महाराष्ट्र

अंबाजोगाईकरांनी लुटला अश्व रिंगण सोहळ्याचा आनंद; भाविकांची गर्दी

वारकऱ्यांचे विविध मैदानी खेळ पाहून उपस्थित प्रेक्षक भारावले

अंबाजोगाई शहरात गुरुवारी सायंकाळी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानवर चार पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला.अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकऱ्यांचे विविध मैदानी खेळ, महिलांच्या फुगड्या, बाल वारकऱ्यांची झालेली दिंंडी स्पर्धा. हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.

आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंडया व पालख्या अंबाजोगाई मार्गे जातात. या दिंडीतील वारकरी मागील दहा वर्षांपासून अंबाजोागाई येथे अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन करतात. गुरूवारी हिंगोली जिल्ह्यातील नरसीचे संत नामदेव यांची पालखी, अंबाजोगाईतील महसूल विभागाची पालखी,

संत मोहनानंद महाराज यांची पालखी, तर चारोधाम हनुमान पायी पालखी यांची पालखी शहरात दाखल झाली. या दिंडयांना टाळ-मृंदगासह विठ्ठलनामाच्या गजरात योगेश्वरी मैदान येथे बँड पथक व फटाक्यांच्या आतिषबाजीत आणण्यात आले. यावेळी संयोजन समितीच्या वतीने ध्वजारोहण, पालखी पूजन व अश्वपूजा करण्यात आली. यानंतर मनोहरी रिंगण सोहळा पार पडला.

या सोहळ्यात देखणा व सजविलेला अश्व, भगवी पताका हाती घेतलेले वारकरी लक्ष ठेवून घेत होते. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालविलेल्या देखाव्याची भाविकांनी प्रशंसा केली. वारकऱ्यांच्या कुस्त्या, महिलांच्या फुगड्या व मैदानी खेळात भाविक तल्लीन झाले होते. यावेळी रिंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, तहसीलदार विलास तरंगे, प्रकाश बोरगावकर, दिलीप सांगळे, दिलीप गित्ते, बळीराम चोपणे, सारंग पुजारी, संजय गंभीरे, वैजनाथ देशमुख, अनंत आरसुडे,अ‍ॅड. संतोष लोमटे, महादू मस्के, व मान्यवरांंची उपस्थिती होती.

अश्व रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. हा रिंगण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीनेही चोख नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे भविकांना आनंदाने यात सहभागी होता आले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पालखी प्रमुखांचा झाला सन्मान संयोजन समितीने केला.

दिंड्या एकत्रीकरणासाठी प्रयत्नशील: मुंदडा

विदर्भ, मराठवाडा व परिसरातून अंबाजोगाईमार्गे जवळपास २७४ दिंडया पंढरपूरकरडे जातात. छोट्या -मोठ्या दिंडयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आगामी काळात या छोट्या दिंडयांना एकत्रित करून या सर्व दिंडया नरसी नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या दिंडयासोंबत एकत्रित कशा जातील? यासाठी आपण अश्वरिंगण सोहळ्याचा स्वागताध्यक्ष म्हणून प्रयत्न करणार असल्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा म्हणाले.

वारकरी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन:

आज झालेल्या पालखी रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी लहान गट व मोठ्या गटात बाल वारकरी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले होेते. या स्पर्धेत अंबोजगाईच्या विविध बालकलावंतांनी आपला सहभाग नोंदवून आपला कलाविष्कार सादर केला. विविध दिंडया व गितांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, पर्यावरणाचे संवर्धन, प्लॉस्टिक मुक्ती, असे विविध संदेश या विद्यार्थ्यांनी दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker