, नदी पात्रात जर अतिक्रमणे झालीच असतील तर ती उठवण्यात यावीत या मागणीचे मी एकटाच नाही तर अंबाजोगाई शहरातील सर्व नागरीकांचे समर्थन राहील यात शंका नाही. असे सांगत त्यांनी जयवंती नदीच्या संवर्धना एवढाच महत्वाचा प्रश्न शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमणे हा असून या संदर्भात डिजिटल मेडिया आवाज का उठवत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


अंबाजोगाई शहरातील सर्व रस्त्याच्या दुतर्फा आज अतिक्रमणाने विळखा घातला आहे. रस्त्यावरील दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तर त्या पुढील जागेत लहानमोठे व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. या व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांपुढे फळ विक्री करणारे गाडे उभेच असतात. एखादी बस जाण्यापुरती ही जागा या चारपदरी रस्त्यावर उतरत नाही, बसडेपो, बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक, होंडा रोड, मंडी बाजार, गुरुवार पेठ, सदरबाजार, मेडिकल परीसर, यशवंतराव चव्हाण चौक व इतर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची चढाओढ लागली आहे. यातच आता नवीन चौकांच्या निर्मितीला उधान आले आहे. चार रस्ते एकत्र येतात तो चौक ही संकल्पनाच आता अंबाजोगाई शहरात मोडीत निघाली आहे. तीन रस्ते एकत्र आले तेथे ही चौकांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणारे शासकीय अधिकारी आणि शासकीय यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधून आणि डोक्यावर बर्फाचा ढेप ठेवून स्वस्थ बसून आहे. अशा परिस्थितीत व शहरातील माय-माउलींना, शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींना आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत तेंव्हा जयवंती नदीच्या संवर्धना सोबतच शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हा ही ज्वलंत विषय असून याही प्रश्नावर आंदोलन होण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी व्यक्त केले.


या बैठकीत शैलेश कांबळे यांनी जयवंती नदीच्या संवर्धनासाठी सर्व प्रथम २००५ मध्ये आपण आवाज उठवला होता. या नदी संदर्भात २००५ साली केलेला पत्रव्यवहार, शासकीय अधिकारी यांनी पाठवलेली या संदर्भातील पत्रे व जयवंती नदीचे पात्र किती रुंद आहे यासंबंधीची निजाम राजवटी पासुन ची महत्वाची कागदपत्रे आपल्या कडे असल्याचा दावा ही त्यांनी केला. जयवंती नदी संवर्धना साठी सुरु असलेली ही चळवळ आता अधिक सक्षमपणे पुढे नेली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.


या बैठकीत राजेश वाहुळे, सुनील जगताप, महादेव आदमाने, गोविंद मस्के, मदन परदेशी, सुनील वाघाळकर, संतोष शिनगारे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, अंकुश ढोबळे, गजानन वांगीकर, पद्माकर सेलमुहकर, असिफोद्दीन खतीब, स्थानिक डिजीटल मेडियिचे प्रतिनिधी, यांच्या सह विविध राजकीय संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे संचालन सुनील जगताप यांनी केले तर आभार संतोष शिनगारे यांनी मानले.