महाराष्ट्र

जयवंती नदी व्हाया योगेश्वरी मंदीर टू तहसील कार्यालय ।।भाग३।।

“जयवंती नदी व्हाया योगेश्वरी मंदीर टू तहसील कार्यालय” या माझ्या ४ शृंखलेच्या दुसऱ्या भागात काल आपण योगेश्वरी मंदीर विश्वस्त मंडळाच्या स्थापनेपासून ते संचालक मंडळ आणि पुजारी आणि संचालक मंडळ सदस्यांतील आप-आपसातल्या दुही च्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर कोणावरही कसल्याही प्रकारचा अंकुश न ठेवता प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

याच शृंखलेतील तिसऱ्या भागात “योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या” दुही आणि कामकाजावर प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. काल दुसऱ्या भागात मी योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाने संचालक या नात्याने देवीची सेवा करतांना आपले राजकीय जोडे बाहेर ठेवून संचालक मंडळाच्या सदस्यांनी काम करावयास पाहिजे होते आणि ते न केल्याने संचालक मंडळातील सदस्यांमध्ये आप-आपसात आणि संचालक मंडळ आणि तत्कालीन विद्यमान पुजारी यांच्या मध्ये दुही निर्माण झाली या निष्कर्षापर्यंत येवून पोहोचलो होतो.

आज संचालक मंडळाचा या पुढच्या प्रवासावर आणि कामकाजावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.

मला नेहमी असा प्रश्न पडत आला आहे की, साधारणतः १९७३ नंतर जे संचालक मंडळ या विश्वस्त कमेटीवर कारभार पाहण्यासाठी निवडणूक आले ते संचालक सातत्याने या मंदिराचा विश्वस्त होण्यासाठी अगदी टोकाची भुमिका घेवून साम दाम दंड पध्दतीने का प्रयत्न करतात? अशी काय शक्ती आहे की या संचालक मंडळात की, सामाजिक/राजकीय आणि वैयक्तिक विरोधाच्या अगदी पराकोटीला जावून ही निवडणूक यांना लढवाविसी वाटते. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा अगदी छोटा आणि प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील सर्व देवस्थानांच्या संचालक मंडळाचा आज पर्यंतचा इतिहास पाहिला तर कोणत्याही देवस्थानाचा वाद देशाच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्याचे माझ्या ऐकिवात किंवा वाचनात नाही. याही उपर आपण असे जरी गृहीत धरले की महाराष्ट्रातील पाच देवस्थानाचा वाद हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयात गेला आहे तरी असा प्रश्न निर्माण होतो की काय एवढी शक्ती आहे या योगेश्वरी देवी मंदिराचा संचालक मंडळाचा सदस्य होण्याचा आणि पुजारी होण्याचा हा वाद देशाच्या सर्वोच्च न्यायालया पर्यंत जावू शकतो.

खरं तर या प्रश्नांचा अभ्यास मी ही अजून केला नाही. पण हे लिहीत असताना मात्र माझ्या मनात योगेश्वरी मातेच्या अंगावर भक्तांनी घातलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारलेला डल्ला आणि मंदिराच्या नावे अगदी मोक्याच्या जागेवर असलेल्या आणि भरपुर उत्पन्न आणि पैसा देणा-या शेकडो एकर जमिनी माझ्या डोळ्यासमोर येतात. विद्यमान आणि माजी संचालक संचालक मंडळातील सदस्यांनी मात्र धर्मदाय आयुक्त यांच्या आणि जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि देशाच्या न्यायालयात सुरु असलेल्या याचिकांमध्ये या संदर्भात एकाही शब्दाचा अथवा वाक्याचा समावेश करीत नाहीत? याचा नेमका अर्थ एक पत्रकार म्हणून मी काय घ्यावा. संचालक मंडळ आणि पुजारी अथवा विद्यमान संचालक मंडळ आणि माजी संचालक मंडळातील उर्वरित सदस्यांच्या वाद/प्रतिवादाची कारणं या मध्ये असतील का? असा साधा प्रश्न मला पडतो.

योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या संचालक आणि पुजारी यांच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या निकालानंतर हा वाद थांबेल असे योगेश्वरी भक्तांना आणि खरे तर मला ही वाटत होते. मात्र हा वाद न थांबता तो सतत पुढे वाढत गेला. संचालक मंडळात असलेले आणि नसलेले दोन्ही सदस्य या निकालानंतर आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी स्वतः हुन माध्यमांसमोर आले. योगेश्वरी देवल कमेटीच्या स्थापनेपासून जेवढ्या पत्रकार परीषदा संचालक मंडळाने आज पर्यंत घेतल्या नाहीत एवढ्या प्राकार परीषदा एका महिन्यात झाल्या. हे सर्व कशासाठी? आपला कारभार स्वच्छ आहे हे सांगण्यासाठी? जे कारभार स्वच्छ करतात ते अशा पत्रकार परिषद बोलावून आपण कारभार स्वच्छ करतो म्हणून सांगत नसतात. असा माझा पंचेचाळीस वर्षाच्या पत्रकारितेचा अनुभव सांगतो.

