महाराष्ट्र

ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेशाच्या फॅड मुळे शहरी महाविद्यालये पडु लागली ओस!


शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालानंतर कसल्याही प्रकारची शैक्षणिक गुणवत्ता नसलेल्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात मुलांचा प्रवेश घ्यायचा आणि मुलांना अतिउच्च शिक्षण देण्यासाठी लातुर येथील खाजगी शिकवण्यात प्रवेश देवून त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करायचे हे फॅड विकसित झाले असल्यामुळे शहरातील अनेक नावाजलेले महाविद्यालये आता विद्यार्थ्यांविना ओस पडु लागल्याचे चित्र दिसत आहे.
मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत अलिकडे पालक खुप जागृत झाले असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगा आठव्या इयत्तेत गेला की, १० वी परीक्षेनंतर त्यांचे ११ वी चा प्रवेश ग्रामीण भागातील कोणत्या महाविद्यालयात घ्यायचा व लातुर येथील कोणत्या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये त्याला कोचिंग लावायचे याचे परफेक्ट नियोजन आता पालक करु लागले आहेत. ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांमध्ये तज्ञ प्राध्यापक वर्ग नसतांनाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यकाळात अनुपस्थितीची सुट देणा-या आणि विद्यार्थ्यांना चांगले गुण घेवून परीक्षा उत्तीर्ण करण्याची हमी देणा-या महाविद्यालयात आपल्या मुलाला प्रवेश मिळवून देण्यात पालकांचा हातखंडा झाला आहे.


पालकांमध्ये निर्माण झालेल्या या नवीन पॅटर्न मुळे शिक्षणक्षेत्रात एकेकाळी दबदबा असणा-या महाविद्यालयात प्रवेश क्षमतेपेक्षा अर्ध्यापेक्षा कमी रजिस्ट्रेशन झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील
सीबीएससी अभ्यासक्रम असलेल्या शाळां मात्र आपली विद्यार्थी क्षमता कायम टिकवून आहेत. मात्र एकेकाळी शिक्षण क्षेत्रात दबदबा असणा-या व सीबीएससी शिक्षण प्रणाली न अवगत केलेल्या महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशासाठी आता दारोदारी फिरण्याची नौबत आली आहे.


बीड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे व एकाच प्रभागात पाच-सहा शाळांना शालेय शिक्षण विभागाने रितसर परवानगी दिली असल्यामुळे या शाळांना प्रवेश क्षमता कायम टिकवून ठेवण्यासाठी शाळा सुरु होण्याच्या पूर्वी एक महिना अगोदर विद्यार्थी गोळा करीत फिरण्याची नौबत १०-१५ वर्षापुर्वीच येवून ठेपली होती. आता पालकांनी ११-१२ वी प्रवेशासाठी ग्रामीण महाविद्यालयाकडे आपला मोर्चा वळवला असल्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना विद्यार्थी गोळा करण्यासाठी दारोदार फिरण्याची नौबत येवून ठेपणार आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker