केज जागं आहे का?; प्रा. हनुमंत भोसले


अत्यंत खडतर काळातून पुढे आल्यानंतर केज शहर कात टाकत असल्यासारखे वाटले. शहरात कांही प्रस्तावित शासकीय इमारतीं निर्माण झाल्यानंतर याच गतीने केज पुढे जाईल असे वाटत होते. वेळोवेळीच्या सत्ता बदलाचा कांही परिणाम होईल अशी आशा होती, मात्र केज आहे त्याच विकासाच्या थांब्यावर थांबले आहे. केज शहरातील शेकडो समस्या आ वासून उभ्या आहेत. ज्या समस्येवर केजचे जनजीवन पूर्णतः आधारलेले आहे त्या केजच्या व्यापाऱ्यांचा जागेचा प्रश्न, उमरी रस्ता प्रश्न, नाट्यगृह, क्रीडांगण, शहरातील मंगळवार पेठे रस्त्यासह प्रमुख रस्ते आजही प्रलंबित आहेत. आज केज शहरातील व्यावसायिक दुकानांचे जागा भाडे गगनाला पोहोंचले आहेत? गेली तीस वर्षे या प्रश्नावर केजच्या राजकारणाने व्यापाऱ्यांना काय दिले ? केवळ आश्वासने ? दुकानाचे भाडे भरताना कुटुंब जगवणे या छोटे व्यापारी व टपरी धारकांना अवघड झाले आहे. कुठे आहे केजचा विकास?
उमरी रस्ता, कानडी रस्ता व मंगळवार पेठ रस्ता हे शहरातील प्रमुख रहदारीचे रस्ते गेली 20-30 वर्षांपासून मोकळा श्वास का घेऊ शकले नाहीत?


स्वार्थी, भ्रष्ट व नामर्द राजकारणाचे हे फलित आहे. केज शहरात आर्थिक स्रोत निर्माण करणारे आठवड्यात दोन बाजार भरतात. हे बाजार कुठे आणि कसे भरतात? बाजारात येणाऱ्या भाजी विक्रेते व इतर व्यवसायिकांना कोणत्या सुविधा दिल्या जातात ? या विक्रेत्या कडून प्रत्येकी किमान 10 रुपयांची कर रूपाने केज नगरपंच्यायत पावती फाडते. त्या मोबदल्यात केज नगरपंच्यायत या लोकांना काय देते? कांहीच नाही. एकाही बाजार स्थळी त्यांना बसण्यासाठी योग्य व पुरेशी जागा नाही, सावली नाही, पिण्याचे पाणी नाही, शौचालय सुविधा नाही. तर मग आम्ही गुन्हेगार नाहीत का ? कोणत्या नैतिकतेच्या गप्पा आम्ही मारतोय? हे लोक आपापल्या पोटापाण्याच्या नियोजनात व्यस्त आहेत त्यामुळे तुमच्या विरोधात संघर्ष करायला त्यांच्याकडे वेळ नाही नसता या अन्यायाविरोधात जेंव्हा कधी ते जागे होतील त्या वेळी प्रशासन म्हणून तुम्हाला पळायला जागा मिळणार नाही. केजच्या शिक्षणाची जननी म्हणून जीच्याकडे पाहिले जाते ती केजची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बंद करण्याचे पाप कोणी केले ? यातील दोषींना त्यांचे आयुष्यही माफ करणार नाही. आजही गोरगरिबांच्या मुलांना शासनाच्या सवलतीसह गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या शाळेची केज शहराला गरज आहे. कारण केज नगरपंच्यायतला 12 वर्षे अर्थात एक तप पूर्ण झाले परंतु नागरिकांकडून पुरेसा शिक्षण कर वसूल करणाऱ्या नगरपंच्यायतने शहरात चांगल्या शिक्षण प्रसारासाठी नगरपंच्यायतची एखादी शाळा तर सोडाच पण साधी कुठे अंगणवाडी देखील उघडली नाही. आपापल्या खाजगी शाळांना अडचण नको म्हणून अशा गोष्टीकडे सत्ताधारी व विरोधक एकमताने निर्णय घेताना दिसतात. हीच गोष्ट केजवासीयांच्या आरोग्य चिकित्सा व उपचाराबाबतीत घडताना दिसतेय. केज शहरात असणारे शासकीय उपजिल्हा रुग्णालय शहरापासून दोन किमी दूर आहे. सामान्य व गरीब रुग्णांना तेथे पैसे खर्च करून रिक्षा किंवा इतर वाहनाने तेथे पोहोंचावे लागते. रुग्णालयाची इमारत भव्य झाली मात्र सुविधा त्या प्रमाणात मिळत नाहीत.