योगेश्वरी देवल कमेटी संचालक मंडळातील काही सदस्यांनी या महिन्याभराच्या कालावधीत ज्या पत्रकार परीषदा बोलावल्या त्यामध्ये त्यांनी फक्त आपल्या संचालक मंडळाने कोणकोणत्या सुविधा भक्तांना पुरवल्या याचीच माहिती दिली. योगेश्वरी मातेच्या अंगावरील सोने लुबाडणाऱ्या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात, गेली अनेक वर्षे नाममात्र पैशाच्या मोबदल्यात मंदिराची शेकडो एकर जमीन वापरणा-या आणि ही जमीन आपलीच आहे असे सांगणाऱ्या मुजोर शेतकऱ्यांच्या विरोधात, योगेश्वरी मातेची पुजा अर्चना करण्यासाठी लागणारी पाने- फुले पुरवण्यासाठी निजाम सरकारने दिलेली जमीन त्या पुजा-याला पैसे देऊन बळजबरीने वहिती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात, योगेश्वरी मंदिरालगत असलेल्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि शेजारच्या जमिनीवर पक्की घरे बांधणा-यांच्या विरोधात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे हे संचालक मंडळ का देवू शकत नाहीत याचे मला आश्चर्य वाटते.

योगेश्वरी माता ही या गावचे भुषण आहे. ते एक जाज्वल्य मंदिर आहे. या देवीची उपासना करणाऱ्या लोकांना देवी प्रसन्न होवून त्यांचे कष्ट दुर करते ही आज ही या विभागातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या काणा-कोप-यात राहणाऱ्या लोकांची श्रद्धा आहे. याच शृध्देपोटी योगेश्वरी मातेच्या नवरात्र महोत्सवात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शेकडो महिला योगेश्वरी मातेच्या चरणी आपली वैयक्तिक अडचण सांगून मंदीर परीसरातच मुक्काम ठेवून योगेश्वरी मातेची ध्यान धारणा करीत तीन, पाच आणि नवू दिवसांची सेवा करतात. आपली अडचण दूर झाली तर पुन्हा नवरात्र महोत्सवात येवून बसेन असे तिच्या चरणी लीन होवून सांगतात. अडचण दुर झाली तर पुन्हा पुढच्या वर्षी येवून बसतात!

गेली अनेक शतकांपासून ची परंपरा आज ही त्याच श्रध्देने चालू आहे. आज २१ व्या शतकात जग वेगाने धावत असतांनाच योगेश्वरी मातेच्या चरणी लीन होणा-या या मातेचा ओढा, त्यांची भक्ती आपल्या अंगात येणार की नाही? हा मला पडणारा साधा प्रश्न आहे.

मला आठवतं, मी लहान असताना खुप आजारी होतो. वडिलांनी त्याकाळच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये माझ्यावर खुप उपचार केले. विलाज झाला नाही. शेवटी वडिलांनी त्यांचे मित्र दासोपंतांचे वंशज डॉ. बापुसाहेब देशपांडे यांच्या कडे घेऊन गेले. बापुसाहेबांनी मला तपासले उपचार सुरू केले आणि वडिलांना सांगितले एकदा दासोपंताच्या समाधीस्थळी असलेल्या त्यांच्या पायावर नेवून ठेवा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि सहा महीने याला घेऊन दररोज समाधीवर सायंकाळी आरतीला या. आई आणि वडिलांनी हा नियम पाळला. पावसाळ्यात सुतळीच्या पोत्यावर रेनकोट टाकून मला घेऊन आई वडिलांनी केलेल्या वा-या मला अजून ही आठवतात.

एकदा असेच मी आणि वडील दासोपंतांची

जय देवा जय ब्रम्ह स्वरुपा

श्री सद्गुरू नाथा।

आरती ओवाळून तव चरणी

ठेवसी तव माथा।।

ही चढ्या आवाजातील आरती करुन दोसोपंतां बद्दलची माहिती ऐकत योगेश्वरी मंदिरात आलो. योगेश्वरी मातेचे दर्शन घेतले तिच्या चरणी लीन झालो. वडिलांनी योगेश्वरी देवी बद्दलची माहिती विचारली. वडील सांगत होते, “एकदा एका भक्ताने गाभाऱ्यात कोणी नाही असे पाहून योगेश्वरी मातेच्या अंगावरील एका लहान दागिन्यावर हात मारण्याचा प्रयत्न केला. गाभाऱ्यातून बाहेर येई पर्यंतच तो भक्त दृष्टी हीन झाला. त्याला काहीच दिसेनासे झाले.”

ही गोष्ट खरी आहे की खोटी यावर चर्चा करण्याचा विषय नाही, मात्र योगेश्वरी मातेचे मंदिर आज ही जाज्वल्य आहे, जागृत आहे याची प्रचिती अनेक भक्तांना येत असते. हे मात्र खरे आहे. योगेश्वरी मातेच्या संदर्भात हे सर्व लिहिण्याचा विचार, शक्ती आणि बुद्धी योगेश्वरी मातेनेच मला दिली असावी अशी माझी प्रामाणिक भावना आहे.

“जयवंती नदी व्हाया योगेश्वरी मंदीर टू तहसील कार्यालय” या चार शृंखलेच्या तिसऱ्या शृखंलेत मी योगेश्वरी देवी संचालक मंडळ संदर्भातील माझे लिखाण येथे थांबवत आहे. शेवटी मला एकच सांगावयाचे आहे की, योगेश्वरी मातेचे भक्त म्हणून ज्यांनी तिच्या दागिन्यांवर, त्यांच्या सेवेसाठी बाहल करण्यात आलेल्या जमिनीवर आपण देवीचे भक्त आहेत हे सांगून डल्ला मारण्याचे सुरु केलेले काम ताबडतोब बंद करा. योगेश्वरी माता ही आदिशक्ती चे रुप आहे, तिला तुमच्या कडे वक्र नजरेने पाहिल्याचे उदाहरण तुम्ही बनू नका!

सर्वे भवंतु सुखीनं :

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker