महाराष्ट्र

आनंदग्राम; एक अविस्मरणीय भेट!

काही गोष्टी ठरवून करु म्हटलं तरी योग आल्याशिवाय घडत नाहीत. माझ्या आनंदग्राम च्या भेटीचं ही असंच होतं गेलं. अनेक वेळा ठरवून ही जाता आलं नाही. काल मात्र तो योग जुळून आला आणि अखेर आम्ही आनंदग्राम ला पोहचलो!

आनंदग्राम, दत्ताभाऊ बारगजे, संध्याताई बारगजे ही नावं आनंदग्रामचंं काम चालू झालं तेंव्हापासून सतत कानावर पडत होतं. आनंदग्राम मध्ये होत असलेल्या कामाबद्दल च्या बातम्या लेख वाचून ऊर अगदी भरुन यायचा. कधी एकदा आनंदग्राम ला जावून सर्व पहातोय असं ही सतत वाटू लागलं होतं. गेली अनेक दिवसांपासून ठरत असलेली भेट अखेर निश्चित केली. सकाळी दत्ताभाऊंशी संपर्क साधत आम्ही येत असल्याची कल्पना दिली आणि दुपारी आम्ही आनंदग्राम च्या गर्द हिरव्या वडाच्या झाडाखाली जाऊन पोहोचलो.
गाडीतुन उतरताच दत्ताभाऊंना फोन केला. “हो सुदर्शनजी, मी पाहिलीय तुमची गाडी, पोहंचतोच आहोत, दोन मिनीटात.” अन् दत्ताभाऊ आणि संध्याताई दोन मिनीटात पोहोचले ही.


माझ्या सोबत असलेल्या माझ्या मित्रांची मी ओळख करून देऊ लागलो, हे डॉ. सिध्देश्वर बिराजदार, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मेडिसीन विभाग प्रमुख आहेत, हे चंद्रशेखर वडमारे, हे ऍड. सुनील पन्हाळे आणि हा रवि सोळुंके आमचा सारथी.


सोबत असलेल्या मित्रांची नावं एकुण दत्ताभाऊ खुष झाले. खरे तर हे सर्व नावाने परिचितच होते, मात्र प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच होत होती. डॉ. सिध्देश्वर बिराजदार सोबत आल्यामुळे दत्ताभाऊंना विशेष समाधान वाटत असल्याचं दिसतं होतं. अनौपचारिक गप्पा संपल्या. आम्ही चहा घेतला, आणि दत्ताभाऊ संध्याताई सोबत आनंदग्राम चा फेरफटका मारण्यास सुरुवात केली.


प्रत्येक ठिकाणी भेट घेत आनंदग्राम च्या उभारणी पासून आजच्या स्थिती पर्यंतची माहिती, चालवण्यात येणारे उपक्रम , मुलांची, मुलींची, आलेल्या पाहुण्यांची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था, किचन शेड, खेळाची साधनं, श्रमदानाची ठिकाणं, प्रार्थना स्थळं, योगा-मेडिटेशनची जागा, आगामी प्रकल्प एक ना अनेक… दत्ताभाऊंनी सतत माहिती देत सर्व प्रकल्प फिरवून दाखवला.


एक दोन जागा दाखवायच्या अगोदर दत्ताभाऊंनी विचारलं, “सुदर्शन, जेवून सांगू की नाष्टा. लगेच होईल तयार!” आम्ही सर्वांनी दत्ताभाऊंकडे पहात नम्रपणे नकार दिला. पुढच्या भेटीत दिवसभर थांबण्याच आणि जेवण करूनच जाण्याच आश्वासन आम्ही दिलं.


एचआयव्ही बाधित मुला-मुलींसाठी दत्ताभाऊ आणि संध्याताई करीत असलेलं काम किती मोठं आहे याचा प्रत्यय आनंंदग्राम मध्ये चालत असताना प्रत्येक पावलोपावली येत होता. हे काम एक तर खुप अवघड, संवेदनशील आणि जीव ओतुन करण्याच काम आहे असं सतत जाणवत होतं.


आनंदग्राम चा फेरफटका पुर्ण करुन आम्ही येई पर्यंत आनंदग्राम मधील सर्व मुलांना एकत्रित करून दत्ताभाऊ यांंनी त्यांच्याशी आमची ओळख करून दिली. आम्हाला त्यांच्याशी संवाद साधता आला. खरं तर हा संवाद केवळ शब्दरुपी नव्हता तर “या -हदयाचे त्या -हदयाशी” असा होता.


आनंदग्राम ची भेट आमच्या आयुष्यात घडलेली एक अविस्मरणीय भेट ठरली. अशा भेटी यापुढे वारंवार घेवू असा आशावाद सोबत घेऊन आम्ही आनंदग्राम चा निरोप घेतला.
धन्यवाद दत्ताभाऊ, संध्याताई आणि आनंंदग्राम टीम!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button