रुग्णालयात अत्यावश्यक डॉक्टर्स व त्यांची संख्या उपलब्ध नाहीत. अनेक मशिनरी ज्या उपजिल्हा रुग्णालयात हव्या आहेत उपलब्ध नाहीत व ज्या आहेत त्या ऑपरेटर्स अभावी धूळ खात पडून आहेत. परिणामतः या उपजिल्हा रुग्णालयातुन आंबेजोगाईला रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण 60 टक्क्यांहून अधिक आहे. ज्या रुग्णावर उपचार केले जातात त्यांना औषधी बाहेरून विकत आणण्यासाठी सांगितले जाते अशा सामान्य व गरीब रुग्णांच्या तक्रारी आहेत. कांही अपवादात्मक डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी इमानदारीने काम करतात त्यांचे कौतुकच करू यात परंतु कांही राजकीय आश्रयाखाली असणारे डॉक्टर्स व कर्मचारी रुग्णांना चांगली वागणूक देत नाहीत. याचा परिणाम रुग्णालयाच्या एकूण व्यवस्थापनावर होताना दिसतोय. यापूर्वी शहरात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र होते. जवळ असल्याने लोक उपचार घ्यायचे. मात्र नागरपंच्यायत झाल्यानंतर व उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर ते युसूफ वडगाव येथे हलविण्यात आल्याचे कळते. शहरात आता सोयीचे शासकीय उपचार केंद्र नाही. साध्या सर्दी-पडसे व तापीसारख्या आजारावर उपचार घ्यायला उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते. याबाबतीतही केज नगरपंच्यायतच्या कर पावतीवर आरोग्य कर आकारलेला असल्याने शहरात नगरपंच्यायतचा दवाखाना का सुरू करत नाही?
अलीकडील काळात केज शहराच्या मुख्य महामार्गाच्या कडेने मांस विक्रीची दुकाने मोठ्या संख्येने थाटली आहेत. मांस विक्री हा अत्यावश्यक व्यवसाय आहे. तो थांबवता येणार नाही. हे खरं असलं तरी या मांस विक्री दुकानदारांना नगरपंचायत कांही नियमावली का घालून देत नाही. ते ऐकतील. सर्वच जाती-धर्मातील अनेक लोकांना असे उघड्यावर मांस पाहणे किंवा त्याचा येणारा वास घेणे असहाय्य होते. विशेषतः पावसाळ्यात हे खूपच असहाय्य बनते. अशा वेळी या दुकानांना एकतर वेगळी जागा द्यावी नसता ते सध्या शक्य नसेल तर या दुकानांच्या समोरच्या बाजूने येणाऱ्या जाणाऱ्यांना सरळ सरळ दिसणार नाही असे पडदे किंवा इतर व्यवस्था करायला लावावी तसेच स्वच्छता ठेवायला लावून टाकाऊ मांस किंवा इतर अवयव दूर टाकण्यासाठी सूचना द्याव्यात व तशी व्यवस्था देखील नगरपंच्यायतने करून द्यावी. यासाठी केज विकास संघर्ष समितीने नगर पंचायत कडे मागणी केली असता आश्वासन देण्यात आले होते मात्र कार्यवाही अद्याप झालीच नाही. हा विषयही खूप महत्त्वाचा आहे. केज शहरातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी , कार्यकर्ते व इतर जबाबदार लोक दिवसातून अनेकवेळा या रस्त्यावरून ये-जा करतात तर मग त्यांना ही समस्या जाणवत नाही का?
शहरातील नाट्यगृहाचा विषय फक्त अभिनंदन व आभार यापुरताच मर्यादित राहीला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह मंजूर झाल्याचे दोन्ही आमदारांनी घोषणा करूनही अर्ध्यावर का राहतो. नेमकं कोण कमी पडतंय व घोड कुठं पेंड खातंय? शासकीय कामात अडथळे असतात हे मान्य आहे पण ते अडथळे वेळेत पूर्ण करून विहित मुदतीत काम पूर्ण करणेही लोकप्रतिनिधींची कर्तव्ये नाहीत का? निधी उपलब्ध असताना जागा उपलब्ध नसते तर जागा उपलब्ध झाली असताना निधी परत जातो. कारणे कांहीही असोत ती मान्यही करता येतील पण केजच्या कलागुणांना वाव देणारे नाट्यगृह आजही केजसाठी उपलब्ध नाही याचं काय ? कारणे व अडचणी ऐकूनच केजवासीयांनी शांत बसायचं का?
