मांजरा धरणाच्या प्रलंबित कामासाठी केंद्रशासनाचा २९ कोटींचा निधी


धरणाच्या मातीच्या भिंतीची ऊंची वाढवण्यासह होणार अनेक प्रलंबित कामे
देशातील जुन्या आणि मोठ्या धरणांच्या दुरुस्तीचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. या अंतर्गत मांजरा प्रकल्पाच्या दरवाजे दुरुस्ती व धरणाच्या माती कामातील भिंतीची उंची वाढवणे याकामासाठी केंद्रशासनाने २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीला सध्या फक्त प्रशासकीय मान्यता मिळाली असून आचार संहिता संपताच टेंडर प्रोसेस नंतर रितसर या कामाला सुरुवात होईल अशी माहिती मांजरा चे शाखा अभियंता सुरज निकम यांनी दिली आहे.


या संदर्भात अधिक विस्ताराने बोलतांना शाखा अभियंता सुरज निकम पुढे म्हणाले की, बीड, लातूर, धाराशिव या तिन्ही जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. धरणात केवळ २८ दलघमी इतका पाणी साठा होता. परिणामी मे महिन्यात धरणातील जिवंत पाणीसाठा संपला असून पाणी शुन्य पातळी खाली गेले आहे. यामुळे धरणाचे दरवाजे व इतर दुरुस्तीची कामे करणे सुलभ झाले आहे.
केंद्र शासनाच्या ड्रीप टू मधील कामातुन मिळाला निधी; प्रशासकीय मान्यता ही मिळाली


केंद्र सरकारने देशातील ४० वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधी झालेल्या मोठ्या धरणांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. यात ड्रीप वन अंतर्गत केरळ व अन्य राज्यातील धरणांची दुरुस्ती झाल्यानंतर आता दुसर-या टप्यातील ड्रिप टू अंतर्गत महाराष्ट्रातील काही धरणांची दुरुस्ती व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
यामध्ये धरणांमध्ये मांजरा धरणाचा समावेश असून यासाठी २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धरणाच्या दरवाज्यांची साफसफाई, कलर काम, रबरसील बसवणे, मोटार दुरुस्ती, उजव्या व डाव्या अशा दोन्ही कालव्याच्या गेटची दुरुस्ती ही कामे करण्यात येणार आहेत.
पावसाळ्यानंतर सुरु होतील कामे


या निधीसाठी सध्याफक्त प्रशासकीय मान्यताच मिळाली असून लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेली अचार संहिता संपल्यानंतर या कामाच्या स्वतंत्र निविदा काढण्यात येतील. ही सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर मग या निधी अंतर्गत विविध दुरुस्त्या चे काम सुरू करण्यात येईल. साधारणपणे ही सर्व प्रक्रिया पावसाळ्यात पुर्ण होईल आणि पावसाळ्यानंतर ही सर्व कामे सुरु होतील असा अंदाज आहे.
स्काडा प्रणाली ने होणार धरणाच्या लोखंडी दरवाजांची दुरुस्ती
ही सर्व कामे पुर्ण झाल्यानंतर धरणाचे दरवाजे यांत्रिक पद्धतीने
उचलणा-या स्काडा प्रणालीचे काम सुरु करण्यात येणार आहे. यापुर्वी २००२ मध्ये हे काम करण्यात आले होते. आता जवळपास २२ वर्षांनंतर या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे व प्रशासकीय मान्यता ही मिळाली आहे. या कामासोबतच धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यापूर्वी समोरच्या भागातील गावांना सूचना देण्यासाठी अलार्म सिस्टम व धरण परिसराचे सुशोभीकरण अंतर्गत संपुर्ण धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्दुतीकरणाचे कामही करण्यात येणार आहे.
यांत्रिकी विभागातील ही सर्व कामे संपल्यानंतर स्थापत्य विभागातील कामांतर्गत धरणाच्या मातीच्या भितीची उंची अर्धा मीटर पर्यंत वाढविण्याच्या महत्वपूर्ण कामास सुरुवात होणार आहे.
धरणाच्या मातीच्या भिंतीची ऊंची वाढवणे होते आवश्यक; संरक्षण भिंतीचे ही होणार काम


धरणाच्या दरवाज्यांची ऊंची यापूर्वीच अर्धा मीटरने वाढविण्यात आल्याने धरणाच्या मातीच्या भिंतीची ऊंची वाढवणे आवश्यक आहे. सदरील उंची वाढवली नाही आणि धरण पुर्ण क्षमतेने भरले तर जुन्या धरणाच्या भिंती कधीही धोका देवू शकतात म्हणून हे काम तातडीने करणे गरजेचे असते. त्यामुळे धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जलदगतीने करता येणार आहे.
धरण-क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने धरणाच्या समोरील बाजूने संरक्षक भिंतीचे कामही या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच सुसज्य असे कार्यालय उभारण्यात येणार आहे. यावर्षी मांजरा धरण क्षेत्रातील पाणीपातळी कमी असल्याकारणाने प्रस्ताविक कामे तातडीने करता येणार आहेत.
धरणाचा होणार संपुर्ण कायापालट!
धरणाची निर्मिती होऊन ४० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने सबंधित कामे करणे गरजेचे होते. दरम्यान केंद्र शासनाच्या या योजनेतील दुसऱ्या फेज मधील टप्प्यात का होईना मांजरा धरणाच्या विविध प्रलंबित कामासाठी हा निधी मिळाला असल्याने प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाचे पुर्ण होणार असून धरणाचा पुर्ण कायापालट होणार आहे.
-सूरज निकम,
शाखाधिकारी, मांजरा प्रकल्प