अतीवृष्टीत ४,३२७ शेतकरी बाधीत; २,७६२ हेक्टरवरील पीकांचे नुकसान!


पालकमंत्री अतुल सावे यांची माहिती
राज्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याच्या नैसर्गिक संकटामुळे शेतातील पीक मातीमोल झाले असून गारपीट व वादळीमुळे घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे, जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येत आहेत. पावसाच्या तडाख्यामुळे व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व कुटुंबांना शासनाच्यावतीने मदत करण्यात येईल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खंबीरपणे आधार देऊन उभे करण्याचे काम शासन करेल यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे प्रतिपादन राज्याचे सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
४,३२७ शेतकरी बाधीत
बीड जिल्ह्यात झालेले नुकसानीची माहिती घेण्यात आली असून प्रशासनाने सादर केलेल्या प्राथमिक अंदाजामध्ये जवळपास 4 हजार 327 शेतकऱी बाधित झाले असून 2 हजार 762 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बीड, केज, गेवराई, आष्टी, पाटोदा यासह तालुक्यांमधील शंभरच्या वर गावांमध्ये नुकसान झाले आहे.
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू ; घरांची झाली हाणी
तसेच वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यु झाला असून अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर या अवकाळी पावसामुळे पिकांची, फळबागा, जनावरे, शाळा, घरांची हानी झाली आहे. उन्हाळी कांदा, ज्वारी, कोबी, भाजीपाला, काही ठिकाणी कपाशी, टोमॅटो, बाजरी असे रब्बी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. घरांचे पत्रे उडून गेल्याने साहित्य व अन्नधान्य भिजून नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिल्या सुचना
त्यामुळे कोणतीही निराशा बाळगू नये, शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून मदत करण्याची भूमिका असून अधिकाऱ्यांना यासाठी आदेश देण्यात आले आहेत. अडचणीतील नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्याशी चर्चा करुन आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.