केज शहरातुन दोन महामार्ग गेले आहेत अशा वेळी केजसाठी एसटी डेपो होणे गरजेचे आहे. जुना तालुका असताना आजही केजच्या नावाने केज हुन लांब पल्याची एकही गाडी सुटत नाही. यासाठी बसडेपो आवश्यक आहे. एसटी डेपो ची जागा प्रस्तावित असूनही अद्याप डेपो साठी कोणतीही कार्यवाही होत नाही.
याशिवाय केज व तालुक्यातील युवकांच्या व नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरात एमआयडीसी सारखा प्रकल्प आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न राजकीय स्तरावर होताना दिसले नाहीत.


गेली तीन ते साडेतीन वर्षे केज शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू आहे.या महामार्गाच्या अनियमित व चुकीच्या व्यवस्थापणाचा केजवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागला. 25 ते 30 वर्षे वयाचे आठ दहा तरुण मुले व कांही नागरिकांचे प्राण गमवावे लागले. मात्र या बाबतीत राजकीय क्षेत्र कधीच आक्रमक झालेले दिसले नाही. आजही हे काम अपूर्ण आहे धारूर रोड वरील सानेगुरुजी विद्यालयाजवळच्या पुलाजवळ मृत्यूचा सापळा असावा असे खड्डा आहे. अशीच अवस्था इतरही अनेक ठिकाणी आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का आहेत ?
मी मांडत असलेल्या वास्तव तक्रारी व भूमिकेचा कांहीना राग येईल व नाराजीही राहील परंतु त्यांना एकच सांगायचे आहे की हे जीवन नाशवंत आहे उद्या तुमचीही मुले व नातवंडे याच केजच्या रस्त्यावर वागणार आहेत. ते केवळ तुमच्या अलिशान घरात बसून जीवन जगू शकणार नाहीत. किमान त्यांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून तरी चालावे लागेल. केजच्या चांगल्या भविष्यासाठी अशा नाराजी व रागाचा स्वीकार करूनच आम्ही चालायचं ठरवलंय. कारण काळ कोणासाठी थांबत नाही व काळाच्या आड काय दडलंय हेही माहीत नसतं.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे केज नगरपंच्यायतचे व्यवस्थापन. सध्या तरी हे व्यवस्थापन योग्य असल्याचे दिसत नाही. धनेगाव धरण काठोकाठ भरले असताना केज शहरात आठवडा-पंधरा दिवसांनी यावे ही मोठी शोकांतिका आहे. पाणी नेमके कुठे अडते? दररोज शुद्ध व पुरेसे पाणी नागरिकांना पुरवणे हे नगरपंच्यायतचे कर्तव्य आहे. शुद्ध व पुरेसे पाणी नियमित व वेळेवर येत नसेल तर लोकांनी पुढे येऊन कर का भरावा याचा विचार होणे गरजेचे आहे. एवढ्या वर्षानंतरही केजच्या धारूर रोड लगतच्या विस्तारित वस्तीसह अनेक इतर विस्तारित भागात अद्याप पाईपलाईनच पोहोंचलेली नाही.
पाणी व वीज पुरवठ्यासाठी निवडणूक तोंडावर लोकांची मते घेण्यासाठी केलेले काम वगळता नंतर पाच वर्षे काम होत नाही.
नगरपंचायत ने कचरा व्यवस्थापनावर बऱ्यापैकी काम सुरू केले आहे. मात्र शहरातील नाल्या व रस्ते यांची अवस्था आजही फारसी चांगली नाही. निवडून दिलेल्या नगरसेवकांकडून कोणत्या मनाने विकासाची अपेक्षा करावी हाच मोठा प्रश्न आहे. मतदानाच्या मोबदल्यात या नगरसेवकांकडून लोकांनी जी लाच स्वीकारली ती पाहता या नगरसेवकांना कोणताही जाब विचारण्याचा अधिकार जनतेला राहिला आहे असे मला वाटत नाही. अत्यंत छोट्या लोभापोटी लोकांनी आपले अत्यंत किंमती स्वातंत्र्य व अधिकार खुलेआम विकला आहे. दुसरीकडे नगरपंच्यायतची व्यवस्थापन प्रणालीही फारशी चांगली असल्याचे दिसत नाही.
