मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा आणि स्वामी रामानंद तीर्थ!


मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हटलं की प्रामुख्याने नाव येतं ते स्वामी रामानंद तीर्थ यांचं. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तरी एक मोठा भूभाग असलेला प्रदेश पराधीनच होता. त्या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागला आणि त्या लढ्याचे नेतृत्व स्वामीजींनी केले. स्वातंत्र्यानंतरही ते मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते झटले आणि आपले सर्व आयुष्य त्यांनी त्यासाठीच वेचले.
15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी संपूर्ण भारतातील लोक तिरंगा हातात घेऊन आपला आनंद साजरा करत होते पण हैदराबाद संस्थानात मात्र भारताचा ध्वज हाती घेणाऱ्यांना बेड्या ठोकल्या जात होत्या. स्वामी रामानंदांना देखील भारताच्या स्वातंत्र्यदिनी अटक झाली होती.
‘भारताचा नियतीशी करार झाला आहे आणि त्यानुसार आपण आपलं भाग्य लिहिणार आहोत’ असं नेहरूंनी 15 ऑगस्ट 1947 ला रात्री बारा वाजता जाहीर केलं होतं. पण भारताचा अंदाजे सव्वा दोन लाख स्क्वेअर किमी भाग अद्याप पारतंत्र्यातच होता. इतकंच नाही तर इंग्रजांनाही लाजवेल अशा जुलमाखाली होता. त्या जुलमा विरोधात एक संन्याशी आपले दंड थोपटून उभा होता. ज्या दिवशी त्यांना अटक झाली त्यावेळेपर्यंत ते हैदराबाद संस्थानच्या जनतेचे सर्वांत लोकप्रिय नेते झाले होते पण तिथपर्यंत येण्यासाठी आणि नंतरही त्यांना अनेक अडचणींचे डोंगर पार करावे लागले होते. या संन्यासाच नाव होतं स्वामी रामानंद तीर्थ!


3 ऑक्टोबर 1903 ला विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे भवानराव खेडगीकर यांच्या घरात व्यंकटेशचा म्हणजेच स्वामीजींचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधारण पण त्यांना शिक्षणाची आवड होती. स्वामीजींच्या वडिलांनी भवानराव खेडगीकर यांनी संन्यास स्वीकारला होता. पण त्यांच्या गुरूने आज्ञा केली की परत संसार कर. म्हणून ते परत संसारास लागले, मात्र हा स्वामीजींनी लहानपणापासूनच संन्यासाचं आकर्षण होतं. मला ही विरक्ती वडिलांकडूनच आली असं ते सतत म्हणत. गावात एखादा संन्यासी आला की त्याच्याकडे ते पाहत असत. एकदा तर त्यांनी संन्याशालाच विचारलं की मला संन्यास द्या. ज्या वयात खेळायचं बागडायचं त्या वयात या मुलाला संन्यास का घ्यावा वाटतो असं त्यांच्या मनात आलं असणार.
प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते सोलापूरला आले. एका हॉस्टेलमध्ये राहून वाढप्याचं काम करून त्यांनी आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन पेटलं होतं. लोकमान्य टिळकांचं त्यांना खूप आकर्षण वाटे. एकदा लोकमान्य टिळक सोलापुरात येणार होते. शिक्षकांनी बजावून ठेवलं की कुणीही त्यांना बघायला जायचं नाही. त्यांना बघायला गेलं की शिक्षा होईल.
शिक्षकांचा हा आदेश झुगारून ते टिळकांना पाहायला गेले. अर्थात त्यांना शिक्षा झाली पण त्याचा त्यांना पश्चाताप नाही झाली. पुढे गांधीजी सोलापुरात येणार होते. त्यांना पाहण्यासाठी स्वामीजी गेले. गांधीजींना पाहून ते भारावले. गांधीजी उभे होते. त्यांनी त्यांचे पाय धरले. गांधीजींनी आशीर्वाद दिला आणि देशासाठी काही करा असं ते म्हणाले. ही घटना माझ्या हृदयावर कोरून ठेवल्या गेली आहे असं स्वामीजी सतत म्हणत.
पुढे अंमळनेरला पदवीच्या आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. महाविद्यालयीन काळातच त्यांनी स्वामी विवेकानंदांबद्दल तसेच अध्यात्मिक नेत्यांबद्दल भरपूर वाचन केले होते. समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचण्याचा निर्णय त्यांनी याच काळात घेतला. तशी संधी त्यांना मिळाली देखील. ना. म. जोशी हे कामगारांचे ख्यातनाम नेते होते. त्यांना एका खासगी सचिवाची आवश्यकता होती. पण त्यांनी पाहिजेत अशी जाहिरात न देता एक अट ठेवली होती. इच्छुक उमेदवाराने आपला प्रबंध पाठवावा. स्वामीजींचा प्रबंध त्यांना पसंत पडला. स्वामीजी त्यांच्याकडे गेले आणि कामगारांचे प्रश्न सोडवू लागले.
सर्व काही सुरळीत असताना त्यांना पक्षाघात झाला. त्यामुळे त्यांचा एक पाय अधू झाला. जोशी यांच्यासोबत काम करायचं म्हणजे दगदग तर होणारच होती. पुर्ण राज्यभर ते दौरे करत असत. स्वामीजींनी ही गोष्ट बोलून दाखवली. ते म्हणाले तुम्ही एका जागी बसून काम करा. सोलापूर गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवा. त्याप्रमाणे ते सोलापूरला आले.
तुळजापूर तालुक्यात हिप्परगा येथे अनंतराव कुलकर्णी यांनी एक शाळा काढली होती. पुढे ही शाळा मराठवाडा मुक्तिलढ्याचं एक केंद्र बनली. कुलकर्णी यांना स्वामीजी यांच्या विषयी समजलं. ते स्वामीजीकडे गेले आणि त्यांना म्हणाले आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व्हा. मुलांवर संस्कार करण्यासाठी तुमची गरज आहे.
स्वामीजी त्यांच्यासोबत हिप्परग्याला गेले. कुलकर्णी स्वामीजींच्या नावाने दरमहा 50 रुपये बॅंकेत टाकत पण स्वामीजींनी त्या पैशांना कधीच हात लावला नाही. त्यांची विरक्त वृत्ती दिवसेंदिवस वाढत होती. शेवटी त्यांनी रीतसर संन्यास घेतला आणि व्यंकटेश खेडगीकरचे ते स्वामी रामानंद तीर्थ बनले.


