महाराष्ट्र

काळवीट साठवण तलावाची उंची केंव्हा वाढणार?

अंबाजोगाई शहरास पाणी पुरवठा करणा-या योजनेतील अर्धा वाटा ऊचलणा-या काळवीट साठवण तलावाची ऊंची वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा गेली अनेक वर्षे आपण सर्व जण ऐकतो आहोत, मात्र या साठवण तलावाची उंची नेमकी केंव्हा वाढणार हा प्रश्न आज ही अनुत्तरीत आहे.
अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा करण्यामध्ये काळवीट साठवण तलावाचा मोठा वाटा आहे. मांजरा धरणातील पाणीसाठा सातत्याने कमी अधिक होत असतो. या विभागातील पर्जन्यमान सतत अनियमित असते. शिवाय मांजरा धरणावर अप्पर मांजरा धरण बांधले गेले असल्यामुळे जोपर्यंत अप्पर मांजरा भरत नाही तोपर्यंत मांजरा धरणातील पाणी साठवण क्षमतेत वाढ होत नाही. शिवाय या धरणावर बीड, लातुर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. याही शिवाय शेतकऱ्यांच्या राजकीय दबावामुळे वर्षातुन किमान दोन वेळेस तरी शेतीसाठी पाणी सोडण्यात येते.
मांजरा धरणावरुन अंबाजोगाई शहरासाठी करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना ही पुढील तीस वर्षांचे लक्ष्य ठेवून करण्यात आली होती. ही योजना तयार करतांना उपलब्ध पाणी स्त्रोत वाढवण्यासाठी प्रत्येक पाच वर्षांनंतर काय काय उपाय योजना राबवल्या जाव्यात या सुचना स्पष्टपणे नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र या सर्व सुचनांकडे सदरील योजना हातळणा-या विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना आता कालबाह्य ठरु लागली आहे.


अंबाजोगाई शहरातील आताच्या लोकसंख्येचा आणि शहराच्या वाढीचा विचार केला तर ही योजना पुर्णतः कालबाह्य झाली आहे. यासाठी पर्याय म्हणून बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मिती करण्यात यावी ही मागणी शासनाकडे गेली ३० वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीची शासन गांभीर्याने दखल घेत म्हणून गेली १५ वर्षांपासून काळवीट साठवण तलावाची उंची वाढवावी ही मागणी पुढे आली. काळवीट साठवण तलावाची उंची वाढवण्यात यावी यासाठी या विभागातील सर्वच लोकप्रतिनिधी गेले अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
काळवीट साठवण तलावाची उंची वाढवण्यास परवानगी मिळाली अशी चर्चा तत्कालीन आ. प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी निवडणूकीपुर्वी घडवून आणली होती. या चर्चेतील राजकीय भाग सोडला आणि या मधील सत्यता पडताळून पहाण्याचा त्यावेळी प्रयत्न केला असता या माहितीतील सत्यता सहज लक्षात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या दि. १२/७/२०१६ च्या परिपत्रकात ” काळवीट साठवण तलाव तलावाची ऊंची वाढवण्यासाठी परवानगी देण्यात आली” असा स्पष्ट कोठेही उल्लेख करण्यात आलेला आढळून आला नव्हता.
राज्याचे जलसंपदा विभागाचे उपसचीव प्र. गो. मांदाडे यांच्या स्वाक्षरीनिशी काढण्यात आलेल्या या परिपत्रकात “काळवीट धरणाचे खालील बाजूस असणा-या वाण मध्यम प्रकल्पावरील लाभ क्षेत्रातील काही भागात सुक्ष्म सिंचन/कालवा अस्तरीकरण/इतर कारणामुळे लाभ क्षेत्रात झालेली कपात, उदा. खाजगी उपसा, जलसंधारण उपाय योजना इत्यादी पध्दतीने अवलंबून होणारी ०.५० दलघमी इतकी बचत अंबाजोगाई शहराचे पाणी पुरवठ्यासाठी करता येण्याचे शक्य असल्याचे मुख्य अभियंत्यांनी कळवले होते. उपरोक्त बाबीचा विचार करता सदरहु प्रस्तावास अंबाजोगाई शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा वाढत्या तीव्र पाणी टंचाई चा
विचार करता विशेष खास बाब म्हणून खालील अटींच्याअधीन राहुन शासनाची मान्यता देण्यात येत आहे.”
एवढाच उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
या संदर्भातील अटींमध्ये अंबाजोगाई शहराकरीता पाणी परवाना बाबत शासनाचे प्रचलित धोरणानुसार तसेच विहीत नमुन्यामध्ये प्रस्ताव शासनास सादर करुन रितसर मान्यता घेण्यात यावी, तसेच याबाबत आवश्यक तो करारनामा करण्यात यावा. असेही म्हटले आहे.


आज पर्यंत कोणत्याही एका शासकीय परिपत्रकात काळवीट धरणाची ऊंची वाढवण्यासाठी मंजूरी देण्यात आली असा स्पष्ट कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.
काळवीट साठवण धरणाचा कॅचमेंट एरिया खुप चांगला आहे. संपुर्ण खडकाळ भागात हा साठवण तलाव असल्यामुळे या धरणाच्या कॅचमेंट एरीयामध्ये पाऊस पडला खळखळ वाहत मोठ्या प्रमाणावर या धरणात पाणी जमा होते आणि प्रतिवर्षी लाखो दलघमी पाणी या धरणाच्या सांगण्यावरुन वाहून जाते!
या ही वर्षी या धरणातुन लाखो दलघमी पाणी वाहून जात आहे.
या साठवण तलावाची उंची किमान दोन फुटाने तरी या साठवण तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. आणि त्या पाण्याचा उपयोग अंबाजोगाई शहराची वाढत चाललेली तहान भागवण्यासाठी उपयोग होणार आहे.


अंबाजोगाई शहराच्या विकासात आणि वैभवात भर घालणा-या अनेक गोष्टी गेली अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहेत. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती, बुट्टेनाथ साठवण तलाव, अंबाजोगाई शहराला जोडणारा घाटनांदुर -श्रीगोंदा रेल्वे मार्ग, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रिक्त जागांचा प्रश्न, काळवीट साठवण तलाव उंची वाढवण्याचा प्रश्न. अशा किती तरी प्रश्नांची उदाहरणे देता येतील. या सर्व प्रश्नांची सोडवणूक कोण करणार.
हा खरा प्रश्न आहे.

संभाव्य ऊंची वाढवण्यासाठी काय आर्थिक तरतुद करण्यात आली याचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. मुळात काळवीट साठवण तलावाची ऊंची वाढवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकाचा विषयच “काळवीट साठवण तलाव, ता. अंबाजोगाई, जि.बीड या प्रकल्पाची ऊंची वाढवण्यासाठी पाणी उपलब्धता बाबत ” असा आहे. काळवीट साठवण तलावाची ऊंची वाढवण्यासाठी आलेल्या बातम्यांमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker