दोन दशकानंतर कॉंग्रेस पक्षाला मिळणार नवा अध्यक्ष; निवडणुक प्रक्रिया सुरू !


▪️२४ सप्टेंबर पासुन उमेदवारी अर्ज
भरण्यास सुरुवात
काँग्रेस पक्षाला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची प्रक्रिया आता 24 सप्टेंबर पासुन सुरु झाली आहे. पक्षाच्या या निवडणुक प्रक्रियेतून नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंत 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीत गांधी कुटुंबातील एकही सदस्य उभा राहणार नाहीय, असे संकेत खुद्द माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीच दिले आहेत.
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकी साठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, ती 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ह्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज कसा भरायचा आणि निवडणुकीत कोण उतरणार, हा प्रश्न आहे. यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे, उमेदवार हा पक्षाचा प्राथमिक सदस्य असावा. एवढंच नाही तर त्यांना काँग्रेसच्या 10 लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळवून उमेदवारी देण्यासाठी त्यांची स्वाक्षरी घ्यावी लागणार आहे. त्यांनी ही पात्रता पूर्ण केल्यास, त्या नेत्याचा उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणार आहे.
19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर असेल. या निवडणुक प्रक्रियेबद्दल बोलायचं झाल्यास, एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. याच निवडणूक प्रक्रियेतून आपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची काँग्रेसची ही योजना आहे.


अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकी साठी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत आहेत. या यादीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय, काँग्रेसचे लोकसभा खासदार शशी थरूर हेही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. अलीकडंच त्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. त्याचबरोबर या यादीत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे शिल्पकार दिग्विजय सिंह यांचंही नाव चर्चेत आहे. त्यांनी ही गुरुवारी सोनिया गांधींची भेट घेतली होती.
दरम्यान, अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असली, तरी आताही त्यांचा राजस्थानबद्दलचा मोह सुटत नाहीय. ते सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी सर्व फिल्डिंग लावत आहेत. गेहलोत यांनी त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून सोनिया गांधींना विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांचं नाव सुचविल्याची चर्चा आहे. याशिवाय, त्यांच्याकडं अशी अनेक नावं आहेत, त्याद्वारे ते सचीन पायलट यांचा पत्ता कट करु शकतात.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गांधी घराण्यातील कोणीही पुढील पक्षाध्यक्ष होऊ नये, असं स्पष्ट केलं होतं. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राहुल गांधी यांनीच ही माहिती दिल्याचं सांगत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गौप्यस्फोट केला आहे. शुक्रवारी केरळमध्ये माध्यमांना संबोधित करताना गेहलोत म्हणाले, ‘मी त्यांना (राहुल गांधींना अनेक वेळा विनंती केली आहे की, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष होण्याचा प्रस्ताव स्वीकारावा. त्यांनी स्पष्ट केलं की गांधी घराण्यातील कोणीही पुढील काळात पक्षाचा प्रमुख बनू नये.’ आपण लवकरच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं गेहलोत यांनी स्पष्ट केलं होतं. देशाची सद्यस्थिती लक्षात घेता विरोधी पक्ष मजबूत होणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले होते.
▪️बिगर गांधी घराण्यातले आजपर्यंत झालेले ११ अध्यक्ष !


१.
१९४८ ते १९४९
भोगराजू पट्टाभी सीतारामय्या हे स्वातंत्र्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. १९४८ ते १९४९ पर्यंत ते या पदावर राहिले.
२.
१९४९ ते १९५१
स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाचे नेते पुरुषोत्तम दास टंडन हे १९४९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते १९५१ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते.
३.
१९५५ ते १९५९
१९५५ मध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं यूएन ढेबर यांच्याकडे आली. ते १९५९ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. १९५२ साली भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यानंतर ढेबर यांनी खऱ्या अर्थानं कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेला आकार दिला.
४.
१९६० ते १९६३
त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी १९६० ते १९६३ या कालावधीत कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद संभाळलं.
५.
१९६४ ते १९६७
रेड्डी यांच्यानंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ के कामराज यांच्या गळ्यात पडली. कामराज हे १९६४ ते १९६७ या कालावधीत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मतभेदांमुळं त्यांच्या अध्यक्षपदाची कारकिर्द चांगलीच गाजली होती.
६.
१९६८ ते १९७०
त्यानंतर एस. निजलिंगप्पा हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. ते १९६८ ते १९७० या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते
७.
१९७० ते १९७१
माजी उपपंतप्रधान जगजीवन राम हे देखील १९७० ते १९७१ या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
८.
१९७२ ते १९७४
माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी १९७२ ते १९७४ या काळात काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं.
९.
१९७५ ते १९७७
त्यानंतर जेष्ठ नेते देवकांत बरुआ हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. १९७५ ते १९७७ असा त्यांचा कार्यकाळ होता.
‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इन इंडिया’ ही प्रसिद्ध घोषणा बरुआ यांनीच दिली होती. याशिवाय देशात लागलेल्या आणीबाणीच्या काळात ते कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिले होते.
१०.
राजीव गांधी यांच्याकडून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी कॉंग्रेस पक्षाची सूत्रं हातील घेतली. ते १९९२ ते १९९४ या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
११.
सीताराम केसरी हे काँग्रेस पक्षाचे शेवटचे बिगरगांधी अध्यक्ष होते. त्यांनी १९९६ ते १९९८ पर्यंत कॉंग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. त्यानंतर अद्याप बिगरगांधी घराण्याकडे कॉंग्रेसचं अध्यक्षपद गेलेलं नाही.
१२.
सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यामुळं कॉंग्रेसवर गांधी घराण्याचंच वर्चस्व असल्याची टीका सातत्यानं विरोधी पक्षाकडून करण्यात येते. त्यामुळं आता २४ वर्षांनंतर बिगरगांधी अध्यक्ष निवडण्याची मोठी संधी पक्षासमोर असणार आहे.
१३.
त्यानंतर आता कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर हे आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं जर या दोन नेत्यांमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर कॉंग्रेसला तब्बल २४ वर्षांनंतर बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळेल.