महाराष्ट्र
वेलकम बॅक डियर…!
आ. धनंजय मुंडे यांचा उल्लेख राजकीय विश्लेषक काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील चमकता धृव तारा असा करीत आहेत. मागील काही महिन्यांचा कालावधी सोडला तर आ. धनंजय मुंडे यांची वाटचाल ही चमकत्या धृव ता-या सारखीच होती!
काही महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री या प्रमुख खात्यासह इतर काही विभागाचा मंत्री म्हणून त्यांचा शपथविधी ही झाला.
नव्या मंत्रिमंडळात दमदार मंत्री म्हणून काम करीत असताना बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटू लागले. आ. धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांचे नांव या प्रकरणातील पोलीस तपासात समोर आले. वाल्मिक कराड यांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आणि आ. धनंजय मुंडे हे लक्ष्य बनले!
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी म्हणून आ. धनंजय मुंडे यांचे नाव घेण्यात यावे, त्यांना अटक करण्यात यावी, मंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसह अनेक आरोपांना आ. धनंजय मुंडे यांना सामोरे जावे लागले. हे सर्व सुरु असताना नैतिक जबाबदारी स्विकारत ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा ही दिला.
हे सर्व प्रकरण चालू असताना आ. धनंजय मुंडे यांना राजकीय, मानसिक आघातासह शारीरिक आघात ही सहन करावे लागले. दृष्टी दोष असल्यामुळे दोन्ही डोळ्यांवर त्यांनी शस्त्रक्रिया करून घेण्याचे सांगण्यात आले तर चेहरा किंचित सा वक्र होणे व बोलण्यास त्रास होणारा “बेल्स पाल्सी” हा नवा आजार त्यांना झाला. या आजारावर अत्याधुनिक उपचार घेण्यासाठी त्यांना मधल्या काळात सतत परदेशी वा-या ही कराव्या लागल्या. शारीरिक, मानसिक आणि राजकीय दृष्ट्या विकलांग होण्याची वेळ या कालावधीत आ. धनंजय मुंडे यांच्या वर आली.
परिस्थितीवर जो मात करु शकणार नाही तो “धनंजय” कसला? या सर्व परिस्थितीत काही काळ मौन आणि अज्ञातवासात राहुन आपल्या प्रकृतीला प्राधान्य देण्याचा निर्णय आ. धनंजय मुंडे यांनी घेतला आणि यात ते बरेच यशस्वी झाले आहे.
संघर्ष हा तसा आ. धनंजय मुंडे यांना नवीन नाही. मुळात देशातील अराजकता संपवण्यासाठी १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जी आणिबाणी लावली त्याच आणिबाणीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांचा (१५ जुलै १९७५) जन्म झालेला आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे जणू बाळकडूच आ. धनंजय मुंडे यांना मिळालेले आहे.
जन्मापासून सुरु झालेला कौटुंबिक, शारीरिक, मानसिक आणि राजकीय संघर्ष आज ही मोठ्या प्रमाणावर सुरुच आहे. या सर्व संघर्षावर मात मिळवण्यासाठी आ. धनंजय मुंडे यांनी विपश्यना सारखे माध्यम निवडले आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून गेली अनेक महिन्यांपासून रीक्त असलेल्या मंत्री पदी आ. छगन भुजबळ यांचा शपथविधी झाला. त्याच दिवशी रात्री आ. धनंजय मुंडे यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. या तिघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. ही चर्चा आ. धनंजय मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी असल्याचे भाकीत राजकीय विश्लेषकांनी केले आहे.
ही चर्चा संपली आणि दुसरे दिवशी सकाळी आ. धनंजय मुंडे हे नाशिक येथील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात दाखल झाले. विपश्यना केंद्रात असे ऐनवेळी जाता येत नाही. त्यासाठी काही दिवस अगोदर नांव नोंदणी करावी लागते. विपश्यना कालावधी हा दहा दिवसांचा असल्यामुळे सोबत काय सामान घ्यायचे, विपश्यना कालावधीत कोणते नियम पाळावयाचे, कोणते अन्न खायचे हे सर्व ठरवावे लागते. हे सर्व ठरवण्यासाठी छगन भुजबळ यांच्या मंत्री पदाच्या शपथविधी ची तारीख ही अगोदरच माहिती करुन घ्यावी लागते आणि मग शपथविधी नंतर लगेचच दुसऱ्या दिवशीची विपश्यनेची तारीख निश्चित करावी लागते. हा केवळ योगायोग नाही तर प्रगल्भ राजकारणी आणि वैचारिक बैठक पक्की असलेली माणसच हे अशा नियोजनबध्द पध्दतीने काम करु शकत असल्याचा पुरावा आहे.
मुळात विपश्यना हे गौतम बुद्धांच्या मुळ शिकवणीतून आलेले सजगता ध्यानाचे एक रुप आहे. विपश्यना मुळे विश्रांती, सजगता आणि आंतरीक शांतीची चांगली भावना मनुष्यात निर्माण होते. विपश्यना मुळे तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला निर्विवादपणे लक्ष केंद्रित करून आत्म निरीक्षणाचा सराव करता येतो. एवढेच नव्हे तर विपश्यना मुळे अंतर्दृष्टी चा मार्ग ही सापडू शकतो. विपश्यना ची साधना ही दहा दिवसांच्या कालावधीत करतात. आणि विपश्यना केलेली अनेकजण बौध्दिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खुप सजग असतात असे दिसते.
“टाइम इज सोल्यूशन” हे एक प्रसिद्ध वाक्य इंग्रजी मध्ये आहे. प्रत्येक परिस्थिती सुरळीत होण्यासाठी ठराविक वेळ हा द्यावाच लागतो. ठराविक वेळ गेला की परिस्थिती पुन्हा पूर्ववत होण्यास मदत करते. असेच काहीसे आ. धनंजय मुंडे यांच्या बाबतीत होईल असे वाटते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील हा चमकता धृव तारा अचानक नाहीसा होतो की काय अशी शंका काही जण व्यक्त करीत असतांनाच विपश्यना सारख्या साधनेचा अनुभव घेवून पुन्हा एकदा सर्व ताकदीनिशी चकाकून निघून आ. धनंजय मुंडे हे २ जून पासून नव्या आत्मविश्वासाने जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज होणार आहेत हे निश्चितच आनंददायी आहे.
वेल कम बॅक डियर…!
🙏