अंबाजोगाई शहर व परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा; मोठे नुकसान


अंबाजोगाई शहर आणि परिसरात रविवार २६ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजता झालेल्या वादळी पावसाने हाहाकार माजला आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील रस्त्यावर असलेले अनेक झाडं शेजारील विद्युत पोलवर उन्मळून पडल्याने शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून मोठे नुकसान ही झाले आहे.


मुख्य रस्त्यावर उन्मळून पडली झाडे
अंबाजोगाई शहरात झालेल्या वादळी पावसानंतर शहरातील विविध विभागांची पाणी केली असता शहरातील योगेश्वरी महाविद्यालया शेजारी असणारा एक मोठा वृक्ष रस्त्यालगत असलेल्या भेळच्या टपरीवर विद्युत खांबावर कोसळल्याने मोठे नुकसान झाले.
यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील, छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील, रमाई चौकातुन अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठं मोठी झाडे रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर उन्मळुन पडल्यामुळे विद्युत मंडळाचे मोठे नुकसान झाले आहे शिवाय काही काळ हे रस्ते ही वाहतुकीसाठी बंद पडले होते. शहरातील अनेक विभागात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सुदैवाने या सर्व घटनेत कसल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.
पूस येथे कमान पडून कार झाली चपटी


अंबाजोगाई शहराव्यतिरीक्त तालुक्यातील पुस येथे ग्रामदेवता पद्मावती प्रवेश कमान रस्त्यालगत असलेल्या एका चारचाकी गाडीवर (तेलंगणा पासिंग) कोसळल्यामुळे ही कार चपटी होवून बसली आहे. पुस येथील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी चे शेड ही या वादळीवाऱ्यात उडून गेले आहे. शिवाय येथेही मोठी झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
घाटनांदुर येथे विद्युत मंडळाचे मोठे नुकसान


तालुक्यातील घाटनांदुर येथील विद्युत बिल्डरच्या मेंटेनन्स चे काम चालू असतांनाच हा वादळी वारा आणि जोरदार पाऊस सुरू झाला या वादळात फिडरमधील दोन पोल उन्मळून पडले आहेत. पावसाच्या पाण्याने त्याठिकाणी लगोलग खड्डा घेऊन पोल उभे करणे शक्य नसल्याने या फिडरवरील सर्व यंत्रणांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
मदत कार्यास नंदकिशोर मुंदडा आले धावून!


अंबाजोगाई शहरात वादळी वारा आणि पावसाने विस्कळीत केलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नंदकिशोर मुंदडा हे सर्वप्रथम शहरातील रस्त्यांवर येवून मदत कार्यास गती देण्याचा प्रयत्न केला. नंदकिशोर मुंदडा यांनी महसूल, नगर परिषद आणि महावितरण ची यंत्रणा हाताशी धरून रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडांची कटींग करुन रस्ते रहदारी साठी मोकळे करून दिले. व अनेक विभागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.