निजामाच्या राज्यात ज्या राष्ट्रीय शाळा होत्या त्यांना निजाम सरकार बागी मदरसा म्हणजेच बंडखोरांच्या शाळा असे म्हणत. स्वामीजी तशाच शाळेचे मुख्याध्यापक होते. काही वर्षानंतर त्यांनी हिप्परगा सोडलं आणि अंबाजोगाई येथे योगेश्वरी विद्यालयाची स्थापना केली. ही शाळा म्हणजे अक्षरशः सुरुवातीपासून त्यांना उभी करावी लागली. विद्यार्थी आणण्यापासून ते परवानगी आणण्यापर्यंत सगळी कामे त्यांना करावी लागली. बाबासाहेब परांजपे यांची त्यांना या कार्यात मोलाची साथ मिळाली. अंबाजोगाईच्या शाळेला परवानगी नव्हती ती मिळवण्यासाठी त्यांना हैदराबादला सतत जावं यावं लागलं. परवानगीसाठी अनेक युक्तिवाद आणि मुत्सद्देगिरी त्यांना करावी लागली. निजामाला त्यांना परवानगी द्यायची नव्हती पण ते अडून बसल्यामुळे शेवटी त्यांना परवानगी देणं भाग पडलं.
इथं परवानगी मिळण्यापेक्षा एक मोठा फायदा झाला होता तो म्हणजे या निमित्ताने स्वामीजींच्या हैदराबादच्या मोठ्या नेत्यांच्या ओळखी झाल्या आणि स्वामीजींची कार्यपद्धती पाहून ते भारावून गेले ज्याचा उपयोग पुढे स्वातंत्र्य लढ्यासाठी झाला.
हे सर्व करत असताना त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचा विचार घोळत होता. पण त्यासाठी योग्य संधी सापडत नव्हती. 1937 साली परतूर येथे स्वातंत्र्याची आस असणाऱ्या लोकांचं संमेलन भरलं. या संमेलनाला महाराष्ट्र परिषद असं म्हटलं गेलं.


