खा. संजय राऊत यांच्या सुटकेसाठी भावाची धावाधाव; भाजप नेत्यांच्या घेतल्या गाठीभेटी!
संजय राऊत यांच्या जामिनासाठी भाजपा तयार होईल ?

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या खा. संजय राऊत यांच्या सुटकेसाठी आता त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी धावाधाव सुरु केली आहे. अलिकडेच त्यांनी भाजपाच्या अनेक वरीष्ठ नेत्यांच्या भेटी घेवून या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली असल्याची चर्चा आहे तर सध्या ते दिल्लीत ईडीच्या वकिलांना भेटायला गेल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाच्या बड्या नेत्याकडून यात मध्यस्थीचा प्रयत्न सुरु असल्याचंही सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या जामिनासाठी भाजपा तयार होईल काय हा खरा प्रश्न आहे.
राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जेलमध्ये आहेत. ईडीने (ED) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. संजय राऊत यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण आज अनोखे कनेक्शन आणि कुणालाही विश्वास बसणार नाही, असा प्रयत्न संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut)करत असल्याची चर्चा आहे. याविषयी अजून कुणीही खात्री केलेली नाही पण शक्यतांना वेग आला आहे.
संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली, यानंतर सुनील राऊत हे थेट मुंबई विमानतळाकडून दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे.
सुनील राऊत हे दिल्लीत ईडीच्या वकिलांना भेटायला गेल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाच्या बड्या नेत्याकडून यात मध्यस्थीचा प्रयत्न असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण संजय राऊत यांना खरोखर भाजपाकडून सॉफ्ट कॉर्नर दिला जाईल का? संजय राऊत यांच्याविरोधात आज भाजपाचे डझनाहून जास्त नेते आहेत, ते संजय राऊत यांना जामीन द्यावा, हे मनापासून मान्य करतील का? हे देखील प्रश्न आहेत.
संजय राऊत यांची सुटका व्हावी, म्हणून जो काही ४ भिंतीत कथित तह होईल, तो भाजपाला आणि संजय राऊत यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भाजपातील नेत्यांना मान्य होईल का? जे कार्यकर्ते सोशल मीडियावर शिव्या खात होते आणि देत होते, त्यांना देखील हे मान्य होईल का?
जे संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन भाजपाला घायाळ करत होते, सामनामधून टीकेचे बाण सोडत होते, ज्या संजय राऊतांनी शेवटपर्यंत मातोश्रीसोबत आपलं नातं अधिक विश्वासाचं आणि घट्ट आहे हे दाखवून दिलं. ते राऊत यूटर्न घेतील का? भाजपा नेते किरिट सोमय्या यानंतर शांततेची भूमिका घेतील का?
दुसरीकडे संजय राऊत हा अनोखा तह झाला, तर बाहेर येऊन शांत बसतील का, किंवा भाजपासोबतचा कथित तह होईल, तर तो मान्य करतील का? संजय राऊत जेलमध्ये राहण्याच्या भीतीने तयार होतील असं वाटतं का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.
