अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; वकील संघाने काढली रॅली!


माजी आयुक्त दिलीप बंग आणि उमाकांत दांगट यांनी केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करा


अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा या मागणी साठी अंबाजोगाई वकील संघाने पुढाकार घेतला असून संघाच्या वतीने या मागणीसाठी शहरातील मुख्य रस्त्यावरुन एक रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात माजी महसुल आयुक्त दिलीप बंग आणि उमाकांत दांगट यांच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
येथील वकील संघातर्फे आज दि.१२/०७/२०२३ रोजी अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा या मागणी साठी अंबाजोगाई वकील तर्फे शहरातून रॅली काढण्यात आली. अंबाजोगाई येथील जिल्हा न्यायालयातील वकील संघापासून गुरुवार पेठ,मंडी बाजार,पाटील चौक,मंगळवार पेठ,बस स्टँड, छ.शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय अशी अंबाजोगाई जिल्हा तात्काळ जाहीर करावा म्हणून रॅली काढण्यात आली. सदरील रॅलीत अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा, अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे अशा वकिलांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.


गेल्या ३० ते ४० वर्षांपासून अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे म्हणून जनतेची मागणी आहे, तसेच जिल्हा निर्मितीच्या मागणी साठी अंबाजोगाई वकील संघ नेहमीच अग्रेसर राहिला असून अनेक वकिलांनी कारावास भोगलेला आहे. तसेच अंबाजोगाई जिल्हा होणे कसा योग्य आहे,ते मा.दिलीप बंग व मा.उमाकांत दांगट यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार मा.मुख्यमंत्री यांनी अंबाजोगाई जिल्हा तात्काळ जाहीर करावा असे निवेदन उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे मार्फत देण्यात आले.
यावेळी रॅली मध्ये वकील संघाचे अध्यक्ष अँड.अशोक कवडे,उपाध्यक्ष अँड.शिवाजी केंद्रे,सचिव अँड.मनजीत सुगरे, सहसचिवअँड.विकास भुरे, ग्रंथपाल अँड.बळीराम पुरी, जेष्ठ विधिज्ञ व कनिष्ठ वकील २०० पेक्षा जास्त रॅलीत सहभागी होते.