लोकांची दैनिक कामें करून देण्यासाठी नगरपंचायत चे अधिकारी व कर्मचारी अरेरावी व अडवणूक करतात अशी नागरिकांची मोठीं तक्रार आहे. नगरपंचायत मध्ये कामासाठी पैसे लागतात हा गेली 20 वर्षाचा लोकांचा सूर आजही कायम आहे. अशावेळी कुठे, कधी असे झाकाझाकीचे प्रश्न विचारण्यापेक्षा आपण हे वास्तव स्वीकारून यंत्रणेतील दोष दूर करावे लागतील हेच खरे. केज
नगरपंचायत ला गेली 10 वर्षांपासून कायमचा मुख्याधिकारी मिळालेला नाही. तात्पुरत्या काळासाठी व प्रभारी म्हणून येणारे अधिकारी केज शहराच्या विकासाची कामे जबाबदारीने करण्यापेक्षा केवळ वेळ काढून पैसे मिळवून देणाऱ्या कामानांच प्राथमिकता देताना दिसतात. यासाठी केज नगरपंच्यायतला कायमचा व पूर्ण वेळ मुख्याध्याकारी असणे गरजेचे आहे.
केजच्या या प्रश्नांना सोडविण्यासाठी आता येथील युवकांना पुढे यावे लागेल. युवकांनो, तुम्ही आता आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहात. हळू हळू केजच्या उज्वल भविष्याची सूत्रे तुमच्या हाती येऊ लागली आहेत. या पूर्वीचा काळ वेगळा होता पण आता यापुढे केजमध्ये जे चांगले होईल त्याचा आनंद तुम्हाला मिळेल व जे वाईट होईल त्याचे परिणामही तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. तुमची मुले कधी लहानाची मोठी झाली हे तुमच्या लक्षातही येणार नाही. लक्षात असू द्या, या तुमच्या मुलांसाठी केज कसे असावे हे तुम्हाला ठरवायचंय. म्हणून आता राजकारण व नातेसंबंध बाजूला ठेवून उद्याच्या “सुंदर केज” साठी तुम्हाला तुमचं सर्वस्व पणाला लावायचंय. तुम्हाला माहीत आहे कोणत्याही शहराचे नांव व वैभव येथील उंच उंच इमारतीवर नव्हे तर येथील तुमच्यासारख्या केजसाठी सर्वस्व पणाला लावणारे व केजवर भरभरून प्रेम करणारे येथील सर्वच जातीधर्मातील युवक व नागरिक हेच केजचे खरे वैभव आहे. केज शहरातील किमान 100 युवकांनी आता या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या निर्धाराने एका अराजकीय प्लॅटफॉर्मवर एकत्र येणे गरजेचे आहे. ही ताकदच केजसाठी अंतिम पर्याय बनू शकेल. आता कोणाचीही भीडभाड ठेवून आयुष्य जगता येणार नाही. वरील सर्व समस्या सोडवण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या सर्वांविरोधात निपक्ष व प्रामाणिकपणे संघर्ष करावाच लागेल कारण हे सर्व प्रश्न केवळ आमचे नाहीत तर उद्या मोठे होणाऱ्या येणाऱ्या पिढीचेही आहेत.
मी, केजचा अभिमान असणाऱ्या बुद्धिजीवी, स्वाभिमानी, प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या व सामाजिक भान असणाऱ्या केजच्या युवक व नागरिकांना या संघर्षासाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहे. फक्त 50 ते 100 युवक व नागरिकांचे एक भक्कम संघटन वरील सर्व समस्या सोडवण्यासाठी पुरेसे आहे. चळवळीच्या मागे माणसे भक्कमपणे उभी राहत असती तर यापैकी बऱ्याच समस्या मागेच सुटल्या असत्या. पण समाज खोट्या आश्वासनाच्या राजकारणाच्या संपूर्ण आहारी गेलाय. अशा वेळी आता केजबद्दल आस्था व तळमळ असणारे लोकच केजसाठी कांहीतरी करू शकतील असा आशावाद बाळगून आपणांस ही हाक देत आहे.
🙏
प्रा. हनुमंत भोसले


केज च्या शैक्षणिक क्षेत्रातील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. हनुमंत भोसले यांची ओळख आहे. पत्रकारीता, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, रोटरी क्लब, माजी सैनिक संघटना, खाजगी कोचिंग क्लासेस संघटना, केज शहर विकास समिती आदि संस्थांच्या माध्यमातून सतत कार्यरत असणारा कार्यकर्ता म्हणून हनुमंत भोसले सर्व परिचित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी क्लासेस क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या पाठिशी खंबीर पणे उभा राहून शैक्षणिक क्षेत्रातील खाजगी क्लासेस मध्ये कार्य करणाऱ्या सर्वाना प्रत्येक संकटात पाठीशी राहून कोवीड काळात सुध्दा त्यांना उपजीविका करता यावी व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र भरातील क्लासेस चालू करण्यासाठी उभारलेले पहिले आंदोलन बीड जिल्ह्यातून प्रा. हनुमंत भोसले यांनी सुरू केले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी त्यांची सतत धडपड असते.