Uncategorized

अंबाजोगाईतील साहित्य महर्षी; प्रा. रामकृष्ण डिघोळकर!

प्रा. रामकृष्ण डिगोळकर सरांचे निधन झाले आहे.मागील काही महिन्यात त्यांची आणि माझी भेट झाली होती.ती भेटच अखेरची ठरली.ती भेट झाल्यानंतर लिहिलेला हा लेख.आज इथं देताना मनात हूरहूर वाटत आहे.सर कायम स्मरणात राहतील….

विलक्षण, प्रतिभावान, थोर माणसं आपल्या आजूबाजूलाच असतात. त्यांचे कार्य ते शांतपणे, ठरवलेल्या वेळेत, नेटाने, जिद्दीने, चिवटपणे पुढे नेत असतात. केवळ त्यांचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. त्यांच्याशी आपल्याला जोडून घेता आले पाहिजे. त्यांच्याकडून असंख्य गोष्टींची प्रेरणा घेण्यातच आपल्या मनाला धन्यता वाटत असते. अशाच लोक विलक्षण गुणवत्तेचे अंबाजोगाई मधील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, गुरूवर्य प्रा. रामकृष्ण डिघोळकर यांच्या साहित्य संपदेविषयी अधिकाराने लिहीण्या-बोलण्या एवढा माझा अधिकार नाही. काही घटनांमुळे त्यांचा आणि माझा स्नेहमय संबंध नुकताच निर्माण झाला. यातूनच त्यांच्या साहित्याचे, व्यक्तिमत्त्वाचे पैलू जवळून पहाता आले. आणि चांगला परिचय झाला. निरंतर अध्ययन- अध्यापन-संशोधन- चिंतन- मनन- वाचन-लेखन यातून सदैव भरलेली ओंजळ रसिक वाचकांच्या पदरी घालणारे, अक्षरांची मैत्री आणि साहित्य शारदेची अविरत सेवा करणारे, प्रा. रामकृष्ण डिघोळकर सर यांच्या विषयी जे माझ्या मनाला वाटले, ते व्यक्त करण्यासाठीचा हा अल्पमती लेखन प्रपंच..

तसं पाहता प्रत्येकवेळी आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी तरळत असतात. माझा प्रा. रामकृष्ण डिघोळकर यांचा तसा जुना स्नेह नव्हता. पण फोनवरच्या चर्चेमुळे सततच्या गप्पांमुळे स्नेह वाढत गेला. आणि काही वेळेला प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला. या ज्ञानतपस्वी असलेल्या, सतत सरस्वतीची उपासना करणाऱ्या अक्षरयात्री लेखकाला, प्राध्यापकाला, प्रगल्भ ज्ञान समृद्ध असणाऱ्या विचक्षण वाचकाला भेटत असताना मला खूप भारावून गेल्यासारखे वाटले. सरांचा व्यासंग, आत्मीयता, संवेदनशीलता, गाढ स्नेह आपल्यालाही समृद्ध आणि प्रगल्भ करून जाणारा आहे. त्यांच्याशी बोलत राहणं म्हणजे आपल्या स्वतःला *विस्तारणे* आहे. प्रचंड ऊर्जा असलेले प्रा. रामकृष्ण डिघोळकर जाणीवपूर्वक सर्वांना सतत वाचन, लिखाणाच्या, कार्यप्रवण राहण्याच्या प्रेरणा देत असतात. लिखाणासाठी त्यांच्या लेखकाच्या प्रज्ञेचा आवाका खूप मोठा आहे. त्यांची ग्रंथसंपदा, बहुमुखी प्रतिभा थक्क करून सोडणारी आहे. वय वर्षे ९० या वयातही ऊर्जेचा प्रवाहित राहणारा झरा हे आपल्या सगळ्याचा अनुपमेय संचित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अलौकिक काव्यप्रतिभा,भावस्पर्शी गद्य लेखन, विविध अंगी चिंतनपर लेखन करणारे प्रज्ञावंत साहित्यिक प्रा. रामकृष्ण डिघोळकर सर हे सर्व परिचित असे नाव. अंबाजोगाईतील गेल्या आठ दशकातील शिक्षण घेतलेल्या पिढ्यांना प्रा. डिघोळकर सर माहीत नसतील तरच नवल. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आणि मामाच्या घरी राहून आईने कष्टपूर्वक सरांना शिकवले. माधुकरी मागून शिक्षण घेणे काय असते याचा अनुभव सरांनी लहान वयातच घेतला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्र्यपूर्व काळात सरांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

अंबाजोगाई येथे पू.भाऊसाहेब चौसाळकर, परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या योगेश्वरी नूतन विद्यालयाचे सर विद्यार्थी. त्यांच्या मामानी त्यांच्यासाठी, शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी खूप शिकाव अशी त्यांची तळमळ होती. सरांना घडवण्यामध्ये पू.एकनाथराव कुलकर्णी या योगेश्वरी शाळेच्या मुख्याध्यापकांचे भरीव असे योगदान राहिलेले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आयोजित साहित्य विशारद ही परीक्षा प्रा. डिघोळकर सर 1954 मध्येच उत्तीर्ण आहेत. तसेच राष्ट्रभाषा सभा , पुणे आयोजित हिंदी प्रवीण परीक्षा ही सर मॅट्रिकपूर्वीच उत्तीर्ण झालेले अंबाजोगाईतील प्रथम विद्यार्थी आहेत. मॅट्रिकमध्येही सरांनी आपला प्रथम श्रेणी काही सोडला नाही. परमपूज्य बेथुजी गुरुजी आणि परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेतून त्यांनी हैद्राबाद येथे सिटी कॉलेजला इंटर सायन्सला प्रवेश घेतला .आणि इथून पुढे ते इंटर पास होऊन कॉलेजमध्येही स्कॉलरशिप मिळवून ते पदवीधर झाले. आणि हैदराबादला शिक्षण पूर्ण झालेले असतानाही त्यांनी पुन्हा अंबाजोगाई ची वाट धरली. खरंतर त्यांचा मेडिकलला नंबर लागलेला असतानाही पूजनीय एकनाथराव कुलकर्णी यांनी प्रा. डिघोळकर सरांना योगेश्वरी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करण्याची संधी दिली. त्यानंतर प्रा. डिघोळकर सरांनी आपले अल्पावधीतच उच्च शिक्षण पूर्ण करून 1970 मध्ये एम.एड. पूर्ण केले. 1975 मध्ये एम. ए.इंग्रजी पूर्ण केले. तिथून पुढे 1975 –77याकाळात खोलेश्वर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आणि तिथून पुढे म्हणजे 1978-80 मध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी विज्ञान महाविद्यालयात आणि 1980-94 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आपली सेवा दिली . 1994 मध्ये सर सेवानिवृत्त झाले.

हे सर्व चालू असतानाच कविता लेखनाचे, साहित्य सेवेचे कार्य त्यांनी चालूच ठेवले होते. तसेच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, सेमिनार मध्ये परिसंवादामध्ये, चर्चासत्रांमध्ये त्यांनी सादर केलेले शोधनिबंध, संशोधन विषयक प्रसिध्द आहे. इंग्रजी मधून केलेले त्यांचे अनेक शोधनिबंध विविध ठिकाणी प्रकाशित झाले. सरांचे आत्तापर्यंत एकूण 65 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. गेल्या आठ दशकामध्ये त्यांचा साहित्य सृजनाचा प्रवास हा रंजक बोधप्रद आणि प्रेरक असा आहे. निसर्गदत्त प्रतिभा शक्ती लाभलेले कवी आणि सरस्वतीचा वरदहस्त प्राप्त झालेले एक प्रतिथयश प्रज्ञावंत म्हणून सरांचा नावलौकिक सर्वत्र आहे. त्यांच्या कविता जिथे रसिक कवीजनांच्या मनाला भुरळ पाडतात तिथं त्यांनी लिहिलेली विविध पुस्तके, ललित लेख वाचकांना नवचैतन्य आणि प्रेरणा प्रदान करतात. मराठी सारस्वताला नवसर्जनाचा बहर चढवतात. या पद्य आणि गद्य लेखनाचा प्रा. डिघोळकर यांचा अफाट प्रवाह प्रतिभावान प्रज्ञासूर्याच्या ज्ञानसिंधुला जाऊन मिळतो. संवेदनशीलतेने आणि अभ्यासपूर्ण व्यासंगाने ओथंबलेल्या विशाल ज्ञानसागरातून त्यांची लेखणी मराठी साहित्य विश्वाला सुशोभित केल्याविना राहत नाही. सरांनी अतिशय मोलाचं आणि भरीव असं लेखन कार्य केलेल आहे. त्यांच्या पुस्तकांची नावे जरी आपण पाहिली तरी त्यांचा व्यासंग आणि त्यांचं कार्य आपल्याला थक्क करून सोडणार आहे. त्यांच्या निवडक पुस्तकांची नावे पुढील प्रमाणे- आदिवासी संस्कृती ,आदिवासी लोकजीवन, भारत मातेच्या विरांगणा, भारतीय मानसशास्त्र, चीन संस्कृती, दासोपंतांच्या पासोडीचा अन्वयार्थ आणि विवेचन, हिंदू धर्मातील देवदेवता, इस्लाम मूलभूत शिकवण आणि जीवन व्यवस्था, महाराष्ट्रातील भारतरत्न मानवी जीवन आणि आयुर्वेद, मराठवाडा गौरव गाथा, श्री क्षेत्र अंबाजोगाई ,महाराष्ट्रातील साहित्यरत्न, हरिपाठाच्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद, मनाच्या श्लोकांचा इंग्रजी अनुवाद, अमृतानुभवाचा इंग्रजी अनुवाद, चांगदेव पासष्टी इंग्रजी अनुवाद, जीवनदर्शन लेखसंग्रह, ताटीच्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद, श्रीमद् भगवद्गीतेवरील जीवन सूत्रांचे पुस्तक, पंचीकरण, ब्रह्मसूत्र, परामृत ,संत एकनाथ कृत हरिपाठ, परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांचे शिक्षण विचार आणि त्यांचा त्यागमय योगदान अशा अनेकविध साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या आहेत. या वयातही म्हणजे वयाच्या नव्वदीतही ते दिवसातून किमान 50-70 पाने वाचतात. सातत्याने लिखाण करतात. कविता, ललित लेख, स्तंभलेखन व्यक्तिचित्रण, प्रवास वर्णन, दीर्घ लेखन, सदर लेखन, समीक्षणात्मक लेखन असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केलेले आहे. तसेच याशिवाय विविध वृत्तपत्रातून, दिवाळी अंकातून, साहित्य विषयक मासिकातून सातत्याने त्यांच्या लेखनाचा प्रवाह हा वाहतोच आहे. विविध कवी संमेलनातून सरांचे काव्यवाचन मोठ्या प्रमाणात सादर झालेले असून ठीक ठिकाणी आयोजित चर्चासत्रे, साहित्य संमेलनात आमंत्रित कवी, वक्ते म्हणूनही ते सहभागी झाले आहेत. अनेक ठिकाणी जाहीर व्याख्यानमालेत त्यांनी व्याख्याते म्हणूनही अभ्यासपूर्ण दिलेली आहेत. ही व्याख्याने श्रोत्यांसाठी ज्ञानाची अपूर्व मेजवानी ठरलेली आहेत. 1995 साली प्रकाशित झालेल्या दर्पण काव्यसंग्रहाला भावनाप्रधान कवितेने आणि आपल्या स्वच्छंद लेखणीतून आकार दिला आहे. याच दर्पण काव्यसंग्रहाला उदगीर येथील राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार मिळाला. तसेच त्यांना कन्नड चा साहित्त्याचार्य पुरस्कारही मिळाला. विश्वनाथांनी साहित्य दर्पण या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे कवित्व दुर्लभं लोके शक्तीस्तोत्र सुदुर्लभा म्हणजेच माणसांमध्ये कवित्व येणे दुर्लभ आणि त्यातच काव्य निर्मितीची प्रतिभा शक्ती प्राप्त होणे हे तर अति दुर्लभच. परमपूज्य स्वामीजी, परमपूज्य बेथुजी गुरुजी, पूजनीय बाबासाहेब परांजपे यांना प्रमाण मानणारी प्राध्यापकांची, अभ्यासकांची जी मोठी पिढी अंबाजोगाईत निर्माण झाली त्यात प्रा. डिघोळकर एक प्रमुख नाव. त्यांच्या ग्रंथ लिखाणात एक सोज्वळ आणि सात्विक वृत्तीचा अभ्यासक दडला आहे.

आपल्या स्नेहांना, मित्रांना , विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात अग्रेसर राहणारा हा माणूस अनेक विद्यार्थ्यांना ते नेहमीच आधार वाटत आलेले आहेत. अनेकांची जीवन त्यांनी घडवलेले आहे. अंबाजोगाईतील शब्द कुबेर दासोपंत, आद्यकवी मुकुंदराज, कृष्णदयार्णव या प्राचीन कवींचा दिघोळकर सरांनी प्रचंड कष्टपूर्वक, सर्वदृष्टीने अभ्यास करून त्यांच्या साहित्याला प्रकाशात आणण्याचे काम केले आहे. सरांनी इंग्रजी साहित्यातही खूप मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे इंग्रजी वाचनही अफाट आहे. प्रा. डिघोळकर सरांना सतत माणसांमध्ये राहायला आवडते. ते कुटुंब वत्सल आहेत. त्यांची मुलेही त्यांची अविरत सेवा करत असतात. आता ते पुण्याला राहतात. जेव्हा ते अंबाजोगाईत येतात, तेव्हा त्यांच्या घरामध्ये सातत्याने साहित्यिक, नवोदीत कवी, लेखक, ज्ञानोपासक इत्यादींची सारखी वर्दळ असते. त्यांची खासियत म्हणजे भेटायला येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे ते या वयात देखील वयाच्या नव्वदितही उत्साहाने स्वागत करतात. लेखन आणि अध्यापन हे दोन घटक प्रा. डिघोळकर यांच्या यशातील मोठे वाटेकरी आहेत. रोज सकाळी उठून योग, ध्यानधारणा करून सरांनी आरोग्य कमावले आहे. अत्यंत कामात व्यग्र असणाऱ्या प्रा. डिघोळकर सरांचे वेळेचे नियोजन अत्यंत काटेकोर आहे. अशा कितीतरी बाबी मी त्यांचा एक अप्रत्यक्ष विद्यार्थी या नात्याने लिहू शकतो. प्रा. डिघोळकर सर हे खूप भाग्यशाली आहेत. त्यांना खूप छान आयुष्य मिळालेले आहे. हे आयुष्य जगताना त्यांच्या पत्नी उषा डिघोळकर याही खोलेश्वर विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांची साथही बहुमोलाची ठरलेली आहे. नुकतंच त्यांचं एक वर्षापूर्वी निधन झालं. या दुःखातूनही सरांना बाहेर आणलं ते त्यांच्या लिखाणानं आणि साहित्यानेच. नमस्कार करावा अशी पावलं आज अभावानेच दिसत असतात. सद्यस्थितीत महाविद्यालयीन पातळीवर तर अभावानेच नि:स्पृह माणसे भेटत असतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडी बचावधोरण अवलंबिणारे अनेक माणसं, प्राध्यापक आपल्या सभोवती असतात.

अशा परिस्थितीत प्रा. डिघोळकर सर यांची प्रेरणा घेऊन, त्यांना वंदन, करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहणे ही गोष्ट निश्चितच बळ देणारी ठरत असते. प्रा. डिघोळकर सर हे अनेकांचे आधारवड आहेत. महाविद्यालयीन पातळीवर निरपेक्ष बुद्धीने कसे काम करता येते याचा आदर्श वस्तू पाठ त्यांनी घालून दिला आहे. त्यांची साहित्य निष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा, याबाबत कोणाचेच दुमत नाही. सरांच्या विद्वत्तेचे तेज, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरती झळाळत आहे. त्यांचे लिहिणे आणि बोलणे अतिशय नेमके, सुस्पष्ट आणि आटोपशीर आहे. अभ्यासोनि प्रकट व्हावे, नाही तर झाकूनी असावे, या समर्थ रामदासांच्या विचाराला त्यांच्या जीवनात अतिशय मोलाचे स्थान आहे. दांडगा व्यासंग आणि मुलभूत अभ्यास यामुळे त्यांचा एक प्रकारचा नैतिक धाक अनेकांना वाटत आलेला आहे. प्रा. डिघोळकर सरांची स्मरणशक्ती अफाट आहे. अंबाजोगाईतील शैक्षणिक चळवळीतील बारीक-सारीक तपशीलांपासून ते साहित्य इतिहासाच्या, प्राचीन साहित्य खंडातल्या, एखाद्या संदर्भात त्यांना अनेक गोष्टी उदा. वेद पुराणातल्या अनेक गोष्टी त्यांना मुखोद्गत आहेत .. कुठल्याही विषयाला पूर्णपणे वाहून घेणे हा प्रा. दिघोळकर सरांचा स्वभाव आहे. ते हाडाचे शिक्षक आहेत. शिकवताना त्यांनी आपले तन-मन अर्पण केले असे नाही तर धनही दिले आहे. स्वतः हजारो रुपयांच्या देणग्या त्यांनी शैक्षणिक संस्थांना दिलेल्या आहेत. इतकी दातृत्व शक्ती सरांमध्ये आहे. असे दातृत्व या काळात शोधूनही सापडणार नाही. असे व्रतस्थ शिक्षक शोधूनही सापडणार नाहीत.

सर आज आपल्यात नाहीत खूप आठवणी शिल्लक आहेत. शेवटची भेट झाली नाही ही खंत कायम मनात राहीलच.
भावपूर्ण श्रद्धांजली….!!!

लेखक:

प्रा. डॉ. सागर शरद कुलकर्णी
वाणिज्य विभाग,
स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय

अंबाजोगाई, ९५५२६८२२६७

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker