अंबासाखरचे भवितव्य अडचणीत! ५कोटींचा तोटा;गाळप सुरु करण्यासाठी लागणार कोट्यवधींचा निधी


मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना म्हणून ओळखला जाणा-या अंबाजोगाई सहकारी कारखान्याचे (व्यंकटेश प्रा) भवितव्य अडचणीत आले असून यावर्षी गळीत हंगाम सुरु करण्याची तयारी चालू झाली असली तरी किती क्षहतेने हा कारखाना चालेल यावरच अंबासाखरचे पुढचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. तत्कालीन नेते आणि सहकार महर्षी कै. डी. एन. पाटील यांच्या दुरदृष्टी नेतृत्वाखाली या कारखान्याची उभारणी झाली. सलग १५ ते २० वर्षे हा कारखाना चालविण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे त्यांच्या संचालक मंडळातील काही सदस्यांनी फुटीरतेचा नारा देत आपली वेगळी चार सुरु केली आणि हा कारखाना बाबुराव आडसकर यांच्या ताब्यात गेला. सुरुवातीच्या काळात अवघी २ ते २.५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाची क्षमता असलेल्या या कारखाण्याची गाळप क्षमता वाढविण्याचे काम कारखान्याचे दुसरे चेअरमन बाबुराव आडसकर यांनी केले. यावेळी कारखान्याच्या मशनरीमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर आज पर्यंत कांहीं फार मोठे बदल या कारखान्यात झाले नाहीत. मुळ मशनरी आता कालबाह्य झाल्या आहेत. तर कारखान्याच्या डोक्यावर टाकण्यात आलेली पत्रे जीर्णशीर्ण झाली असून अर्धेअधिक छप्पर उघडुन गेले आहे. आवश्यक ती डागडुजी करीत हा गलीतगात्र झालेला कारखाना चालवण्याचे कसब विद्यमान चेअरमन रमेश आडसकर यांनी गेली अनेक वर्षे केले.
गतवर्षी गळीत हंगाम सुरू करण्यापुर्वी आर्थिक डबघाईस आलेल्या या कारखान्याचा गळीत हंगाम संचालक मंडळाने स्वतः: सुरु करावयाचा की एखाद्या खाजगी कंपनीला हा कारखाना चालवण्यासाठी भाडेतत्वावर द्दायचा यांची खलबते संचालक मंडळात झाली. कायदेशीर लाटांचा शोध घेत आणि अभ्यास करीत संचालक मंडळाने हा कारखाना व्यंकटेश्वरा प्रा. लि. या कंपनीस देण्याचा निर्णय घेतला,


गतवर्षी गळीत हंगाम सुरु करण्यापुर्वी मंत्रालयात सहकार मंत्री, राज्याचे साखर आयुक्त, अंबासाखरचे चेअरमन आणि प्रमुख पदाधिकारी आणि व्यंकटेश्वरा प्रा.लि; कंपनीतून प्रमुख पदाधिकारी यांच्या झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत अंबासाखर हा १५ वर्षासाठी प्रतिवर्षी १.५ कोटी किराणा, गाळप होणा-या प्रतिटन ऊसामागे ८२ टक्के कमिशन या सोबतच कर्मचाऱ्यांच्या पगारी, कारखान्याचे मेंटेनन्स, आणि इतर देणी ही व्यंकटेश्वरा प्रा लि; या कंपनीने द्दावीत आणि अंबासाखर बाबत चे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मात्र विद्दमान संचालक मंडळाकडेच राहील या अटींवर हा कारखाना १५ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला. या निर्णयावर सहकार मंत्री, साखर आयुक्त, अंबासाखरचे चेअरमन आणि व्यंकटेश्वराचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या असल्यामुळे हा करार दोघांनाही बंधनकारक राहणार आहे.
२०२१-२२ चार गळीत हंगाम या कराराप्रमाणे व्यंकटेश्वरा प्रा.लि; या कंपनीने केला. अर्धाधिक गळीत हंगाम संपेपर्यंत अंबासाखरच्या विद्यमान संचालक मंडळाने ही व्यंकटेश्वरा प्रा लि; कोणाची आहे याबाबतची गुप्तता पाळली मात्र याबाबतची माहिती हळुहळु बाहेर येवू लागली. गतवर्षी या कंपनीने कसेबसे २ लाख ११ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करीत कारखाना परीसरातील हजारो एकर ऊस गाळप होण्यापुर्वीच मोठ्या दिमाखदार कार्यक्रमात या गळीत हंगामाचा समारोप केला. सुमारे ५ कोटी रुपये तोट्यात असलेल्या या कंपनीने हजारो लोकांना या समारोपानंतर इष्टांन भोजन देवून तृप्त ही केले.
१५ वर्षांचा करार असलेली व्यंकटेश्वरा प्रा लि; ने यावर्षीचा गळीत हंगाम सुरु करण्याची तयारी सुरू केली आहे. कारखान्याची जुनी झालेली मशनरी, अर्धेअधिक उघडे झालेले छप्पर आणि अनेक ठिकाणी बदलावे लागणारे मशनरीचे पार्ट यांची डागडुजी करीत यावर्षी कंपनीला नाकी नवू येतील असा कयास आहे. याशिवाय गतवर्षी झालेल्या ५ कोटी रुपयांचे नुकसान कसे भरुन काढायचे असा प्रश्न कंपनीच्या व्यवस्थापनापुढे असणार आहे.
यावर्षी या कारखान्यालगत असलेला केज येथील पद्मश्री कै. विखे पाटील सहकारी साखर कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू होत आहे. हा ही कारखाना एका खाजगी कंपनीने चालवण्यासाठी घेतला आहे. मात्र या कंपनीने कारखाना सुरू करण्यापूर्वीच कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून कारखान्यात जाणा-या रस्त्यासह आतील सर्व मशनरी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी दुरुस्ती इथपर्यंतची भव्य व दिव्य दुरुस्ती करीत सर्व तयारीनिशी गळीत हंगाम सुरु करण्याची तयारी केली आहे, शिवाय याच कारखान्याच्या जोडीला थोडा पलिकडे एडश्वरी साखर कारखाना ही पुर्ण क्षमतेने गाळपासाठी सज्ज आहे.
अशा या एकुण सर्व परिस्थिती व्यंकटेश्वरा (अंबासाखर) कितपत टीकु शकेल हा प्रश्न आहे.