1942 ला चले जाव आंदोलन सुरू झालं. या आंदोलनामुळे जसा संपूर्ण देश ढवळून निघाला त्याचप्रमाणे हैदराबाद संस्थान देखील पेटून उठलं. अनेक मोठ्या नेत्यांची धरपकड सुरू झाली. स्वामीजींना पुन्हा अटक झाली आणि त्यांना 1943 ला सोडण्यात आलं. दरम्यान, निजामाच्या पाठिंब्याने तयार झालेल्या इत्तेहाद संघटनेची मूळं घट्ट रोवायला सुरुवात झाली. अनंत भालेरावांनी इत्तेहादचा उल्लेख जालीम विषवल्ली असा केला आहे.
रझाकारांचे अत्याचार वाढत गेले तसा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी गोविंदभाई आणि बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वात तरुणांचे गट तयार करण्यात आले. गोविंदभाईंचं व्यक्तिमत्व तर तरुणांना भुरळ घालणारं होतं.


त्यांच्या एका शब्दावर तरुण काहीही करायला तयार असत. हे तरुणाचे गट गावात गस्त घालत, संरक्षण देत, रझाकारांविरोधात लढत. रझाकारांविरोधात पोलीस चकार शब्द काढत नसत. त्यांच्या डोळ्यादेखत हे अत्याचार चालत त्यामुळे लोकांना या तरुणांचाच आधार होता. हैदराबादच्या लढ्याचं स्वरूप पाहता महात्मा गांधींनी स्वातंत्र्यसैनिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली होती.


क्रांतिकारकांना शस्त्र पुरवणं त्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणं ही सर्व कामे बाबासाहेब परांजपे यांच्याकडे होते. बाबासाहेब परांजपे बॉम्ब बनवत असत. बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देखील त्यांनी इतर तरुणांना दिलं होतं. सर्व आघाड्यांवर लोक निजामा विरोधात उठले होते. गावातल्या पाटील-कुलकर्ण्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. लोक निषेध म्हणून निजाम सरकारनं लावलेली शिंदीची झाडं तोडू लागली. ही शिंदीची झाडं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जाच असत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर ही झाडं लावली जात. त्याची देखभाल शेतकऱ्यांना करावी लागत असे आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे सरकारचं असे. अशी 22,000 झाडं या काळात तोडण्यात आली.
एक मोठे कार्यकर्ते होते त्यांचं नाव गोविंद पानसरे. त्यांची रझाकारांनी हत्या केली. त्या हत्येचा बदला स्वातंत्र्यसैनिकांनी घेतला.


उमरी येथे स्वातंत्र्यसैनिकांनी बॅंक लुटली. त्या लुटीचे पैसे काँग्रेसकडे जमा करण्यात आले. असं हे स्वातंत्र्य आंदोलन संस्थानात वणव्यासारखं पेटलं होतं. या दरोड्यात अनंत भालेराव यांनी देखील सहभाग घेतला होता. पुढे अनंत भालेराव हे दैनिक मराठवाडाचे संपादक झाले. स्वातंत्र्यापूर्वी बंदूक घेऊन आणि स्वातंत्र्यानंतर लेखणी घेऊनच त्यांनी देशसेवा केली.
1943 ला स्वामीजी बाहेर आले तरी काँग्रेसवरील बंदी काही उठली नव्हती. पण संघटना नाही म्हणून स्वामीजी चूप बसणाऱ्यांपैकी नव्हते. मराठवाडा, तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमध्ये त्यांनी प्रांतिक परिषदांच्या माध्यमातून संघटना बांधण्याचं काम केलं होतं.
स्वामीजींना मराठी, तेलुगू, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी या पाच भाषा येत. त्यामुळे त्या-त्या प्रांतातील व्यक्तीला ते आपल्या पैकीच वाटत. उर्दू आणि इंग्रजीवर प्रभुत्व असण्याचा त्यांना फायदा वाटाघाटी वेळी झाला. अतिशय नम्रपणे, मुद्देसुदपणे ते आपली भूमिका ठामपणे मांडू शकत.
सूचित केलं.
निजामाने त्यांना त्याच दिवशी तुरुंगात टाकलं. बाहेरची परिस्थिती कशी आहे याच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत असत. काही दिवस तुरुंगात काढल्यावर त्यांच्या कानावर गोष्ट आली की ती म्हणजे भारत सरकारने निजामासोबत जैसे थे करार केला आहे. या करारानंतर स्वामीजींची दुसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली.
स्वामीजींनी या कराराचा निषेध केला. मुळात असा करार भारत सरकारला करायची गरजच काय असा प्रश्न त्यांनी विचारला. या करारानंतर निजामाने नावापुरते 20 सत्याग्रही सोडले आहेत पण अद्याप तुरुंगात असलेल्या 20,000 सत्याग्रहींचं काय असा प्रश्न त्यांनी विचारला.
तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी राज्याच्या सीमावर्ती भागात दौरे केले. याच काळात ते मद्रासला जाऊन गांधीजींना भेटून आले, सरदार वल्लभ पटेलांना भेटून आले. गांधीजींशी त्यांची ही भेट शेवटची ठरली. ते 26 जानेवारी 1948 ला संस्थानात आले. त्यांना आल्या आल्या अटक करण्यात आली. त्यांना गुलबर्गा तुरुंगात टाकण्यात आलं. अटकेच्या चार दिवसानंतर गांधीजींची हत्या झाली हे वृत्त त्यांच्या कानी पडलं.
स्वामीजी तुरुंगात असताना त्यांच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष दिगंबरराव बिंदू हे वाटाघाटी करत असत. स्वामीजींनी तयार केलेली फौज आता आक्रमक बनली होती. तुरुंगात आणि बाहेर असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्थिती करेंगे या मरेंगे अशीच होती. रझाकाराच्या अत्याचारांना सीमा उरली नव्हती.


शेवटी, भारत सरकारनं पोलीस ऍक्शन घेण्याचं ठरवलं. 13 सप्टेंबर रोजी भारतीय सैन्य संस्थानात आलं आणि 17 सप्टेंबर रोजी निजामाच्या सैन्यानं, रझाकारांनी त्यांच्यासमोर नांगी टाकली.
कारवाईचा मुहूर्त ठरला. 13 सप्टेंबर 1948 म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी! साधारण 10 दिवसात कारवाई संपेल असा भारतीय लष्कराचा अंदाज होता. प्रत्यक्षात साडे तीन दिवसातच हैदराबाद संस्थानातील सर्व महत्वाच्या केंद्रांवर भारतीय लष्करानं ताबा मिळवला. निजामाने
राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा जाहीर केली. नेहरूंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत.
राज्यांची भाषावार पुनर्रचना व्हावी असं स्वामीजींना वाटे. हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा या महाराष्ट्रात यावा म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले. स्वामीजी सरंजामशाहीच्या विरोधी होते. पण सरंजामाविरोधात सशस्त्र उठाव नको असे त्यांना वाटे. तेलंगणा आणि आंध्रमधील शेतकऱ्यांनी शस्त्रे खाली टाकावी म्हणून त्यांनी या भागाचे दौरे केले. पुढे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीत ते सहभागी झाले.
वय वाढू लागलं होतं प्रवासाचा ताण असह्य होऊ लागला त्यामुळे त्यांनी स्वतःला शैक्षणिक कार्याला वाहून घेतलं. 1971 मध्ये ते आजारी पडले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालीच नाही. त्यांना अंबाजोगाई येथून हलवण्यात आलं आणि हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 22 जानेवारी 1972 ला त्यांचं निधन झालं.
स्वामीजींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात तसेच नंतरही अनेक नेते घडवले. गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, आ. कृ. वाघमारे (दै. मराठवाडाचे संस्थापक), अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू यादी बरीच मोठी आहे. भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे देखील त्यांचेच शिष्य आहेत. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या विनंतीवरूनच अनंत भालेराव यांनी स्वामीजींचे चरित्र लिहिले होते.
नरहर कुरुंदकरांना देखील त्यांनीच पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं होतं.
स्वामीजी हे उत्तम नेते होते यात शंकाच नाही पण त्याच बरोबर त्यांनी नवं नेतृत्व समोर यावं म्हणून देखील काम केलं आहे. त्यांना घडवलेल्या लोकांची नावं जरी पाहिली तरी आपल्याला त्यांचं मोठेपण कळू शकतं.
त्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच मराठवाडा स्वतंत्र तर झालाच त्याचबरोबर मराठवाड्याच्या विकासाचा ध्यास घेणारी पिढी देखील स्वामीजींनी बनवली. स्वामीजींनी स्वातंत्र्य लढ्यासाठी, मराठवाडा मुक्ती साठी दिलेल्या लढ्याची नोंद विसरणे शक्यच नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामीजीस विनम्र आदरांजली.
संदर्भ: * स्वामी रामानंदांचे चरित्र- अनंत भालेराव, * हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा – अनंत भालेराव, * कर्मयोगी संन्यासी – न्या. नरेंद्र चपळगावकर