अन्नत्याग आंदोलनात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १०० महिला घेणार सहभाग


ऍड. संतोष पवार यांची माहिती
शेतकरी आत्महत्याप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी घ्या अन्नत्याग आंदोलनात अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १०० महिला सहभाग घेणार असल्याची माहिती आधार माणुसकीचा या संस्थेचे अध्यक्ष ऍड. संतोष पवार यांनी दिली.
देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने गेली सात वर्षापासुन १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १०० महिला सहभाग घेणार आहेत.


विविध मागण्यांसाठी काढणार मुक मोर्चा
हा मुकमोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदारांना एक निवेदन देण्यात येणार असून या निवेदनात शेतकरी आत्महत्यांग्रस्त कुटुंबांना घरकुल योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावा, आर्थिक कर्जपुरवठा करण्यात यावा, मुलांच्या शिक्षणासाठी बालसंगोपन योजना सुरु करण्यात यावी, विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.


उपवासात ही घेणार सहभाग!
अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेण्यापुर्वी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १०० महिलांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर आधार माणुसकीचा संघटनेचे अध्यक्ष ऍड. संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात येणार असून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अंबाजोगाई यांना देण्यात येणार आहे. या नंतर हा मोर्चा अन्नत्याग आंदोलनाचा एक भाग असलेल्या नगर परिषदेच्या आद्दकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहासमोरील चिंचेच्या झाडाखाली उपोषणिस बसलेल्या किसानपुत्रांच्या उपोषणात सहभागी होणार असून पुढे व्याख्यान व सामुहिक उपवास सोडण्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.