शेतकऱ्यांनो धीर धरा; जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाढु शकतात कापसाचे भाव!
देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापूस दरात (Cotton Rate ) मोठी घट झाली आहे. बाजार समित्यांमधील दरही क्विंटलमागे ५०० रुपयाने कमी झाले आहेत. तर वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. कापूस दरावर पुढील काही दिवस दबाव राहू शकतो. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील (Cotton Market) जाणकारांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात सध्या कापसाचे दर घसरले आहेत. सोमवारी वायदे जवळपास १७०० रुपयांनी कमी होऊन २७ हजार ३०० रुपयांवर बंद झाले होते. मात्र आज दुपारी दोन वाजेपर्यंत वायद्यांमध्ये २०० रुपयांची सुधारणा झाली होती. कापसाचे वायदे २७ हजार ३०० रुपयांवर पोचले होते.
वायद्यांमध्ये कापूस दर कमी झाल्यानंतर बाजार समित्यांमध्येही दरात नरमाई पाहायला मिळाली. सोमवारी कापूस दरात क्विंटलमागे सरासरी ५०० रुपये घट झाली होती. मात्र आज कापूस दर स्थिरावले होते. तर काही बाजारांमध्ये कापूस दरात वाढ पाहायला मिळाली. आज देशातील बाजारांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी ७ हजार ६०० ते ८ हजार ३०० रुपये होती.
वायदे का तुटले
वायद्यांमध्ये हेजिंग केले जाते. एका महिन्यातील वायद्यांची मुदत संपली की हेजर्स, गुंतवणूकदार किंवा खरेदीदार पुढील महिन्यातील वायद्यांमध्ये पोजिशन घेतात, म्हणजेच वायदे करतात. पण सेबीने एमसीएक्सवर जानेवारी २०२३ आणि त्यापुढील महिन्यांचे वायदे आणण्यास अद्याप परवानगी दिली नाही. म्हणजेच वायदे रोल ओव्हर अर्थात पुढील महिन्यातील वायद्यांमध्ये पोजिशन घेता आली नाही. त्यातच डिसेंबरचे वायदे ३० डिसेंबरला संपतात. त्यामुळे दीर्घकालीन करार वायद्यांमधून बाहेर पडले. म्हणजेच ज्यांना पुढील महिन्यात आपले करार न्यायचे होते त्यांना वायद्यांमधून बाहेर पडावे लागले. त्यामुळे विक्री वाढून दर कमी झाले. पण वायदे संपेपर्यंत कमी झालेले दर पुन्हा वाढू शकतात. म्हणजेच दर पूर्वपातळीवर येऊ शकतात, अशी माहिती वायदे बाजारातील अभ्यासकांनी दि
बाजार समितीतील दर का कमी झाले?
वायद्यांमध्ये दर कमी झाल्याचा कांगावा करत व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदीतील दरही कमी केले. वास्तविक पाहता पोजिशन्स रोल ओव्हर अर्थात पुढील वायद्यांमध्ये नेता न आल्याने वायद्यांमध्ये दर तुटले. हा मुद्दा हेजिंगशी निगडित आहे. त्यात मागणी आणि पुरवठ्याचा संबंध नाही. मात्र प्रत्यक्ष खरेदीत जाणून बुजून दर कमी केले गेले. वायद्यांमध्ये दर कमी झाले, आता कापूस दरात वाढ होणार नाही, असा संभ्रम सध्या निर्माण केला जात आहे. वायद्यांचा दाखला देत बाजार समित्यांमध्येही दर पाडले. मात्र आज वायद्यांमध्ये दर वाढल्यानंतर बाजार समित्यांमधील दर त्याप्रमाणात वाढवले नाहीत.