महाराष्ट्र

अंबाजोगाई येथील ४०० वर्षांपुर्वीच्या बालाजी मंदिराचा काय आहे इतिहास?

प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी संपुर्ण जगाचं श्रध्दास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानच्या दसरा महोत्सवात अंबाजोगाई येथील बालाजी मंदिराचे पुजारी मोहन जहागीरदार व त्यांच्या कुटुंबीयांना दसरा महोत्सवातील एका महत्त्वाच्या पुजेचा सन्मान मिळाला. या संबंधीच्या बातम्यांना प्रसिध्दी मिळाली आणि अंबाजोगाई येथील पुरातन आणि धार्मिक संदर्भ असलेले बालाजी मंदिर अचानक चर्चेत आले.या निमित्ताने चारशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अंबाजोगाई येथील बालाजी मंदिराची विस्तृत माहिती “माध्यम” न्यूज नेटवर्क च्या वाचकांसाठी येथे मुद्दाम देण्याचा प्रयत्न केला आहे.

संपादक.

अंबाजोगाई शहरातील जुन्या विभागातील रविवार पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात एका विस्तीर्ण आणि भल्या मोठ्या वाड्यात हे बालाजी मंदिर आहे. सुमारे ४०० वर्षापुर्वीची ही दिमाखदार वास्तु आज जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शरीरावर वार्धक्याच्या खुणा घेत ऊन, वारा, पाऊस आणि मानवी अतिक्रमणांचा मारा सहन करीत उभी आहे. खरं तर या वाड्याची ओळख “बालाजी वाडा” अशीच आहे.
अतिशय अवाढव्य असलेल्या या वाड्यात सर्व सोयी उपलब्ध होत्या. या वाड्याच्या अग्रभागी जवळपास ४ हजार स्क्वेअर फुट जागेत प्रशस्त बालाजी मंदिर आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे उत्तर दिशेला असून या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ढाळज आहेत. या ढाळजात बालाजींच्या दर्शनासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांना बसण्याची सोय उपलब्ध होती. या ढाळजच्या वरच्या मजल्यावर एक मोठी चिरेबंदी खोली होती. या खोलीमध्ये मंदिर परिसरात आयोजित करण्यात येणा-या दसरा महोत्सवात व इतर कार्यक्रमावेळी भोजन तयार करण्यासाठी वापरली जाणारी मोठी भांडी ठेवण्यासाठी या खोलीचा वापर केला जायचा. आणि या चिरेबंदी खोलीवर नगारखाना असायचा. पुर्वी या मंदिराला नगारखान्याचा मोठा मान होता.


या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातुन आत गेलो की, उजव्या भागास मुख्य मंदिराचा भाग आहे. या मंदिराच्या तिन्ही बाजूंनी इंग्रजी C आकाराच्या नवू खणांच्या (अंदाजे १०×१८०फुट) आकाराच्या ओस-या होत्य. हे संपुर्ण माळवद सागवानी लाकडाचे असून यांच्या खाली सात फुटी ऊंचीच्या जमिनीच्या वर लादण्या आहेत. १८० फुट परीसरात या लादण्या आहेत व या लादण्या आतील बाजूंनी एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत.
या मंदिराच्या समोरच ४०×४० आकाराचा एक दिमाखदार सभामंडप होता. सागवानाच्या खांबावर रेखीव, नक्षीदार कोरीव काम केलेल्या या खांबावर पत्रे असणारा असा हा सुंदर सभामंडप होता. ४० वर्षापुर्वी वादळीवारा आणि पावसात हा सभामंडप उध्दवस्त झाला.


मंदिराच्या आजूबाजूला या मंदिराचे पुजारी आणि विश्वस्त यांना राहण्यासाठी पाच-सहा वाडे बांधण्यात आली होती. आता या वाड्यांच्या वंशपरंपरागत वाटण्या झाल्या असल्यामुळे मुळ वाड्यांचे चित्र पार बदलून गेले आहे.


“बालाजी वाडा” म्हणून ओळखला जाणाऱ्या वाड्यास एकच मुख्य प्रवेशद्वार होते. आणि या प्रवेशव्दारा स चहुबाजूंनी ४ फुट रूंद आणि ६ फुट ऊंचीची संरक्षण भिंत होती. या वाड्यात राहणाऱ्या लोकांच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र आड आहे. साधारणपणे ७० फुट खोलीच्या आडात बारामाही पाणी असतं. शिवाय मंदिराच्या मागच्या बाजूस ७०×९०×४० अशा आकाराचे आकर्षक असे बारव होतं. हे बार्ब “सरस्वती तीर्थ” म्हणून ओळखल्या जायचे. मुख्य बालाजी मंदिरातील गाभाऱ्यातुन पुजा-यास पुजेसाठी सोवळ्यात पाणी आणतात यावे यासाठी या तीर्थाला जोडणारा एक स्वतंत्र मार्ग या ठिकाणी उपलब्ध होता. चिरेबंदी, घडीव व कोरीव काम असलेले हे “सरस्वती तीर्थ” आता काळाच्या ओघात या परिसरातील कचराकुंडी बनली आहे.
सुमारे चारशे वर्षांपूर्वी अतिशय रेखीव, दणकट, सर्व सुविधांनी युक्त, वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे बांधकाम असलेली ही वास्तु आज अखेरच्या घटका मोजत उभी आहे. पुर्वापार पध्दतीने या मंदिरात आज ही नित्य पुजा विधी, दसरा महोत्सव साजरा होत असतो. पण या सर्व गोष्टींचा गाजावाजा होत नाही.


चारशे वर्षापुर्वी प्रत्यक्षात बालाजी, पद्मावती आणि लक्ष्मी यांनी या वास्तुत येवून काशीबाई या भक्ताला दर्शन दिले. तिच्या हातचे जेवण घेतलं. असा मोठा संदर्भ असलेली ही वास्तु तिचे मोठेपण न जपल्यामुळे आज जीर्ण अवस्थेत उभी आहे.


अंबाजोगाई शहरातील चारशे वर्षांपुर्वीचे बालाजी मंदिर हे खरं तर शहराचा वैभव व्हायला हवं होतं. पण पुर्वीपासूनच फारसे चर्चेत नसलेले हे मंदीर या दशकातील शेवटच्या पिढीला केवळ ऐकीवदृष्ट्याच माहीत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पिढीला एवढा मोठा ऐतिहासिक संदर्भ असलेले बालाजी मंदिर या शहरात आहे हे जवळपास माहित ही नसावे अशी स्थिती आहे. हजारो मैल दुर असलेल्या, आपल्या दृष्टीपथास कधीही न पडलेल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी आपण मनाच्या अंतःकरणातुन हातभार लावतो, मात्र चारशे वर्षांपुर्वीचे संदर्भ असलेल्या बालाजी मंदिरासाठी आपण काहीही करू शकत नाही ही या परिसरातील नागरिकांची शोकांतिका आहे.

काय आहे मंदीराचा इतिहास?

साधारणपणे तीनशे वर्षापूर्वी औंढा नागनाथ येथील काशीबाई रामचंद्र गोसावी या जहागीरदार घराण्याच्या ज्ञात असलेल्या आद्य स्त्री. या खूप श्रीमंत व धनिक घरातील होत्या. या काशीबाई बालाजी भक्त होत्या व दरवर्षी बालाजी वारीसाठी जायच्या परंतु प्रवासाची साधने जास्त नसल्याने जाण्यायेण्यात जवळपास तीन महिने जायचे .वयपरत्वे त्यांना ह्या वारीचा त्रास होऊ लागला व त्यांना लक्षात आले की, यानंतर आपण वारी करू शकणार नाही म्हणून त्यांनी श्री बालाजींची अशी प्रार्थना केली की यानंतर सुद्धा मला तुझे नेहमी दर्शन व्हावे असे काही तरी व्यवस्था कर. देवाने त्यांना दर्शन देऊन सांगितले की यानंतर तू मला जिथे बोलशील त्या ठिकाणी मी येऊन तुला दृष्टांत देईन. तेथून परत येताना त्या अंबाजोगाई येथे त्यांची बहिण धोंडाबाई राहात असत तेथे राहील्या असताना काही दिवसात त्यांची तब्येत ढासळू लागली व यावेळेस त्यांनी देवाचा धावा केला व सांगितले की हेच माझं घर समजून तू इथे ये जेवायला ये, दर्शन दे ,पण एकटा नको तर पद्मावती व लक्ष्मीला पण घेऊन ये त्याप्रमाणे देव तेथे प्रकट झाले व त्यांनी काशीबाईच्या हातचे जेवण करून तिला आशीर्वाद दिले व असे सांगितले की तू मला बोलावलं आता हेच थांब माझे कायमचे ठिकाण राहिल.सांगण्यासारखे म्हणजे या मंदिरातील मुर्ती ही पद्मावती व लक्ष्मीसोबत आहे.


त्यानंतर काशीबाईने अंबाजोगाईला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला ,औंढ्याची मालमत्ता विकून आपल्या दोन मुलांना बोलवुन घेतले व येथेच स्थायिक झाले आणि बालाजी ची सेवा करु लागली. काशीबाई व धोंडाबाई यांनी मिळुन हे मंदिर बांधले आहे.त्यांनी त्याच वेळेस कांहीं मिळकत तयार केली व त्यातुन मंदिराचा दैनंदिन खर्चासाठी सुरू ठेवला. पुढे काही नैसर्गिक आपत्तीचे वेळी ,दुष्काळाचे वेळी जनतेसाठी काही भरीव कार्य केल्यामुळे निझामाकडुन काशीबाई यांना जहागिरदारी मिळाली परंतु त्यांनी ती मंदिराच्या नावावर घेतली ,परंतु पिढ्यानपिढ्या वंशावळीतील वाटण्या सरकारी कायदे वगैरे कारणांमुळे आता फार कमी मिळकत राहिली आहे.


अंबाजोगाईत रेणुकामाता मंदिराकडे जाताना एका ठिकाणी या काशिबाईंची समाधी आहे. त्या सभोवतालची एक ते दिड एकर जागा ही जहागिरदार घराण्याच्या मालकीची असुन ती त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरली जाते. आजही जहागीरदार घरातील शुभकार्याप्रसंगी या समाधीची पुजा अभिषेक करुन इतर कामाला सुरुवात करतात.

(संदर्भ: दिपक गद्रे, बदलापूर, : सुधीर जहागीरदार)


छायाचित्र: रत्नाकर निकम, अंबाजोगाई.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker